Bhandara Crime : भंडारा जिल्ह्यातील लाखांदूर तालुक्यातील भागडी गावातून एक अत्यंत मन सुन्न करणारी घटना समोर आली आहे. आपल्या आठ वर्षांच्या चिमुकल्या मुलीसमोरच एका ३२ वर्षीय महिलेची तिच्याच सख्ख्या दिराने धारदार शस्त्राने गळा चिरून हत्या केली. माधुरी अंबादे असे मृत महिलेचे नाव असून, आरोपी गौरव अंबादे (वय २५) याने या कृत्यानंतर घटनास्थळावरून पळ काढला आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात भीतीचे आणि हळहळीचे वातावरण पसरले आहे.
विवाह सोहळ्यासाठी आले असताना घडली घटना
मृत माधुरी आणि आरोपी गौरव हे दोघेही चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रह्मपुरी येथील रहिवासी आहेत. माधुरी यांच्या पतीचे पाच वर्षांपूर्वी निधन झाले होते, तेव्हापासून त्या आपल्या ८ वर्षांच्या मुलीसह राहत होत्या. रविवारी (दि. २६ एप्रिल) त्या गौरवसोबत भंडारा जिल्ह्यातील पालांदूर येथे एका विवाह सोहळ्यासाठी आल्या होत्या. विवाह आटोपल्यानंतर परतताना उशीर झाल्यामुळे त्यांनी रात्रीचा मुक्काम भागडी येथील नातेवाईकांकडे केला. याच मुक्कामादरम्यान मध्यरात्रीच्या सुमारास ही रक्तरंजित घटना घडली.
प्रेमसंबंध आणि लग्नाचा हट्ट ठरला जिवावर
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, पतीच्या निधनानंतर माधुरी आणि त्यांचा दिर गौरव यांच्यात प्रेमसंबंध निर्माण झाले होते. गौरवने गेल्या काही दिवसांपासून माधुरीकडे लग्नासाठी तगादा लावला होता. मात्र, माधुरी यांनी लग्नास नकार दिल्यामुळे दोघांमध्ये वारंवार वाद होत होते. घटनेच्या रात्री नातेवाईकांकडे मुक्कामी असताना पुन्हा एकदा याच मुद्द्यावरून त्यांच्यात तीव्र बाचाबाची झाली. संतापाच्या भरात गौरवने धारदार शस्त्राने माधुरी यांचा गळा चिरला, ज्यामुळे त्यांचा जागीच मृत्यू झाला.
आठ वर्षांच्या मुलीने पाहिला मातेचा मृत्यू
हा संपूर्ण थरार माधुरी यांच्या ८ वर्षांच्या मुलीच्या समोर घडला. आईवर होत असलेल्या हल्ल्यानंतर घाबरलेल्या मुलीने आरडाओरडा करण्यास सुरुवात केली. मुलीचा आवाज ऐकून नातेवाईक आणि परिसरातील नागरिक जागे झाले. पकडले जाण्याच्या भीतीने आरोपी गौरवने तात्काळ आपल्या दुचाकीवरून घटनास्थळावरून पळ काढला. या घटनेची माहिती मिळताच लाखांदूर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला आणि मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला.
पोलिस तपासाची चक्रे फिरली
लाखांदूर पोलिसांनी या प्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल केला असून आरोपीच्या शोधासाठी विविध पथके रवाना केली आहेत. पसार झालेला आरोपी गौरव अंबादे हा दुचाकीने ब्रह्मपुरीच्या दिशेने किंवा अन्यत्र कोठे पळाला आहे, याचा तपास तांत्रिक माहितीच्या आधारे घेतला जात आहे.










