Home / देश-विदेश / Emergency Alert on Phone : मोबाईलवर वाजला सायरन अन् उडाली तारांबळ! अशुद्ध मराठी अशुद्ध मराठी आणि तांत्रिक घोळामुळे केंद्र सरकारवर टीकेचा भडीमार..

Emergency Alert on Phone : मोबाईलवर वाजला सायरन अन् उडाली तारांबळ! अशुद्ध मराठी अशुद्ध मराठी आणि तांत्रिक घोळामुळे केंद्र सरकारवर टीकेचा भडीमार..

Emergency Alert on Phone : देशभरातील अँड्रॉइड आणि आयओएस (iOS) स्मार्टफोन वापरकर्त्यांना शनिवारी म्हणजेच आज एका अतिशय वेगळ्या आणि आश्चर्यकारक...

By: Team Navakal
Emergency Alert on Phone :
Social + WhatsApp CTA

Emergency Alert on Phone : देशभरातील अँड्रॉइड आणि आयओएस (iOS) स्मार्टफोन वापरकर्त्यांना शनिवारी म्हणजेच आज एका अतिशय वेगळ्या आणि आश्चर्यकारक अनुभवाला सामोरे जावे लागले. शनिवारी सकाळी अचानक देशभरातील लाखो मोबाईल फोनवर एकाच वेळी ‘आपातकालीन संदेश’ (Emergency Alert) धडकला. हा संदेश प्राप्त होताच फोनची स्क्रीन फ्लॅश झाली आणि एका विशिष्ट प्रकारचा मोठा धोक्याचा अलार्म वाजू लागला. सार्वजनिक ठिकाणी एकाच वेळी शेकडो फोन अचानक मोठ्या आवाजात वाजू लागल्यामुळे सुरुवातीला नागरिकांमध्ये प्रचंड घबराट आणि संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले होते.

अचानक आलेल्या अलार्ममुळे नागरिकांची उडाली तारांबळ-
शनिवारी सकाळी अचानक आलेल्या या तीव्र आवाजाच्या रिंगटोनमुळे अनेकांना नेमके काय घडले आहे, हे सुरुवातीला समजलेच नाही. कोणत्याही पूर्वसूचनेशिवाय एकाच वेळी सर्व स्मार्टफोनवर हा संदेश आल्याने अनेकांची तारांबळ उडाली. परंतु, काही वेळानंतर हा केंद्र सरकारच्या दूरसंचार विभागाकडून घेण्यात येणाऱ्या ‘आपत्कालीन संदेश प्रणाली’चा (Emergency Alert System) एक भाग असल्याची माहिती समोर आली आणि नागरिकांनी सुटकेचा श्वास सोडला. नैसर्गिक आपत्ती किंवा आणीबाणीच्या प्रसंगी नागरिकांना तातडीने सतर्क करण्यासाठी या प्रणालीची चाचणी घेतली जात होती.

मराठी भाषेतील चुकांमुळे अलर्ट ठरला ‘ट्रोल’चा विषय-
या संपूर्ण प्रक्रियेदरम्यान आलेल्या संदेशाच्या भाषेवरून मात्र नागरिकांमध्ये तीव्र नाराजी पाहायला मिळाली. पहिल्या चाचणी अलार्मच्या वेळी सुरुवातीला इंग्रजी आणि काही दाक्षिणात्य भाषांमध्ये संदेश ऐकू आला, ज्यामुळे नागरिकांमध्ये काहीसा गोंधळ उडाला. त्यानंतर आलेल्या दुसऱ्या अलार्ममध्ये इंग्रजी आणि मराठी भाषेचा वापर करण्यात आला होता. पहिल्या गोंधळानंतर दुसऱ्या अलार्मच्या वेळी गोंधळ थोडा कमी झाला होता. त्यानंतर दुसऱ्या अलार्मच्या वेळी मराठी भाषेत सूचना दिल्या गेल्या.

परंतु, या संदेशात वापरण्यात आलेली मराठी भाषा अत्यंत चुकीची, अशुद्ध आणि क्लिष्ट स्वरूपाची होती. संदेशाचे मराठीत भाषांतर करताना अनेक अपरिचित शब्द वापरण्यात आले होते. ही चुकीची मराठी ऐकून व वाचून नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केला. “शासकीय पातळीवर अधिकृत संदेश पाठवताना भाषेची शुद्धता राखणे आवश्यक होते,” अशा प्रतिक्रिया नागरिकांमधून उमटल्या.

आपत्कालीन प्रसंगात सतर्कतेसाठी केंद्र सरकारकडून ‘सेल ब्रॉडकास्ट’ प्रणालीची यशस्वी चाचणी; नागरिकांना घाबरून न जाण्याचे आवाहन-
देशातील नागरिकांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देत भारत सरकारने ‘सेल ब्रॉडकास्ट’ (Cell Broadcast) या अत्याधुनिक स्वदेशी तंत्रज्ञानावर आधारित आपत्कालीन सूचना प्रणालीची यशस्वी चाचणी घेतली आहे. भविष्यात उद्भवणाऱ्या कोणत्याही नैसर्गिक किंवा मानवनिर्मित आपत्तीच्या वेळी नागरिकांना तात्काळ पूर्वसूचना देऊन सतर्क करणे, हा या प्रणालीचा मुख्य उद्देश आहे. या सेवेच्या माध्यमातून पाठवण्यात येणाऱ्या संदेशांमुळे नागरिकांचे रक्षण होऊन राष्ट्राची सुरक्षितता अधिक बळकट होणार आहे.

स्वदेशी तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर: काय आहे ‘सेल ब्रॉडकास्ट’?
केंद्र सरकारच्या दूरसंचार विभाग (DoT) आणि राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण (NDMA) यांच्या संयुक्त विद्यमाने ही प्रगत प्रणाली विकसित करण्यात आली आहे.

१. तात्काळ पोहोच: या तंत्रज्ञानाचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे, यासाठी इंटरनेट किंवा मोबाईल नेटवर्क उपलब्ध नसले तरीही थेट उपग्रहाच्या आणि मोबाईल टॉवरच्या माध्यमातून सर्व स्मार्टफोनवर एकाच वेळी संदेश पाठवता येतो.
२विशिष्ट ध्वनी आणि कंपन: हा संदेश मोबाईलवर येताच फोनमध्ये एक विशिष्ट प्रकारचा मोठा अलार्म वाजतो आणि फोन व्हायब्रेट (कंपन) होतो, ज्यामुळे वापरकर्त्याचे लक्ष त्वरित वेधले जाते.

नागरिकांना घाबरून न जाण्याचे आवाहन; कोणत्याही कृतीची आवश्यकता नाही-
अनेकदा असे संदेश अचानक मोबाईलवर आल्यानंतर नागरिकांमध्ये भीतीचे किंवा संभ्रमाचे वातावरण निर्माण होते. मात्र, या चाचणी संदेशामध्ये शासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे की, हा केवळ एक चाचणी संदेश (Test Message) असून यावर नागरिकांनी कोणतीही प्रतिक्रिया किंवा कृती करण्याची आवश्यकता नाही. हा संदेश केवळ यंत्रणेची कार्यक्षमता तपासण्यासाठी पाठवला जात आहे. त्यामुळे जनतेने कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता शांतता राखावी, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

‘नागरिकांना सतर्क करा, राष्ट्राला सुरक्षित ठेवा’-
‘नागरिकांना सतर्क करा, राष्ट्राला सुरक्षित ठेवा’ हे ब्रीदवाक्य समोर ठेवून या यंत्रणेची निर्मिती करण्यात आली आहे. चक्रीवादळ, भूकंप, पूर किंवा इतर कोणत्याही गंभीर आणीबाणीच्या परिस्थितीत लाखो लोकांपर्यंत काही सेकंदांत अचूक माहिती पोहोचवून त्यांचे प्राण वाचवणे या स्वदेशी तंत्रज्ञानामुळे आता शक्य होणार आहे.

मोबाईलवरील आपत्कालीन अलार्मच्या चाचणीवरून नागरिकांमध्ये संभ्रम; केंद्राच्या पूर्वसूचनेअभावी राजकीय आणि सामाजिक वर्तुळातून उमटल्या तीव्र प्रतिक्रिया-
देशभरातील लाखो नागरिकांच्या मोबाईलवर अचानक वाजलेल्या आपत्कालीन अलार्ममुळे नागरिकांमध्ये मोठ्या प्रमाणावर घबराट आणि संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले होते. या संदर्भात केंद्र सरकारने ३० एप्रिलरोजी रात्री आठ वाजता एक प्रसिद्धीपत्रक (Press Note) जारी केले होते, परंतु याविषयी सामान्य नागरिकांना कोणतीही पूर्वकल्पना नव्हती. सरकारच्या या अपुऱ्या माहिती धोरणामुळे आणि पूर्वसूचनेच्या अभावामुळे आता विविध स्तरांतून नाराजी व्यक्त केली जात आहे.

प्रसिद्धीपत्रक निघाले, पण पूर्वकल्पना देण्यास सरकार असमर्थ-
केंद्र सरकारच्या दूरसंचार विभागाने रात्री उशिरा प्रसिद्धीपत्रक काढून या चाचणीची माहिती दिली होती. मात्र, या अत्यंत महत्त्वाच्या तांत्रिक चाचणीबाबत कोणतीही अधिकृत पत्रकार परिषद घेण्यात आली नाही, अथवा सोशल मीडियाच्या माध्यमातून कोणतीही माहिती प्रसारित करण्यात आली नाही. सामान्यतः सत्ताधारी भारतीय जनता पक्षाच्या (भाजप) वतीने केंद्र सरकारच्या अगदी छोट्या निर्णयांचीही माहिती समाजमाध्यमांवर मोठ्या प्रमाणावर प्रसारित आणि व्हायरल केली जाते. परंतु, एवढ्या मोठ्या प्रमाणावर होणाऱ्या या ‘इमर्जन्सी अलर्ट’ चाचणीबद्दल ना कोणत्याही नेत्याने पूर्वकल्पना दिली, ना सरकारने जनजागृती केली. त्यामुळे नागरिकांना या प्रसिद्धीपत्रकाची काडीमात्र माहिती नव्हती आणि शनिवारी सकाळी अचानक अलार्म वाजल्याने लोकांची तारांबळ उडाली.

मोबाईलवरील आपत्कालीन अलार्म चाचणी: आयफोन (iPhone) वापरकर्त्यांना तांत्रिक समस्येचा फटका; ‘ओके’ पर्याय न आल्याने उडाला गोंधळ-
केंद्र सरकारच्या दूरसंचार विभागाकडून घेण्यात आलेल्या आपत्कालीन इशारा प्रणालीच्या (Emergency Alert System) चाचणीदरम्यान केवळ भाषेतील अशुद्धतेचाच अडथळा आला नाही, तर आयफोन (iOS) वापरकर्त्यांना एका मोठ्या तांत्रिक त्रुटीचाही सामना करावा लागला. या चाचणीदरम्यान अँड्रॉइड मोबाईल धारकांना संदेश वाचून किंवा ऐकून झाल्यानंतर तो बंद करण्यासाठी स्क्रीनवर ‘ओके’ (OK) हा पर्याय उपलब्ध झाला होता. परंतु, आयफोन वापरकर्त्यांना मात्र असा कोणताही पर्याय न मिळाल्यामुळे त्यांच्यात काही काळ भीतीचे आणि गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते.

आयफोनवर ‘ओके’ पर्याय गायब; वापरकर्ते हतबल-
या चाचणी दरम्यान आयफोन वापरकर्त्यांच्या मोबाईलवर जेव्हा हा विशिष्ट प्रकारचा तीव्र अलार्म वाजण्यास सुरुवात झाली, तेव्हा तो बंद करण्यासाठी किंवा स्वीकारण्यासाठी स्क्रीनवर कोणताही ‘ओके’ (OK) अथवा ‘डिसमिस’ (Dismiss) असा पर्याय दिसला नाही.

अलार्म स्वतःहून बंद होईपर्यंत प्रतीक्षा: स्क्रीनवर कोणताही पर्याय उपलब्ध नसल्यामुळे, जोपर्यंत त्या आपत्कालीन संदेशातील सर्व सूचना पूर्णपणे वाचून किंवा ऐकून संपल्या नाहीत, तोपर्यंत आयफोनवर तो मोठा आवाज सुरूच होता.

त्रासदायक अनुभव: संदेशातील सर्व सूचना पूर्ण झाल्यानंतरच तो अलार्म स्वतःहून बंद झाला. ऐन गर्दीच्या किंवा कामाच्या वेळी हा प्रकार घडल्याने अनेक आयफोन वापरकर्ते तो आवाज तात्काळ थांबवू शकले नाहीत, ज्यामुळे त्यांची मोठी कोंडी झाली.

मोबाईलवरील आपत्कालीन अलार्म चाचणी: रितू तावडेंच्या वक्तव्यावरून संभ्रम; नागरिकांच्या संतप्त प्रतिक्रियांनंतर सोशल मीडियावर तीव्र पडसाद
केंद्र सरकारच्या आपत्कालीन इशारा प्रणालीच्या चाचणीवरून सध्या राज्यात उलटसुलट चर्चा सुरू आहे. या संपूर्ण प्रकरणात मुंबईच्या महापौर रितू तावडे यांनी या चाचणीवर कोणताही अधिकृत आक्षेप घेतला नसला, तरी त्यांच्या एका वक्तव्यामुळे मात्र सर्वसामान्य नागरिकांमध्ये मोठा संभ्रम निर्माण झाला आहे. “असे अलार्म आता वारंवार वाजत राहणार आहेत,” असे विधान त्यांनी केले होते. त्यांच्या या विधानामुळे लोकांमध्ये गोंधळ अधिक वाढला आहे.

वारंवार चाचण्यांमुळे खऱ्या संकटाकडे दुर्लक्ष होण्याची भीती-
रितू तावडे म्हणाल्या कि असे अलार्म आता वारंवार वाजत राहतील त्याच्या या वक्तव्यावर आता सामान्य नागरिकांमध्ये प्रचंड गोंधळ निर्मण झाला आहे. जर शासनाकडून किंवा यंत्रणेकडून वारंवार असे अलार्म वाजवले गेले, तर लोकांना त्याची सवय होईल. अशा परिस्थितीत, भविष्यात जेव्हा खरोखरच एखादी मोठी आपत्ती किंवा संकट ओढवेल, तेव्हा नागरिक त्या खऱ्या धोक्याच्या सूचनेलाही केवळ एक ‘चाचणी’ (Trial) समजून त्याकडे दुर्लक्ष करतील. अशा गंभीर निष्काळजीपणामुळे ऐन वेळी मोठी जीवितहानी होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

जागतिक युद्धाच्या सावटात ‘खरा अलर्ट’ कसा ओळखायचा?
दुसरीकडे, सध्या जगभरात सुरू असलेल्या युद्धजन्य परिस्थितीमुळे आणि आंतरराष्ट्रीय तणावामुळे सर्वसामान्य जनता आधीच चिंतेत आहे. अशा संवेदनशील काळात देशात पुन्हा पुन्हा अशा चाचण्या होणार असतील, तर सर्वसामान्य नागरिकांना ‘खरा अलर्ट’ कोणता आणि ‘चाचणीचा अलर्ट’ कोणता, हे नेमके कसे समजणार? असा अत्यंत रास्त आणि मूलभूत प्रश्न आता उपस्थित केला जात आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आयुष्यातील ‘८’ अंकाचे गूढ; ‘रात्री ८ वाजता’ घेतलेल्या ऐतिहासिक निर्णयांचे नेमके कारण काय?
भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या राजकीय प्रवासात आणि महत्त्वपूर्ण निर्णयांमध्ये ‘८’ या अंकाचा आणि ‘रात्री ८’ या वेळेचा एक अत्यंत अद्भूत आणि रंजक योगायोग वारंवार पाहायला मिळतो. केवळ ८ ही तारीखच नाही, तर रात्री ८ वाजता देशाशी संवाद साधून मोठे निर्णय जाहीर करण्याची त्यांची पद्धत नेहमीच चर्चेचा विषय ठरली आहे. ८ नोव्हेंबर २०१६ रोजी रात्री ठीक ८ वाजता घेतलेला नोटाबंदीचा ऐतिहासिक निर्णय या सर्व घडामोडींमागे अंकशास्त्र, ज्योतिषशास्त्र आणि राजकीय रणनीती यांचा एक मोठा संगम असल्याचे मानले जाते.

रात्री ८ वाजताच महत्त्वाचे निर्णय का?
पंतप्रधान मोदी यांनी अनेक मोठे निर्णय रात्री ८ वाजताच का घेतले, यामागे काही प्रमुख कारणे सांगितली जातात:
८ अंकाचा अंकशास्त्रीय प्रभाव: अंकशास्त्रानुसार, पंतप्रधान मोदी यांचा जन्म १७ सप्टेंबर १९५० रोजी झाला. त्यांच्या जन्मदिनांकाची बेरीज (1+7=8) मूलांक ८ येते. तसेच, ‘Narendra Modi’ या इंग्रजी नावातील अक्षरांच्या मूल्यांची बेरीज ६२ येते आणि त्याची पुन्हा बेरीज केल्यास (6+2=8) हाच अंक येतो. त्यामुळे त्यांच्यासाठी ‘८’ हा अंक अत्यंत लाभदायी मानला जातो. याच कारणामुळे महत्त्वाचे निर्णय घेण्यासाठी ते ‘८’ या वेळेला प्राधान्य देतात, असा एक मतप्रवाह आहे.

राजकीय आणि प्रशासकीय रणनीती-
रात्री ८ वाजता घेतलेल्या निर्णयांचा उद्देश केवळ अंकशास्त्र नसून, त्यामागे एक मोठी रणनीतीही असते. रात्री ८ वाजता देशातील बहुतांश नागरिक घरी असतात आणि दूरदर्शन किंवा सोशल मीडियाच्या माध्यमातून थेट जोडलेले असतात. या वेळेत महत्त्वाचा निर्णय जाहीर केल्यास तो देशातील कानाकोपऱ्यात एकाच वेळी पोहोचतो. तसेच, बँका आणि बाजारपेठा बंद झाल्यानंतर असे निर्णय घेतल्याने तात्काळ होणारा गोंधळ टाळता येतो.

‘८’ अंकाचा राजकीय प्रवासातील प्रभाव-
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शासनकाळात ‘८’ या अंकाशी संबंधित अनेक मोठे निर्णय आणि योजनांची सांगड घातली गेली आहे:

नोटाबंदीचा निर्णय: देशाच्या अर्थव्यवस्थेला कलाटणी देणारा आणि काळ्या पैशावर प्रहार करणारा ‘नोटाबंदी’चा ऐतिहासिक निर्णय ८ नोव्हेंबर २०१६ रोजी रात्री ठीक ८ वाजता घोषित करण्यात आला होता.

तिसऱ्यांदा शपथविधी: पंतप्रधान मोदी यांनी त्यांच्या तिसऱ्या कार्यकाळाची शपथ ८ जून २०२४ रोजी रात्री ८ वाजता घेतली, हा देखील एक मोठा योगायोग मानला जातो.

लोक कल्याण मार्ग नामकरण: पंतप्रधानांच्या ‘७, रेस कोर्स रोड’ या अधिकृत निवासस्थानाचे नाव बदलून ‘७, लोक कल्याण मार्ग’ करण्यात आले. ‘चाल्डियन कॅलेंडर’नुसार ‘लोक कल्याण मार्ग’ या शब्दांचे मूल्य ८ येते, जे समृद्धीचे प्रतीक मानले जाते.

‘८’ अंक आणि शनी ग्रहाचा प्रभाव-
अंकशास्त्र आणि वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, ‘८’ या अंकाचा स्वामी शनी आहे. शनी हा न्याय, शिस्त, अधिकार आणि कठोर परिश्रमाचे प्रतीक मानला जातो.

Web Title:
For more updates: , , stay tuned with Navakal
संबंधित बातम्या