PM Modi and Eknath Shinde : पश्चिम बंगालच्या राजकारणात ऐतिहासिक परिवर्तनाची मोहर उमटवत शुभेंदू अधिकारी यांनी आज मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. कोलकाता येथील या भव्य सोहळ्याला राजकीय दिग्गजांची मांदियाळी उपस्थित होती. मात्र, या संपूर्ण कार्यक्रमात सर्वाधिक चर्चा रंगली ती म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यातील जिव्हाळ्याच्या भेटीची. मंचावरील या दोन्ही नेत्यांमधील संवाद आणि ‘केमिस्ट्री’ सध्या सोशल मीडियावर आणि राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरली आहे.
दिग्गजांची मांदियाळी आणि ऐतिहासिक क्षण-
शुभेंदू अधिकारी यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना अभिवादन केले. यावेळी योगी आदित्यनाथ यांनी अधिकारी यांच्या गळ्यात भगवे उपरणे घालून त्यांचे स्वागत केले. या सोहळ्यासाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे विशेष निमंत्रिता म्हणून उपस्थित होते. शपथविधीपूर्वी पंतप्रधान मोदी यांनी मंचावर उपस्थित असलेल्या विविध राज्यांच्या नेत्यांची आणि मान्यवरांची भेट घेऊन त्यांचे अभिवादन स्वीकारले.

मोदी-शिंदे संवाद: मंचावर रंगले हास्यविनोद-
पंतप्रधान नरेंद्र मोदी मंचावरील प्रत्येकापाशी थांबून विचारपूस करत पुढे जात होते. त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन त्यांचेही अभिवादन स्वीकारले. मात्र, जेव्हा पंतप्रधान मोदी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यापाशी आले, तेव्हा ते बराच वेळ तिथेच थांबले. मोदींनी शिंदेंचा हात आपल्या हातात घेऊन त्यांच्याशी मनमोकळ्या गप्पा मारण्यास सुरुवात केली. यादरम्यान दोघांमध्ये काही हास्यविनोदही झाले, ज्यावर एकनाथ शिंदे मोठ्याने हसताना दिसले. मंचावर उपस्थित असलेल्या इतर अनेक राज्यांच्या मुख्यमंत्र्यांच्या तुलनेत, पंतप्रधानांनी एकनाथ शिंदे यांच्याशी संवाद साधण्यासाठी अधिक वेळ दिला, हे विशेषत्वाने दिसून आले.

राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण-
पंतप्रधान आणि एकनाथ शिंदे यांच्यातील या भेटीचे व्हिडिओ आणि छायाचित्रे सोशल मीडियावर वेगाने प्रसारित होत आहेत. मंचावरील या दोन्ही नेत्यांमधील हा अनौपचारिक संवाद त्यांच्यातील दृढ राजकीय आणि वैयक्तिक संबंधांची साक्ष देणारा ठरला. एकनाथ शिंदे यांची आस्थेने विचारपूस केल्यानंतरच मोदी पुढील नेत्यांना भेटण्यासाठी रवाना झाले. पश्चिम बंगालमधील सत्तेच्या या महासोहळ्यात महाराष्ट्राच्या नेत्यांचे विशेष महत्त्व आणि पंतप्रधानांनी दिलेला वेळ, यामुळे राजकीय विश्लेषकांमध्ये या ‘केमिस्ट्री’बाबत नवीन तर्क-वितर्क लढवले जात आहेत.












