Nida Khan : संपूर्ण राज्याचे लक्ष वेधून घेणाऱ्या नाशिक येथील टीसीएस (TCS) प्रकरणातील मुख्य संशयित आरोपी निदा खान हिला नाशिक रोड न्यायालयाने ११ मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. या गुन्ह्यातील गांभीर्य लक्षात घेऊन आता विशेष तपास पथक (SIT) निदा खानची कसून चौकशी करणार आहे. या चौकशीतून धर्मांतर प्रकरणाचे धागेदोरे आणि यामागील छुपे आंतरराष्ट्रीय कनेक्शन समोर येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
पोलिसांसमोर अनुत्तरित प्रश्नांचे डोंगर-
२५ मार्च रोजी गुन्हा दाखल झाल्यापासून निदा खान फरार होती. या काळात तिने मुंब्रा, मुंबई आणि भिवंडी यांसारख्या संवेदनशील भागात आश्रय घेतल्याचे समोर येत आहे. तिला हा आश्रय कोणी दिला आणि ती कोणाकोणाच्या संपर्कात होती, याचा शोध आता पोलीस घेणार आहेत. विशेषतः मतीन पटेल नावाच्या व्यक्तीशी तिची ओळख कशी झाली आणि या प्रकरणात मालेगाव किंवा मलेशियामधून काही आर्थिक रसद पुरवली जात होती का? या दिशेने ‘एसआयटी’ तपास चक्र फिरवणार आहे.
न्यायालयीन युक्तिवाद आणि मानवी दृष्टिकोन-
न्यायालयातील सुनावणी दरम्यान बचाव पक्षाचे वकील ॲड. राहुल कासलीवाल यांनी निदा खानच्या गरोदरपणाचा मुद्दा प्रकर्षाने मांडला. “निदा खान गर्भवती असल्याने तिला पोलीस कोठडीऐवजी न्यायालयीन कोठडी देण्यात यावी आणि मानवी दृष्टिकोनातून तिच्या प्रकृतीचा विचार करावा,” अशी विनंती त्यांनी केली. न्यायालयाने निदा खानच्या आईला पोलीस कोठडीत सकाळी आणि संध्याकाळी तिला भेटण्याची परवानगी दिली आहे. दरम्यान, बचाव पक्षाने पोलिसांचे आरोप तथ्यहीन असल्याचे सांगत, मोबाईल आधीच जप्त केल्यामुळे आता पोलीस कोठडीची गरज नसल्याचा दावा केला.
निदा खानवर असलेले गंभीर आरोप-
तपास यंत्रणांच्या मते, निदा खान या संपूर्ण प्रकरणाची मुख्य सूत्रधार आहे. पीडित तरुणी आणि महिलांचा मानसिक छळ करणे, हिंदू देव-देवतांबद्दल अश्लील टिप्पणी करणे आणि महिलांवर लैंगिक अत्याचार होत असताना बघ्याची भूमिका घेऊन कटात सहभागी होणे, असे गंभीर आरोप तिच्यावर आहेत. धार्मिक भावना दुखावून अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये (ॲट्रॉसिटी) तिच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. आरोपी शाहरुख कुरेशी आणि रझा मेमन यांच्याशी मिळून तिने हे षड्यंत्र रचल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.
राजकीय प्रतिक्रिया: ‘कॉर्पोरेट जिहाद’चा नवा प्रकार-
निदा खानच्या अटकेनंतर राजकीय वर्तुळातही आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी सुरू झाल्या आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गट) आमदार संग्राम जगताप यांनी या प्रकरणावर तीव्र संताप व्यक्त केला आहे. “आत्तापर्यंत आपण केवळ ‘लव्ह जिहाद’ ऐकत होतो, मात्र आता ‘कॉर्पोरेट जिहाद’ नावाचा हा नवा आणि अतिशय धोकादायक प्रकार समोर आला आहे,” अशी टीका त्यांनी केली.












