Dr.Anand Nadkarni Passes Away : मानवी मनाच्या गुंतागुंतीच्या वाटा सामान्यांना सहजसोप्या भाषेत उलगडून दाखवणारे, मानसिक आजारांकडे पाहण्याचा समाजाचा दृष्टिकोन बदलणारे प्रख्यात मानसोपचार तज्ज्ञ, साहित्यिक आणि नाटककार डॉ. आनंद नाडकर्णी यांचे शुक्रवारी मुंबईत निधन झाले. ते ६८ वर्षांचे होते. गेल्या काही महिन्यांपासून ते कर्करोगासारख्या गंभीर आजाराशी झुंज देत होते. त्यांच्यावर उपचार सुरू असतानाच शुक्रवारी सकाळी मुंबईतील राहत्या घरी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनाने महाराष्ट्रातील वैद्यकीय, साहित्यिक आणि सामाजिक क्षेत्रावर शोककळा पसरली आहे.
मानसिक आरोग्यासाठी समर्पित जीवन
डॉ. आनंद नाडकर्णी यांनी आपले संपूर्ण आयुष्य मानसिक आरोग्याच्या प्रसारासाठी वाहिले होते. १९८० मध्ये एम.बी.बी.एस आणि १९८४ मध्ये मनोविकारशास्त्र विषयात एम.डी पदवी प्राप्त केल्यानंतर, त्यांनी या क्षेत्रातील रूढ चौकटी मोडण्याचे काम केले. मानसिक आजार म्हणजे कोणता तरी ‘बाऊ’ करण्याची गोष्ट नसून, तो एखाद्या शारीरिक व्याधीसारखाच सामान्य आजार आहे, ही जाणीव त्यांनी समाजात निर्माण केली. त्यांची मांडणी केवळ तांत्रिक नसून ती अत्यंत संवेदनशील आणि मानवी होती, ज्यामुळे हजारो रुग्णांना आणि त्यांच्या कुटुंबियांना जगण्याची नवी उमेद मिळाली.
‘आयपीएच’ (IPH) या संस्थेची उभारणी
मनोविकारांबाबत समाजात असलेल्या गैरसमजुतींविरुद्ध एक मोठी चळवळ उभी करण्याचे स्वप्न त्यांनी तरुणपणीच पाहिले होते. हे स्वप्न प्रत्यक्षात उतरवण्यासाठी त्यांनी २३ मार्च १९९० रोजी ठाणे येथे ‘इन्स्टिट्यूट फॉर सायकॉलॉजिकल हेल्थ’ (IPH) या संस्थेची स्थापना केली. ही संस्था केवळ तीव्र मनोरुग्णांवर उपचार करण्यापुरती मर्यादित राहिली नाही, तर कौटुंबिक समस्या, वैयक्तिक विकास आणि मानसिक स्वास्थ्यासाठी काम करणारे एक मोठे केंद्र बनली. या संस्थेत समुपदेशनासोबतच संगीत, नाट्य आणि साहित्याचा उपयोग करून मनावर उपचार करण्याची अभिनव पद्धत त्यांनी रूढ केली.
साहित्य आणि नाट्य क्षेत्रातील बहुआयामी योगदान
वैद्यकीय क्षेत्रासोबतच डॉ. नाडकर्णी यांनी मराठी साहित्यातही मोलाची भर घातली. त्यांची ‘गद्धेपंचविशी’ आणि ‘विषादयोग’ ही पुस्तके अत्यंत लोकप्रिय ठरली असून त्यांना महाराष्ट्र शासनाचा प्रतिष्ठित पुरस्कारही प्राप्त झाला आहे. नाटककार म्हणूनही त्यांनी आपली स्वतंत्र मोहोर उमटवली. ‘रंग माझा वेगळा’, ‘असेच आम्ही सारे’ आणि ‘मयसभा’ यांसारखी त्यांची नाटके गाजली. विशेषतः ‘गेट वेल सून’ या नाटकाची संकल्पना त्यांचीच होती, ज्याची त्या वर्षीच्या १० सर्वोत्कृष्ट नाटकांत निवड झाली होती. ‘एबीपी माझा’च्या डिजिटल प्लॅटफॉर्मवरील त्यांची ‘कर्ता शेतकरी’ ही मालिकाही प्रेक्षकांच्या विशेष स्मरणात राहिली.
एक मार्गदर्शक हरपला
डॉ. आनंद नाडकर्णी यांच्या निधनाने केवळ एक निष्णात डॉक्टरच नव्हे, तर एक विचारवंत, लेखक आणि अनेकांचे वैयक्तिक मार्गदर्शक हरपल्याची भावना व्यक्त होत आहे.
शब्दांतून सावरलेलं ‘मन’: डॉ. आनंद नाडकर्णी यांच्या अजरामर साहित्य आणि नाट्यकृतींचा धावता आढावा-
प्रख्यात मानसोपचार तज्ज्ञ डॉ. आनंद नाडकर्णी यांच्या निधनाने केवळ वैद्यकीय क्षेत्रच नव्हे, तर मराठी साहित्य आणि नाट्यसृष्टीचीही मोठी हानी झाली आहे. मानवी मनाचा ठाव घेणारे त्यांचे साहित्य आणि वास्तववादी नाटके ही मराठी संस्कृतीतील एक अमूल्य ठेवा ठरली आहेत. मनोविकारशास्त्रासारखा गंभीर विषय त्यांनी साहित्याच्या माध्यमातून घराघरांत पोहोचवला. त्यांच्या काही गाजलेल्या साहित्यकृती आणि नाटकांनी समाजाला नवी दृष्टी दिली आहे.
नाट्यसृष्टीतील वैचारिक क्रांती-
डॉ. नाडकर्णी यांनी केवळ क्लिनिकमध्ये बसून उपचार केले नाहीत, तर रंगभूमीच्या माध्यमातून समाजाचे प्रबोधन केले. त्यांच्या ‘रंग माझा वेगळा’ आणि ‘असेच आम्ही सारे’ या व्यावसायिक नाटकांनी प्रेक्षकांच्या मनावर गारुड घातले. मानसिक आजारांपैकी सर्वात गंभीर मानल्या जाणाऱ्या ‘स्किझोफ्रेनिया’ या विषयावर त्यांनी ‘जन्मरहस्य’ हे विशेष नाटक लिहिले, ज्यातून या आजाराबद्दलचे अनेक गैरसमज दूर झाले. ‘त्या तिघांची गोष्ट’ या नाटकाला महाराष्ट्र शासनाचा ‘यशवंतराव चव्हाण वाङ्मय पुरस्कार’ देऊन गौरविण्यात आले होते, तर ‘मयसभा’ या नाटकानेही लेखनाचे अनेक पुरस्कार पटकावले. याशिवाय, प्रचंड गाजलेल्या ‘गेट वेल सून’ या नाटकाची मूळ कथासंकल्पना डॉ. नाडकर्णी यांचीच होती, ज्यातून त्यांनी व्यसनमुक्ती आणि कौटुंबिक संघर्षावर प्रकाश टाकला होता.
साहित्यातून घडवलेला ‘मनोविकास’-
डॉ. नाडकर्णी यांचे लेखन हे केवळ माहितीपर नसून ते वैचारिक आणि मार्गदर्शक स्वरूपाचे होते. त्यांच्या ‘गद्धेपंचविशी’ या पुस्तकाने तरुण पिढीला दिशा दिली, तर ‘विषादयोग’ या पुस्तकातून त्यांनी ताणतणावाचे व्यवस्थापन कसे करावे, याचे मौलिक मार्गदर्शन केले. ‘एका सायकिॲट्रिस्टची डायरी’ आणि ‘शहाण्यांचा सायकिअॅट्रिस्ट’ यांसारख्या आत्मचरित्रपर पुस्तकांमधून त्यांनी मानसोपचार तज्ज्ञ म्हणून आलेले अनुभव वाचकांसमोर मांडले. ‘स्वभाव-विभाव’ या मूळ मराठी पुस्तकाचा ‘Nature ‘N’ Signature’ या नावाने इंग्रजी अनुवादही झाला आहे, ज्यातून मानवी स्वभावाचे विविध पदर उलगडण्यात आले आहेत.
आरोग्य आणि जीवनविकासाचे भाष्यकार-
वैद्यकीय क्षेत्रातील सत्तेवर भाष्य करणारे ‘वैद्यकसत्ता’, सात्त्विक जीवनविकासाचा मार्ग सांगणारे ‘कर्मधर्मसंयोग’ आणि मानसिक आरोग्याचे महत्त्व विशद करणारे ‘आरोग्याचा अर्थ’ ही पुस्तके त्यांच्या सखोल अभ्यासाची साक्ष देतात. संकटाच्या काळात उमेद देणारे ‘हेही दिवस जातील!’ आणि व्यसनमुक्तीवर भाष्य करणारी ‘मुक्तिपत्रे’ यांसारख्या कलाकृतींनी अनेकांना आयुष्यातील नैराश्यातून बाहेर काढले.












