Mumbai Metro Aqua Line : मुंबईकरांच्या सेवेत नव्याने दाखल झालेल्या ‘अॅक्वा लाईन-३’ या भूमिगत मेट्रो सेवेला आज तांत्रिक बिघाडाचे ग्रहण लागले. तांत्रिक त्रुटीमुळे गेल्या ४० ते ५० मिनिटांपासून मेट्रो गाड्या एकाच ठिकाणी उभ्या असल्याने प्रवाशांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. या अनपेक्षित बिघाडामुळे विविध मेट्रो स्थानकांवर प्रवाशांची प्रचंड गर्दी उसळली असून, यंत्रणा पूर्ववत करण्यासाठी प्रशासनाचे प्रयत्न सुरू आहेत.
नेटवर्कअभावी प्रवासी संपर्कापासून वंचित-
मेट्रो-३ ही मार्गिका पूर्णपणे भूमिगत असल्याने स्थानकांमध्ये प्रवेश करताच मोबाईल नेटवर्क पूर्णपणे गायब होत असल्याच्या तक्रारी प्रवाशांनी केल्या आहेत. तांत्रिक बिघाडामुळे मेट्रो ठप्प झाली असतानाच, नेटवर्क नसल्यामुळे प्रवाशांना आपल्या नातेवाईकांशी संपर्क साधणे किंवा तातडीचे संदेश पाठवणेही अशक्य झाले आहे. या दुहेरी संकटामुळे प्रवाशांमधील अस्वस्थता अधिकच वाढली आहे.
स्थानकांवरील प्रवेश तात्पुरता बंद; प्रवाशांचा संताप-
मेट्रो सेवा विस्कळीत झाल्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT) आणि इतर प्रमुख स्थानकांवर प्रवाशांची मोठी कोंडी झाली आहे. स्थानकांवरील गर्दीवर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रशासनाने खबरदारीचा उपाय म्हणून सीएसएमटीसह काही स्थानकांचे प्रवेशद्वार तात्पुरत्या स्वरूपात बंद ठेवले आहेत. यामुळे कामावर जाणाऱ्या आणि घरी परतणाऱ्या नोकरदारांचे हाल होत आहेत.
प्रशासन आणि प्रवाशांमध्ये खडाजंगी-
सेवा नेमकी कधी सुरू होईल, याबाबत मेट्रो प्रशासनाकडून कोणतीही अधिकृत किंवा स्पष्ट माहिती मिळत नसल्याने प्रवाशांच्या संयमाचा अंत पाहायला मिळाला. अनेक स्थानकांवर तिकीट खिडकीवरील कर्मचाऱ्यांशी प्रवाशांचे तीव्र वाद झाले. प्रवाशांच्या मते, बिघाडाची कल्पना वेळीच दिली असती, तर त्यांनी पर्यायी मार्गाचा अवलंब केला असता.
कारणाचा शोध सुरू-
मेट्रो प्रशासनाकडून या तांत्रिक बिघाडाचे नेमके कारण शोधण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. अद्याप तांत्रिक दोष नेमका कशामुळे उद्भवला, हे स्पष्ट झालेले नाही.










