Vidhan Parishad Election 2026 : महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या विधानपरिषदेच्या आगामी निवडणुकांचे वारे वाहू लागले असून, महायुतीमधील घटक पक्षांमध्ये जागावाटपावरून तीव्र रस्सीखेच सुरू असल्याचे चित्र आहे. विशेषतः उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या ठाणे स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघात आता अत्यंत रंजक आणि गुंतागुंतीची राजकीय परिस्थिती निर्माण झाली आहे. या जागेवर शिवसेनेच्या (शिंदे गट) वतीने रवींद्र फाटक यांच्या उमेदवारीवर जवळपास शिक्कामोर्तब झाले असतानाच, भारतीय जनता पक्षाने पडद्यामागे हालचाली करून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला आहे. ठाण्यात शिवसेनेला शह देण्यासाठी भाजपने बहुजन विकास आघाडीचे माजी महापौर राजीव पाटील यांच्याशी संपर्क साधल्याची खात्रीलायक माहिती समोर येत आहे. या राजकीय समीकरणासाठी भाजप खासदार हेमंत सावरा आणि आमदार राजन नाईक यांनी नुकतीच राजीव पाटील यांची भेट घेतल्याने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.
वास्तविक, यापूर्वी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हितेंद्र ठाकूर यांचे पुत्र क्षितिज ठाकूर यांना रिंगणात उतरवण्याच्या दृष्टीने चाचपणी सुरू केली होती. बहुजन विकास आघाडीचे ७१ नगरसेवक सोबत घेतल्यास शिवसेनेचे पारडे जड होईल, असा त्यांचा कयास होता. त्या बदल्यात बहुजन विकास आघाडीचे शिवसेनेत विलीनीकरण करण्याच्या वावड्याही उठल्या होत्या. मात्र, एकनाथ शिंदे यांच्या दिल्ली दौऱ्यामुळे ही चर्चा प्रलंबित राहिली आणि याच संधीचा फायदा घेत भाजपने राजीव पाटील यांच्या रूपाने नवा प्यादा पुढे सरकवल्याचे दिसत आहे. सध्याच्या आकडेवारीनुसार, ठाणे जिल्ह्यात भाजपचे ४४४ नगरसेवक असून शिवसेनेकडे ३४६ मतांचे बळ आहे. अशा स्थितीत जर भाजपने राजीव पाटील यांना पाठबळ दिले, तर तो शिंदेंसाठी मोठा राजकीय धक्का मानला जाईल.
सध्याच्या घडीला या निवडणुकीच्या रिंगणात रवींद्र फाटक, क्षितिज ठाकूर आणि राजीव पाटील अशी तीन मातब्बर नावे चर्चेत आहेत. क्षितिज ठाकूर यांच्या उमेदवारीच्या बदल्यात हितेंद्र ठाकूर आपल्या पक्षाचे अस्तित्व विलीन करण्यास तयार होणार का, हा मोठा कळीचा मुद्दा आहे. दुसरीकडे, भाजपने स्वतःची ताकद वाढवण्यासाठी खेळलेली ही खेळी महायुतीमधील अंतर्गत कुरघोडी अधोरेखित करणारी ठरली आहे.











