Siddaramaiah Resignation : कर्नाटकच्या राजकीय वर्तुळात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या संघर्षाला आणि तर्क-वितर्कांना अखेर पूर्णविराम मिळाला आहे. मुख्यमंत्री सिद्धारमय्या यांनी आपल्या मुख्यमंत्रिपदाचा अधिकृतपणे राजीनामा दिला असून, राज्याच्या राजकारणात एका नव्या पर्वाची नांदी झाली आहे. काँग्रेस हायकमांडच्या आदेशानुसार मी हे पाऊल उचलल्याचे सांगताना सिद्धारमय्या यांना आपले अश्रू अनावर झाले. त्यांच्या या राजीनाम्यानंतर आता उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांच्याकडे राज्याचे नेतृत्व सोपवले जाण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे.
आपला राजीनामा सादर केल्यानंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना सिद्धारमय्या अत्यंत भावुक झाल्याचे पाहायला मिळाले. सन २००६ मध्ये काँग्रेस पक्षात प्रवेश केल्यापासून आजतागायत पक्षाने दिलेली जबाबदारी आणि कार्यकर्त्यांनी दिलेले प्रेम याबद्दल त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली. “सोनिया गांधी, राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खर्गे यांनी माझ्यावर जो विश्वास दाखवला, त्याबद्दल मी त्यांचा ऋणी आहे. देशात संविधान हेच सर्वोच्च असून, मी सदैव संविधानाच्या मार्गावर चालण्याचा प्रयत्न केला आहे,” अशा शब्दांत त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. कर्नाटकातील सात कोटी जनतेने आपल्याला जे प्रेम दिले, ते विसरणे शक्य नसल्याचेही ते यावेळी म्हणाले.
सिद्धारमय्या यांनी आपल्या राजकीय प्रवासातील टप्प्यांचे स्मरण करताना सांगितले की, “काँग्रेस पक्ष पाठीशी नसता, तर मला दोन वेळा मुख्यमंत्री आणि दोन वेळा विरोधी पक्षनेता म्हणून कार्य करण्याची संधी कधीच मिळाली नसती. जनतेने दिलेला हा सन्मान मी माझ्या जीवनातील सर्वोच्च ठेवा मानतो.” कर्नाटकातील १३५ आमदारांचे संख्याबळ आणि दोन अपक्ष आमदारांचा पाठिंबा असूनही, पक्षाच्या अंतर्गत शिस्तीसाठी आणि श्रेष्ठींच्या सूचनेचा मान राखून आपण पदत्याग करत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
या निरोपाच्या भाषणात त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि विरोधी पक्षांवरही कडाडून टीका केली. राज्य सरकारने सुरू केलेल्या लोककल्याणकारी ‘गॅरंटी’ योजनांमुळे राज्याचा खजिना रिकामा होईल, असा खोटा प्रचार विरोधकांनी केला होता.










