Home / महाराष्ट्र / Pimpri Crime : फक्त ६६०० रुपयांसाठी १५ संसार उद्ध्वस्त…”योगेश वानखेडेच्या धक्कादायक ‘डेथ प्लॅन’चा थरारक हिशोब समोर!

Pimpri Crime : फक्त ६६०० रुपयांसाठी १५ संसार उद्ध्वस्त…”योगेश वानखेडेच्या धक्कादायक ‘डेथ प्लॅन’चा थरारक हिशोब समोर!

Pimpri Crime : पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसरामध्ये विषारी दारूमुळे झालेल्या मृत्यूचे तांडव अजूनही सुरूच असून, या जीवघेण्या घटनेने आतापर्यंत १८...

By: Team Navakal
Pimpri Crime
Social + WhatsApp CTA

Pimpri Crime : पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसरामध्ये विषारी दारूमुळे झालेल्या मृत्यूचे तांडव अजूनही सुरूच असून, या जीवघेण्या घटनेने आतापर्यंत १८ निष्पाप नागरिकांचा बळी घेतला आहे. पोलिसांच्या गुन्हे अन्वेषण विभागाने केलेल्या सखोल तपासात या विषारी दारूची निर्मिती फुगेवाडी परिसरामध्येच केली जात असल्याचे उघड झाले आहे. कर्नेलसिंग विरका ऊर्फ सरदारजी, त्याची पत्नी इंदरजित विरका आणि मुलगा गुरुचरण ऊर्फ विक्की विरका यांनी बाहेरून आणलेल्या गावठी दारूमध्ये स्वतःच्या घरातच २१५ लिटर अत्यंत घातक आणि रासायनिक स्वरूपाचे ‘मिथेनॉल’ मिसळल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे. केवळ काही हजार रुपयांच्या अतिरिक्त नफ्यासाठी आरोपींनी एवढ्या मोठ्या प्रमाणावर लोकांच्या जिवाशी खेळ केल्याची धक्कादायक माहिती समोर आल्याने संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.

या संपूर्ण प्रकरणाचा मुख्य सूत्रधार योगेश वानखेडे असून त्याने अवघ्या ६ हजार ६०० रुपयांच्या वैयक्तिक फायद्यासाठी १८ जणांना मृत्यूच्या दारात ढकलले आहे. योगेशने केमिकल बाजारातून १७ हजार ५०० रुपये मोजून २१० लिटर मिथेनॉल खरेदी केले होते. त्यानंतर त्याने गावठी दारूचे प्रत्येकी १ हजार ९०० रुपये किमतीचे ५ ड्रम एकूण ९ हजार ५०० रुपयांना विकत घेतले. अधिक नफा कमावण्याच्या हव्यासापोटी त्याने या ५ ड्रम दारूमध्ये तितकेच पाणी मिसळून त्याचे आधी १० ड्रम केले आणि नंतर त्यात निम्म्याहून अधिक घातक मिथेनॉल रसायन ओतून एकूण १२ ड्रम तयार केले. या संपूर्ण प्रक्रियेसाठी त्याचा एकूण खर्च २७ हजार रुपये झाला होता. हे १२ ड्रम त्याने २ हजार ८०० रुपये प्रति ड्रम या दराने बाजारात विकून ३३ हजार ६०० रुपये कमावले. म्हणजेच खर्च आणि विक्रीची वजाबाकी केली तर अवघ्या ६ हजार ६०० रुपयांच्या नफ्यासाठी त्याने या विषारी रसायनाचा जीवघेणा प्रयोग केला.

ही गावठी हातभट्टीची दारू मूळची उरळी कांचन येथील राधेशाम प्रजापती याच्या दारूच्या अड्ड्यावर बनवली जात होती. तेथे कुजलेला गूळ आणि उसाच्या मळीचा वापर करून ही दारू तयार होत असे. तिची नशा आणि तीव्रता वाढवण्यासाठी त्यात आधीपासूनच अत्यंत स्वस्त व शरीराला घातक असलेले नवसागर, युरिया आणि ऑक्सिटोसिन या रसायनांची भेसळ केली जात होती. प्रजापतीकडून ही दारू खरेदी केल्यानंतर योगेश वानखेडे याने त्यात प्रमाणाबाहेर मिथेनॉल हे रासायनिक द्रव्य मिसळले, ज्यामुळे दारूचे प्रमाण तर दुप्पट झाले परंतु ती अत्यंत विषारी व प्राणघातक बनली. वानखेडेने ही तयार विषारी दारू फुगेवाडीतील विरका पितापुत्रांना विकली, तसेच खडकीतील अग्रवाल, वडारवाडीतील धोत्रे, आणि हडपसर व काळेपडळ भागातील आकाश जाधव आणि अशोक हांडे यांनाही विक्रीसाठी उपलब्ध करून दिली.

मिथील अल्कोहोल म्हणजेच मिथेनॉल अत्यंत तीव्र रसायन असल्याने ते मानवी शरीरासाठी पूर्णपणे विघातक आहे. ही विषारी दारू शरीरात गेल्यावर सर्वात आधी डोळ्यांच्या नसांवर थेट आणि तीव्र हल्ला करते, ज्यामुळे अंधत्व येण्याचा धोका असतो. दारू पिणाऱ्या व्यक्तींना सुरुवातीला तीव्र मळमळ होणे आणि उलट्या होण्याचा त्रास सुरू झाला. त्यानंतर काही वेळातच त्यांच्या तोंडाला फेस आला आणि श्वास घेण्यास प्रचंड त्रास होऊ लागला. विष शरीरात वेगाने पसरल्यामुळे अवघ्या काही तासांतच सर्व मृतांचे यकृत आणि दोन्ही किडन्या पूर्णपणे निकामी झाल्या.

Web Title:
For more updates: , , stay tuned with Navakal
संबंधित बातम्या