NEET Re-Exam 2026: वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी होणाऱ्या नीट फेरपरीक्षेची तारीख जसजशी जवळ येत आहे, तसतशी केंद्र सरकारने आपली तयारी कमालीची कडक केली आहे. परीक्षेच्या आयोजनात कोणताही अडथळा किंवा गैरप्रकार होऊ नये, यासाठी दिल्लीत उच्चस्तरीय बैठकांचे सत्र सुरू झाले आहे. कॅबिनेट सचिव डॉ. टी. व्ही. सोमनाथन यांनी 12 जून रोजी नॅशनल टेस्टिंग एजन्सीच्या (NTA) महासंचालकांसोबत एक महत्त्वाची आढावा बैठक घेतली.
ही नवीन नीट परीक्षा 21 जून 2026 रोजी देशभरात घेतली जाणार आहे. ही परीक्षा पूर्णपणे पारदर्शक आणि सुरक्षित वातावरणात पार पाडण्यासाठी केंद्र सरकार, राज्य सरकारे आणि जिल्हा प्रशासन मिळून एकत्र काम करत असल्याचे सरकारने स्पष्ट केले आहे.
गडबड करणाऱ्यांना कॅबिनेट सचिवांचा थेट इशारा
या बैठकीत डॉ. सोमनाथन यांनी देशातील या सर्वात मोठ्या वैद्यकीय प्रवेश परीक्षेची विश्वासार्हता आणि सुरक्षा टिकवून ठेवण्यावर सर्वाधिक भर दिला. परीक्षा प्रक्रियेत अडथळा आणण्याचा किंवा पेपरमध्ये छेडछाड करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना त्यांनी अत्यंत कडक शब्दांत ताकीद दिली आहे:
- कडक कायदेशीर कारवाई: पुनर्रचना केलेल्या या परीक्षेच्या प्रक्रियेत जर कोणीही कोणत्याही प्रकारे अडथळा आणण्याचा, पेपर फोडण्याचा किंवा फेरफार करण्याचा प्रयत्न केला, तर त्याच्यावर कायद्याचा संपूर्ण बडगा उगारला जाईल.
- पारदर्शकता राखणार: विद्यार्थ्यांचा परीक्षा व्यवस्थेवरील विश्वास परत मिळवण्यासाठी ही परीक्षा १०० टक्के सुरक्षित पद्धतीने पार पाडणे हे प्रशासनाचे मुख्य उद्दिष्ट आहे.
देशभर बैठकांचे सत्र; तयारीचा घेतला आढावा
21 जून रोजी होणाऱ्या या परीक्षेच्या तयारीवर लक्ष ठेवण्यासाठी केंद्र सरकारने गेल्या काही दिवसांत अनेक महत्त्वाच्या बैठका घेतल्या आहेत:
- पहिली बैठक: 1 जून रोजी कॅबिनेट सचिवांनी केंद्र सरकारच्या विविध मंत्रालयांच्या सचिवांसोबत आणि तपास यंत्रणांसोबत पूर्वतयारीची चर्चा केली होती.
- दुसरी बैठक: त्यानंतर 4 जून रोजी सर्व राज्यांच्या मुख्य सचिवांसोबत बैठक घेऊन जमिनी पातळीवरील सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेण्यात आला होता.
- तिसरी बैठक: आता 12 जून रोजी थेट ‘एनटीए’च्या प्रमुखांसोबत बैठक घेऊन अंतिम तयारीला हिरवा कंदील दाखवण्यात आला आहे.
सर्व यंत्रणांमध्ये समन्वय राखण्यावर भर
केंद्र सरकारच्या म्हणण्यानुसार, या सातत्यपूर्ण बैठकांचा मुख्य उद्देश सर्व सरकारी यंत्रणांमधील समन्वय मजबूत करणे हा आहे. गेल्या काही परीक्षांमधील त्रुटी दूर करून आता अतिशय शिस्तबद्ध आणि संघटित पद्धतीने परीक्षा केंद्रांचे नियोजन केले जात आहे. कोणतीही अनुचित घटना न घडता सर्व विद्यार्थ्यांना शांततेत परीक्षा देता यावी, यासाठी राज्य आणि जिल्हा पातळीवर कडक पोलीस बंदोबस्त आणि सीसीटीव्ही पाळत ठेवली जाणार आहे.










