Sanjay Raut : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे काही खासदार एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेच्या संपर्कात असून ते लवकरच पक्षांतर करणार, अशा चर्चांनी महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात चांगलाच जोर धरला आहे. रविवारच्या ‘मातोश्री’ वरील बैठकीला केवळ ५ खासदार प्रत्यक्ष हजर असणे आणि त्यानंतर खासदार संजय देशमुख यांनी तडकाफडकी दिल्ली गाठून केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांची भेट घेणे, यामुळे या चर्चांना अधिक खतपाणी मिळाले. या संपूर्ण राजकीय घडामोडींवर शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी आज मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत अत्यंत आक्रमक आणि सविस्तर भूमिका मांडली. त्यांनी विरोधकांचा समाचार घेत शिवसेनेचे सर्व नऊ खासदार एकनिष्ठ असल्याचा पुनरुच्चार केला.
‘ऑपरेशन नव्हे, ही राजकारणातील मानवी खरेदी-विक्री’-
‘ऑपरेशन टायगर’ संदर्भात विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना संजय राऊत यांनी सत्ताधाऱ्यांवर कडाडून टीका केली. ते म्हणाले,
“ऑपरेशन हे केवळ रुग्णालयात होत असते. राजकीय नेते कधीपासून हातात कात्री आणि सुरी घेऊन शस्त्रक्रिया करायला लागले? याला राजकीय भाषेत ‘ऑपरेशन’ म्हणण्यापेक्षा ‘फोडाफोडी’ आणि मानवी खरेदी-विक्री म्हणणे अधिक संयुक्तिक ठरेल.”
गेल्या बारा वर्षांत देशात आणि महाराष्ट्रात केवळ हेच राजकारण सुरू असल्याचा आरोप त्यांनी केला. तृणमूल काँग्रेसच्या खासदारांचे उदाहरण देत त्यांनी भाजपच्या वाढत्या राजकीय महत्त्वाकांक्षेवर निशाणा साधला, मात्र शिवसेनेच्या बाबतीत येणाऱ्या फुटीच्या बातम्या पूर्णपणे कपोलकल्पित आणि तथ्यहीन असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
‘मातोश्री’चे दरवाजे सर्वांसाठी खुले; संवादाची कोणतीही कमतरता नाही
उद्धव ठाकरे हे लोकप्रतिनिधींना वेळ देत नाहीत किंवा त्यांचा निधी व प्रवासाबाबत खासदारांमध्ये नाराजी आहे, या दाव्यांचा राऊत यांनी खरपूस समाचार घेतला. महाराष्ट्राच्या राजकारणात ज्येष्ठ नेते शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्याइतका सर्वसामान्य कार्यकर्ते व लोकप्रतिनिधींना सुलभतेने भेटणारा दुसरा कोणताही मोठा नेता नाही, असे ते म्हणाले. ‘मातोश्री’चे दरवाजे २४ तास सर्वांसाठी उघडे असतात. ग्रामीण भागातील खासदार असो वा विधिमंडळ अधिवेशनासाठी मुंबईत आलेले आमदार, सर्व जण न चुकता उद्धव ठाकरेंची भेट घेतात. त्यामुळे अंतर्गत नाराजीच्या वृत्तामध्ये तिळमात्रही सत्य नसून, शिवसेनेचे सर्व नऊ खासदार एकसंध आहेत आणि भविष्यातही एकत्रच राहतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
केंद्रीय मंत्र्यांच्या भेटीवर आणि केंद्रीय यंत्रणांच्या धाकावर भाष्य
खासदार संजय देशमुख यांच्या दिल्ली दौऱ्यावर स्पष्टीकरण देताना संजय राऊत यांनी सांगितले की, लोकप्रतिनिधी आपल्या मतदारसंघाच्या कामानिमित्त कोणत्याही मंत्र्याला भेटू शकतात. “उद्या माझ्या मतदारसंघातील विकासकामांसाठी मी स्वतः पंतप्रधानांचीही भेट घेऊ शकतो, यात नवल ते काय?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
यावेळी त्यांनी केंद्रीय यंत्रणांच्या गैरवापरावरही बोट ठेवले. ते म्हणाले की, जर आमच्याकडे ईडी (ED) सारखी यंत्रणा असती, तर आमचाही धाक राहिला असता. सध्या देशात जो काही धाक दिसतो आहे, तो केवळ पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांच्या हातातील सीबीआय (CBI) आणि ईडी या यंत्रणांमुळे आहे, तो त्यांचा वैयक्तिक दरारा नाही. “उद्या तुमची सत्ता नसेल, तेव्हा तुमचा हा धाक कुठे असेल?” असा थेट इशारा त्यांनी सत्ताधाऱ्यांना दिला.
‘उद्धव ठाकरेंनी सुनावल्याचे वृत्त खोटे; ते विधान चार वर्षांपूर्वीचे’
बैठकीत उद्धव ठाकरे यांनी ‘ज्यांना जायचे आहे त्यांनी खुशाल जावे’ असे हताश वक्तव्य केल्याची चर्चा राऊत यांनी पूर्णपणे फेटाळून लावली. त्या बैठकीला आपण स्वतः पूर्ण वेळ उपस्थित असल्याचे सांगत राऊत म्हणाले की, उद्धव ठाकरेंच्या तोंडी हे वाक्य जाणीवपूर्वक कोंबण्यात आले आहे. हे विधान सध्याचे नसून चार वर्षांपूर्वीचे आहे, जेव्हा आमदारांना हॉटेलमध्ये सुरक्षित ठेवलेले असतानाही काही जण पळून जात होते. त्यावेळी रागाच्या भरात त्यांनी असे म्हटले होते. या ताज्या बैठकीत अशा प्रकारची कोणतीही चर्चा झालेली नाही, अशी ग्वाही त्यांनी दिली.
वर्धापन दिनी होणाऱ्या ‘चमत्कारा’च्या दाव्यावर राऊतांचा पलटवार
येत्या १९ जून रोजी असणाऱ्या शिवसेनेच्या वर्धापन दिनी ठाकरे गटाचे खासदार शिंदे गटात प्रवेश करणार, या विरोधकांच्या दाव्याचा राऊत यांनी समाचार घेतला. चालू वर्ष हे हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे जन्मशताब्दी वर्ष असल्याचे सांगत, दिल्लीच्या चरणी लीन झालेल्या या नेत्यांनी केवळ पक्षात खंजीर खुपसण्याचे कारस्थान रचले आहे, अशी टीका त्यांनी केली.
शेवटी, आपल्या सर्व खासदारांच्या निष्ठेची ग्वाही देताना त्यांनी सांगितले की, बैठकीला उपस्थित असलेल्या सर्व खासदारांनी आपापल्या श्रद्धेनुसार आई तुळजाभवानी, शिर्डीचे साईबाबा, स्वतःची आई आणि मुलांची शपथ घेऊन ‘साहेब, आम्ही तुमच्यासोबतच आहोत’ असा शब्द दिला आहे. हे सर्व खासदार सच्चे हिंदुत्ववादी असल्याने ते आपल्या शपथेचे आणि निष्ठेचे काटेकोरपणे पालन करतील आणि पक्षाशी कधीही प्रतारणा करणार नाहीत, असा ठाम विश्वास संजय राऊत यांनी व्यक्त केला.










