Sanjay Dina Patil : उद्धव ठाकरे गटाला मोठा धक्का देत त्यांच्या ६ खासदारांनी अधिकृतपणे मुख्यमंत्री आणि शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत पक्षात जाहीर प्रवेश केला आहे. या खासदारांचे स्वागत करताना एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या कामाचे कौतुक केले आणि ‘सहा टायगर’ शिवसेनेत दाखल झाल्याचे जाहीर केले.
या पक्षप्रवेशानंतर इतर खासदारांनी माध्यमांशी बोलणे टाळले असले, तरी खासदार संजय दिना पाटील यांनी आपली आक्रमक भूमिका मांडत जुन्या पक्षातील अंतर्गत नाराजी चव्हाट्यावर आणली आहे.
संजय दिना पाटील यांनी स्पष्ट केले की, ते स्वतःहून कधीही उद्धव ठाकरेंकडे आमदारकी किंवा खासदारकी मागायला गेले नव्हते, तर स्वतः ठाकरेंनीच त्यांना बोलावून घेतले होते. पक्षात आपल्याला उद्धव ठाकरेंबाबत वैयक्तिक कोणतीही अडचण नव्हती, परंतु पक्षातील काही लोकांना दिलेली आश्वासने पाळली गेली नाहीत. तसेच आपण पक्षात राहावे असे कदाचित काही नेत्यांना वाटत नव्हते, असा आरोपही त्यांनी केला.
‘अन्यथा कुणाला स्मशानात जावे लागेल’; संजय दिना पाटलांचा शिवसैनिकांना थेट इशारा
पक्ष बदलल्यानंतर उद्धव ठाकरे गटातील संतप्त शिवसैनिकांकडून दिल्या जाणाऱ्या आव्हानांवर संजय दिना पाटील यांनी अत्यंत कडक शब्दांत पलटवार केला आहे:
- आक्रमक शिवसैनिकांना इशारा: कोणाच्याही सांगण्यावरून किंवा भडकवण्याला बळी पडून माझ्याविरुद्ध कोणीही कोणतेही कृत्य करू नये. जर कोणी तसा प्रयत्न केला, तर एखाद्याला थेट दवाखान्यात, तर कुणाला स्मशानभूमीत जावे लागेल, अशा तीव्र शब्दांत त्यांनी ठाकरेंच्या कार्यकर्त्यांना सुनावले आहे.
- सुरक्षेबाबत मोठे विधान: मला कोणत्याही सरकारी सुरक्षेची गरज नाही, उलट ती सुरक्षा त्यांनाच द्या. जर माझ्या अनुपस्थितीत त्यांच्यावर काही हल्ला झाला, तर त्याचा आळ माझ्यावर येईल. पोलिसांसमोरच मी सुरक्षा नाकारली आहे, कारण सुरक्षा नसेल तर समोरच्याला मी स्वतः माझ्या पद्धतीने योग्य ते उत्तर देऊ शकेन.
- संजय राऊतांवर निशाणा: उद्धव ठाकरेंनी माझ्या मतदारसंघात येऊन जी सभा घेतली आणि त्यात संजय राऊतांनी जे भाषण केले, त्यावरही पाटलांनी तीव्र आक्षेप घेतला आहे.
“उद्धव ठाकरेंनी आधीच मतदारसंघात यायला हवे होते”
संजय दिना पाटील यांनी पक्षातील अंतर्गत वादावर बोलताना सांगितले की, पक्षप्रमुख उद्धव ठाकरे काल मतदारसंघात आले, हेच जर त्यांनी आधी केले असते तर आज ही वेळ आली नसती. मला ज्या व्यक्तीसोबत अडचण होती, त्याला समोर बोलावून चर्चा केली असती किंवा ज्याने मला शिवीगाळ केली, त्याला माफी मागायला लावली असती, तर हा वाद उद्भवलाच नसता. मी जर गेलो नसतो तर तिथला कोरमही पूर्ण झाला नसता, असा दावाही त्यांनी केला. या बंडखोरीमुळे मुंबईतील ठाकरे गटाला मोठा धक्का बसल्याचे मानले जात आहे.
हे देखील वाचा – Kunal Shah WhatsApp Head: भारतीय उद्योजकाचा डंका! ‘CRED’ चे संस्थापक कुणाल शाह सांभाळणार व्हॉट्सअॅपची जागतिक धुरा









