Home / महाराष्ट्र / Maharashtra Rain : मुसळधार पावसाची ‘धुवांधार बॅटिंग’;कोकणात वरुणराजाचे रौद्र रूप, संपूर्ण महाराष्ट्र हायअलर्टवर? पुढील ४८ तासात अतिमुसळधार पावसाचा इशारा

Maharashtra Rain : मुसळधार पावसाची ‘धुवांधार बॅटिंग’;कोकणात वरुणराजाचे रौद्र रूप, संपूर्ण महाराष्ट्र हायअलर्टवर? पुढील ४८ तासात अतिमुसळधार पावसाचा इशारा

Maharashtra Rain : जून महिनाभर दडी मारलेल्या पावसाने राज्यातील खरीप हंगामाला मोठा फटका दिला होता. कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यात जूनअखेर ४२.३५...

By: Team Navakal
Maharashtra Rain
Social + WhatsApp CTA

Maharashtra Rain : जून महिनाभर दडी मारलेल्या पावसाने राज्यातील खरीप हंगामाला मोठा फटका दिला होता. कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यात जूनअखेर ४२.३५ टक्के पावसाची तूट नोंदवल्याने भात लागवड रखडली होती आणि बळीराजा तीव्र चिंतेत ग्रासला होता. मात्र, जुलैच्या पहिल्याच आठवड्यात पावसाने संपूर्ण राज्यात दमदार पुनरागमन केले आहे. भारतीय हवामान विभागाने (IMD) पुढील २४ ते ४८ तासांसाठी कोकण, सह्याद्रीचा घाटमाथा, मुंबई महानगर प्रदेश (MMR) आणि राज्यातील इतर अनेक जिल्ह्यांसाठी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा देत ‘ऑरेंज’ आणि ‘यलो’ अलर्ट जारी केला आहे.

कोकणात निसर्गाची कृपा आणि आपत्ती; मुंबई-गोवा महामार्ग ठप्प
कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यात यंदाचा जून महिना गेल्या पाच वर्षांतील सर्वात कोरडा महिना ठरला होता. जिल्ह्यात सरासरी ८८० मिमी पावसाच्या तुलनेत केवळ ५०७.३ मिमी पावसाची नोंद झाली होती. मात्र, गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार आणि संततधार पावसामुळे रखडलेल्या भातशेतीला अखेर नवसंजीवनी मिळाली आहे.

एकीकडे शेतीला दिलासा मिळाला असला, तरी दुसरीकडे जनजीवनावर याचे विपरीत परिणाम झाले आहेत. कणकवली नगरपरिषदेच्या ५० वर्षे जुन्या भाजी मार्केट इमारतीचा एक मोठा भाग अचानक कोसळला; तर देवगड तालुक्यात एका घराची संरक्षण भिंत कोसळून एक महिला गंभीर जखमी झाली. शेजारील रत्नागिरी जिल्ह्यातील लांजा तालुक्यात, मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील वेरळ घाटात चौपदरीकरणाच्या कामासाठी कापलेल्या डोंगराचा मोठा भाग, माती आणि दगड थेट महामार्गावर कोसळले. या दरड कोसळीमुळे महामार्गावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती. अखेर राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने जेीसीबी (JCB) यंत्राच्या साहाय्याने युद्धपातळीवर मातीचा ढिगारा हटवल्यानंतर सुमारे एका तासाने या मार्गावरील वाहतूक पूर्वपदावर आली.

मुंबई महानगर प्रदेशात दाणादाण; तरुणींना विजेचा धक्का
मुसळधार पावसामुळे मुंबई, नवी मुंबई आणि वरळी परिसरातील अनेक प्रमुख रस्त्यांवर पाणी साचल्याने वाहतूक व्यवस्था कोलमडली. अंधेरी सबवे, मालाड सबवे, जोगेश्वरी, कुर्ला, मुलुंड, कांजूरमार्ग, गोरेगाव फिल्म सिटी रस्ता आणि संतोषनगर परिसरात पूरसदृश परिस्थिती निर्माण झाल्याने वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या. गोरेगाव फिल्म सिटी रस्त्यावर काही ठिकाणी दोन ते तीन फुटांपर्यंत पाणी साचल्यामुळे हा मार्ग काही काळासाठी वाहतुकीसाठी बंद करण्यात आला. मालाड सबवेमध्ये सुमारे एक फूट पाणी साचल्याने पश्चिम उपनगरातील वाहनांचा वेग मंदावला. त्यातच मालाड सबवेबाहेरील मुख्य नाल्याचे लोखंडी झाकण तुटल्यामुळे पाण्याचा निचरा होण्यात अडथळा निर्माण झाला आणि वाहतूक कोंडीत आणखी भर पडली.

कल्याण-डोंबिवली परिसरालाही रात्रभर कोसळलेल्या मुसळधार पावसाने झोडपून काढले. येथे अवघ्या २४ तासांत ८८.८ मिमी पावसाची नोंद झाली असून, वादळी वाऱ्यामुळे शहरातील विविध भागांत १८ हून अधिक मोठी झाडे उन्मळून पडली. या दुर्घटनेत अनेक वाहनांचे मोठे नुकसान झाले. उच्चदाब वीजवाहिन्यांवर (High-tension wires) झाडे कोसळल्याने अनेक परिसरांचा वीजपुरवठा खंडित झाला, तर मलंग रोडसह अनेक प्रमुख मार्गांवरील वाहतूक विस्कळीत झाली.

वसई-विरारमध्येही पावसाने हाहाकार उडवला. वसई पूर्वेकडील राजावळी-वाघराळ पाडा परिसरात रस्त्यावरून वाहणाऱ्या पाण्याच्या प्रचंड प्रवाहात दोन चारचाकी गाड्या वाहून गेल्या. सुदैवाने, एका कार चालकाने वेळेत गाडीबाहेर उडी मारल्याने त्याचा जीव थोडक्यात वाचला. नवी मुंबईतील नेरूळ येथील एल.पी. ब्रिजखाली साचलेल्या पाण्यात शॉर्टसर्किटमुळे वीजप्रवाह (करंट) उतरला. या पाण्यातून जात असलेल्या कॉलेजच्या दोन तरुणींना विजेचा तीव्र धक्का बसला आणि त्या पाण्यात कोसळल्या. आसपासच्या नागरिकांनी दाखवलेल्या प्रसंगावधानाने दोघींना तातडीने रिक्षातून डी. वाय. पाटील रुग्णालयात दाखल केले असून, सध्या त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

विदर्भातील बुलडाण्यात अतिवृष्टी; शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट
विदर्भातील बुलडाणा जिल्ह्यात गेल्या चार-पाच दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार आणि मुसळधार पावसाने जनजीवनासह शेतीचे अतोनात नुकसान केले आहे. जिल्ह्यातील मेहकर तालुका, धाड, जामठी, वरुड, सोयगाव, ब्रह्मपुरी, दुधा आणि रायपूर परिसरात झालेल्या अतिवृष्टीमुळे स्थानिक बाणगंगा नदीसह अनेक लहान-मोठे नदी-नाले दुथडी भरून वाहू लागले आहेत. या पूरामुळे शेकडो एकर शेती पाण्याखाली गेली आहे. शेतांमध्ये मोठ्या प्रमाणावर पाणी साचल्याने पेरलेली पिके कुजण्याची शक्यता निर्माण झाली असून, शेतकऱ्यांसमोर आता दुबार पेरणीचे मोठे संकट उभे राहिले आहे.

Web Title:
For more updates: , , stay tuned with Navakal
संबंधित बातम्या