Home / महाराष्ट्र / Tukaram Munde : धडाकेबाज आयएएस अधिकारी तुकाराम मुंडे यांचे ‘एफडीए’त धाडसत्र; पहिल्यांदाच खाजगी आयुष्यावरील पडदा हटवत पत्नी आणि मुलांविषयी व्यक्त केली हळवी भावना

Tukaram Munde : धडाकेबाज आयएएस अधिकारी तुकाराम मुंडे यांचे ‘एफडीए’त धाडसत्र; पहिल्यांदाच खाजगी आयुष्यावरील पडदा हटवत पत्नी आणि मुलांविषयी व्यक्त केली हळवी भावना

Tukaram Munde : आपल्या धडाकेबाज कार्यपद्धतीमुळे आणि कर्तव्यनिष्ठतेमुळे संपूर्ण महाराष्ट्रात परिचित असलेले वरिष्ठ आयएएस (IAS) अधिकारी तुकाराम मुंडे सध्या ‘अन्न...

By: Team Navakal
Tukaram Munde
Social + WhatsApp CTA

Tukaram Munde : आपल्या धडाकेबाज कार्यपद्धतीमुळे आणि कर्तव्यनिष्ठतेमुळे संपूर्ण महाराष्ट्रात परिचित असलेले वरिष्ठ आयएएस (IAS) अधिकारी तुकाराम मुंडे सध्या ‘अन्न व औषध प्रशासन’ (FDA) विभागाचे आयुक्त म्हणून कार्यरत आहेत. पदभार स्वीकारताच त्यांनी नेहमीप्रमाणे आपल्या शिस्तप्रिय आणि आक्रमक शैलीची छाप पाडत राज्यभरात बनावट आणि भेसळयुक्त अन्नपदार्थ विक्रेत्यांचे धाबे दणाणून सोडले आहे. कर्तव्य बजावताना कोणाचीही गय न करणारे तुकाराम मुंडे नुकतेच एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीमुळे पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आले आहेत. या मुलाखतीत त्यांनी प्रशासकीय कारकीर्दीसोबतच पहिल्यांदाच आपल्या वैयक्तिक आणि कौटुंबिक आयुष्याविषयी अत्यंत मोकळेपणाने भाष्य केले.

‘एफडीए’ आयुक्त पदाची सूत्रे हाती घेताच राज्यभरात धाडसत्र
तुकाराम मुंडे यांनी अन्न व औषध प्रशासन (FDA) विभागाची धुरा हाती घेतल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रात अनधिकृत आणि नियमबाह्य काम करणाऱ्यांवर कठोर कारवाईची मोहीम उघडली आहे. मुंबई, ठाणे, पुणे या महानगरांसह धाराशिव, छत्रपती संभाजीनगर, वाशिम आणि अकोला अशा विविध जिल्ह्यांमध्ये ‘एफडीए’ने धडक कारवाई सत्र सुरू केले आहे. स्वच्छतेचे नियम न पाळणाऱ्या आणि ग्राहकांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या अनेक नामांकित हॉटेल्सना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत, तर काही आस्थापनांचे परवाने (Licenses) थेट रद्द करण्यात आले आहेत.

२३ बदल्यांचा इतिहास आणि लोकचळवळ:
तुकाराम मुंडे यांची ओळख जितकी शिस्तप्रिय अधिकारी म्हणून आहे, तितकीच ती त्यांच्या वारंवार होणाऱ्या बदल्यांमुळेही आहे. आतापर्यंत त्यांच्या कारकीर्दीत तब्बल २३ वेळा बदल्या झाल्या आहेत. त्यांनी एखाद्या विभागात अन्यायाविरुद्ध आणि भ्रष्टाचाराविरुद्ध मोठी कारवाई सुरू केली की, राजकीय दबावापोटी तात्काळ त्यांची बदली केली जाते, असा इतिहास आहे. अनेकदा त्यांच्या या तडकाफडकी बदलीच्या निर्णयाविरोधात सामान्य जनता रस्त्यावर उतरून आंदोलन करतानाही दिसली आहे.

लग्नापूर्वी पत्नीसमोर ठेवली होती ‘ही’ विशेष अट
मुलाखतीदरम्यान तुकाराम मुंडे यांनी त्यांच्या लग्नाचा आणि वैयक्तिक आयुष्यातील एक रंजक किस्सा सांगितला. ते म्हणाले,
“माझे लग्न ठरत होते, त्या काळात मी नागपूर येथे कार्यरत होतो. जेव्हा आम्ही लग्नासाठी पहिल्यांदा भेटलो, तेव्हा मी तिच्यासमोर एकच आणि अत्यंत स्पष्ट अट ठेवली होती. मी तिला सांगितले होते की, ‘तू जर माझ्याकडे मोठी शासकीय गाडी, सुख-सुविधा किंवा आलिशान स्वप्ने बघून लग्न करणार असशील, तर ते माझ्यासोबत कधीच शक्य नाही. माझ्या जगण्याच्या पद्धतीचे वास्तव मी तिच्यासमोर स्पष्ट ठेवले होते आणि तुझ्या अपेक्षा वेगळ्या असतील, तर आपण हा निर्णय इथेच थांबवू’, असे मी स्पष्ट केले होते.”

त्यांच्या पत्नीने ही अट सहर्ष मान्य केली. मुंडे यांनी पुढे सांगितले की, “मी आज जेव्हा तिला गंमतीने विचारतो की, तू माझ्याशी लग्न का केलेस? तेव्हा तिचे उत्तर असते की, ‘तुमची समाजाप्रती असलेली प्रामाणिक तळमळ आणि निष्ठा बघून मी तुमच्याशी लग्न करण्याचा निर्णय घेतला.’ माझ्या या खडतर प्रवासात माझ्या पत्नीची साथ माझ्यासाठी अत्यंत मोलाची ठरली आहे.”

वारंवार होणाऱ्या बदल्यांचा मुलांच्या शिक्षणावर परिणाम
नेहमी अत्यंत कणखर आणि कठोर भूमिकेत दिसणारे तुकाराम मुंडे आपल्या मुलांविषयी बोलताना काहीसे हळवे झाल्याचे पाहायला मिळाले. आपल्या बदल्यांच्या परिणामाविषयी सांगताना ते म्हणाले, “माझी जवळपास प्रत्येक वर्षी बदली होत आल्यामुळे माझ्या मुलांची शाळा देखील मला दरवर्षी बदलावी लागली. याचा परिणाम असा झाला की, माझ्या मुलाला दीर्घकाळासाठी कधी मित्रच बनवता आले नाहीत. त्याची मैत्री एका जागी टिकू शकली नाही. पण ठीक आहे, ही माझ्या कर्तव्याची बाजू आहे आणि याबद्दल मला कोणाचीही सहानुभूती नको आहे.”

Web Title:
For more updates: , stay tuned with Navakal
संबंधित बातम्या