Home / महाराष्ट्र / Supriya Sule : सत्तेच्या तुकड्यांवर लाळ घोटणारे आम्ही नाही; जयंत पाटील-मुख्यमंत्री भेटीनंतर सुप्रिया सुळेंनी एका घावात दोन तुकडे..

Supriya Sule : सत्तेच्या तुकड्यांवर लाळ घोटणारे आम्ही नाही; जयंत पाटील-मुख्यमंत्री भेटीनंतर सुप्रिया सुळेंनी एका घावात दोन तुकडे..

Supriya Sule : राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि आमदार जयंत पाटील यांनी काल रात्री उशिरा राज्याचे मुख्यमंत्री...

By: Team Navakal
Supriya Sule
Social + WhatsApp CTA

Supriya Sule : राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि आमदार जयंत पाटील यांनी काल रात्री उशिरा राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची त्यांच्या ‘वर्षा’ या शासकीय निवासस्थानी भेट घेतली. या भेटीदरम्यान उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादीचे (अजित पवार गट) प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि पक्षाचे ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल हेदेखील वर्षा बंगल्यावर उपस्थित असल्याचा दावा काही माध्यमांनी केला होता. जयंत पाटील यांच्या या रात्रीच्या भेटीमुळे शरद पवारांची राष्ट्रवादीही आता सत्ताधारी महायुतीसोबत जाणार का आणि सत्तेत सहभागी होणार का, अशा जोरदार राजकीय चर्चांना उधाण आले होते. या वाढत्या वावड्यांवर आणि उलटसुलट चर्चांवर अखेर राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या नेत्या आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी आज दुपारी १२ वाजता जाहीर पत्रकार परिषद घेऊन सविस्तर खुलासा केला आहे. पक्षाची जाणीवपूर्वक बदनामी केली जात असल्याचा घणाघाती आरोप त्यांनी यावेळी केला.

“एनडीएमध्ये जाण्याचा प्रश्नच नाही, ही केवळ पक्षाची बदनामी”
पत्रकार परिषदेत माध्यमांशी बोलताना खासदार सुप्रिया सुळे यांनी पक्षाची भूमिका अत्यंत आक्रमकपणे मांडली. त्या म्हणाल्या, “आमच्या पक्षाबाबत आज सकाळपासून विविध प्रसारमाध्यमांमध्ये केवळ ‘सूत्रांच्या’ हवाल्याने मनघडंत बातम्या चालवल्या जात आहेत. या संदर्भात आमच्या पक्षाकडून अद्याप कोणीही अधिकृत भूमिका मांडलेली नव्हती. अशा निराधार बातम्यांमुळे राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाबाबत महाविकास आघाडीतील आमच्या सहकाऱ्यांमध्ये आणि सर्वसामान्य कार्यकर्त्यांमध्ये गैरसमज निर्माण होऊ शकतो. म्हणूनच हा संभ्रम दूर करण्यासाठी मी ही पत्रकार परिषद घेत आहे.”

सुप्रिया सुळे यांनी पुढे सांगितले की, पत्रकार परिषदेला येण्यापूर्वी त्यांनी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे खासदार संजय राऊत, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष तसेच काँग्रेस नेते सतेज (बंटी) पाटील यांच्याशी फोनवर सविस्तर चर्चा केली आहे. याशिवाय, आपल्या पक्षाच्या सर्व आमदार आणि खासदारांशीही संवाद साधला आहे. एनडीएमध्ये (NDA) सहभागी होण्याबाबत पक्षाच्या कोणत्याही नेत्याने किंवा लोकप्रतिनिधीने कुठेही कसलीही भूमिका मांडलेली नाही. “आमच्या पक्षाकडे ईडी, सीबीआय किंवा आयकर विभाग (Income Tax) यांसारख्या यंत्रणांचा पाश नसल्यामुळे, आमच्या पक्षाला बदनाम करण्यासाठी हे जाणीवपूर्वक रचलेले राजकीय कारस्थान आहे,” अशा शब्दांत त्यांनी महायुतीत सहभागी होण्याच्या चर्चा पूर्णपणे फेटाळून लावल्या.

जयंत पाटील मुख्यमंत्र्यांना का भेटले? ‘अर्थमंत्रिपदा’च्या चर्चांचे वास्तव
जयंत पाटील हे राष्ट्रवादी (शरद पवार गट) सत्तेत सहभागी होणार असल्यामुळेच थेट ‘अर्थमंत्रिपदा’बाबत वाटाघाटी करण्यासाठी मुख्यमंत्र्यांना भेटायला गेले होते, असा दावा काही राजकीय विश्लेषकांकडून केला जात होता. या अफवेचा समाचार घेताना सुप्रिया सुळे यांनी भेटीचे मूळ कारण जाहीर केले.
१. उजळ माथ्याने भेट: जयंत पाटील हे लपूनछपून किंवा डोक्यावर हुडी घालून मुख्यमंत्र्यांना भेटायला गेले नव्हते. त्यांनी रीतसर अधिकृत वेळ मागून घेतली होती. ते पुढच्या दाराने गेले आणि उजळ माथ्याने पुढच्या दारानेच बाहेर पडले.
२. भेटीचे मूळ कारण: सांगली जिल्ह्यातील ईश्वरपूर (इस्लामपूर) तालुक्यातील जनतेतून थेट निवडून आलेल्या नगराध्यक्षांवर प्रशासनाने अचानक अत्यंत बेकायदेशीरपणे अपात्रतेची कारवाई केली आहे. या अन्यायकारक कारवाईच्या विरोधात आणि स्थानिक लोकशाहीच्या रक्षणासाठी जयंत पाटील मुख्यमंत्र्यांना भेटले.
३. इतर नेत्यांच्या उपस्थितीवर प्रश्नचिन्ह: या बैठकीच्या वेळी तिथे सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल उपस्थित होते की नाही, याची मला कोणतीही कल्पना नाही. तो जर महायुतीचा अंतर्गत प्रश्न असेल, तर तो तुम्ही मुख्यमंत्र्यांनाच विचारला पाहिजे, असे सुळे यांनी स्पष्ट केले.

मतदारसंघ पुनर्रचना विधेयकाबाबत (Delimitation Bill) पक्षाची भूमिका
केंद्र सरकार आगामी संसदेच्या पावसाळी अधिवेशनात आणू पाहत असलेल्या ‘मतदारसंघ पुनर्रचना घटनादुरुस्ती विधेयका’ला शरद पवारांचा पक्ष पाठिंबा देणार, अशी एक चर्चा राजकीय वर्तुळात आहे. यावर पक्षाची तांत्रिक आणि राजकीय भूमिका स्पष्ट करताना सुप्रिया सुळे म्हणाल्या की,”यापूर्वी केंद्र सरकारने जे विधेयक (बिल) आणले होते, त्याचा मसुदा आम्हाला मान्य नव्हता. त्यामुळे आम्ही संसदेत त्या बिलाला कडाडून विरोध केला होता. त्या बिलात आवश्यक त्या कायदेशीर दुरुस्त्या करून नवीन सुधारित प्रस्ताव आमच्याकडे पाठवावा, अशी सूचना आम्ही सरकारला केली होती.

Web Title:
For more updates: , , stay tuned with Navakal
संबंधित बातम्या