Abhijeet Dipke : राजधानी दिल्लीतील जंतरमंतर मैदानावरून सोमवारी संसदेच्या दिशेने निघालेल्या ‘कॉकरोच जनता पार्टी’च्या (CJP) मोर्चावर दिल्ली पोलिसांनी केलेल्या अमानुष आणि क्रूर लाठीमराचे तीव्र पडसाद उमटत आहेत. या हिंसक कारवाईच्या पार्श्वभूमीवर, ‘सीजेपी’चे संस्थापक आणि आंदोलनाचे प्रमुख अभिजीत दीपके (Abhijeet Dipke) यांनी मंगळवारी सकाळी जंतरमंतर येथे घेतलेल्या जाहीर पत्रकार परिषदेत केंद्र सरकार आणि दिल्ली पोलीस प्रशासनावर अत्यंत गंभीर व खळबळजनक आरोप केले. केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या बचावासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) यांना देशातील तरुण विद्यार्थ्यांचे अजून किती बळी हवे आहेत, असा संतप्त आणि थेट सवाल त्यांनी या वेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना उपस्थित केला.
“१२ वर्षांच्या मुलीचे डोके फोडले, तरुणीचे कपडे फाडून छातीवर दिला पाय!” – दिपकेंचा खळबळजनक आरोप
पत्रकार परिषदेत बोलताना अभिजीत दीपके यांनी कालच्या आंदोलनादरम्यान पोलिसांनी केलेल्या मारहाणीचे अत्यंत अंगावर काटा आणणारे अनुभव कथन केले. ते म्हणाले, “सोमवारी संसदेकडे शांततापूर्ण मार्गाने कूच करणाऱ्या तरुण-तरुणींना दिल्ली पोलिसांनी शत्रूसारखे अमानुषपणे मारले आहे. पोलिसांनी एका १२ वर्षांच्या लहान मुलीचे डोके फोडले, तर १५-१६ वर्षांच्या निष्पाप मुलींचे गळे दाबण्यात आले. मी स्वतः डोळ्यांनी एका तरुणीला पोलिसांनी अत्यंत निर्घृणपणे मारताना पाहिले आहे. पुरुष पोलिसांनी त्या तरुणीचे कपडे फाडले आणि तिच्या छातीवर पाय देऊन तिला मारहाण केली. दुसऱ्या एका तरुणीच्या गळ्यावर पोलिसांनी काठीने गंभीर प्रहार केल्यामुळे ती रक्तबंबाळ झाली असून, सध्या तिच्यावर रुग्णालयात अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. या अमानवी कृत्यांवरून दिल्ली पोलिसांना आंदोलक विद्यार्थ्यांचे थेट खून करण्याचेच आदेश वरून देण्यात आले होते का, असा संशय येतो.”
त्यांनी पुढे बोलताना थेट पंतप्रधान मोदींवर तोफ डागली. “जो धर्मेंद्र प्रधान देशातील लाखो विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळून अनेक विद्यार्थ्यांच्या आत्महत्येला जबाबदार ठरला आहे, त्याला पदावर टिकवून ठेवण्यासाठी आणि वाचवण्यासाठी सरकारला अजून किती मुलांचे खून करायचे आहेत?” असा घणाघाती आरोप त्यांनी केला.
व्यासपीठ तोडले तरी आंदोलन सुरूच; जखमी विद्यार्थी पुन्हा मैदानात
अभिजीत दीपके यांनी सांगितले की, कालच्या तीव्र संघर्षानंतर रात्री १० वाजताच्या सुमारास जेव्हा ते आणि त्यांचे सहकारी पुन्हा जंतरमंतर मैदानावर परतले, तेव्हा प्रशासनाने आंदोलकांचे मनोधैर्य खचवण्यासाठी तिथले मुख्य व्यासपीठ (स्टेज) आणि तंबू पूर्णपणे तोडून टाकले होते. मात्र, या दडपशाहीला न जुमानता विद्यार्थ्यांनी उघड्या मैदानावरच आपला मुक्काम ठोकला.
“चर्चेच्या बहाण्याने डांबले, नाव लपवून मुलींना मारले”; पोलिसांच्या क्रूरतेमुळे सोनम वांगचुक यांचे उपोषण सुरूच, ‘सीजेपी’ प्रमुख अभिजीत दिपकेंचा सरकारला थेट इशारा-
कॉकरोच जनता पार्टी’च्या (CJP) आंदोलकांवर सोमवारी झालेल्या पोलीस कारवाईत १५० हून अधिक विद्यार्थी गंभीर जखमी झाले असून, संपूर्ण जंतरमंतर परिसर छावणीत रूपांतरित झाला आहे. या अमानुष दडपशाहीनंतर पक्षाचे संस्थापक अभिजीत दीपके यांनी सरकार आणि दिल्ली पोलिसांवर अत्यंत खळबळजनक आरोप केले आहेत. पोलिसांच्या याच अमानवी क्रूरतेचा निषेध म्हणून ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांनी आपला उपोषण सोडण्याचा निर्णय मागे घेतला असून, त्यांचे आमरण उपोषण रुग्णालयातच सुरू ठेवण्याचा निर्धार केला आहे.
पोलिसांकडून नावाच्या पट्ट्या हटवून मुलींवर जीवघेणा हल्ला; चेंगराचेंगरीत तरुणी गंभीर
जंतरमंतर येथे पत्रकारांशी बोलताना अभिजीत दीपके यांनी पोलिसांच्या अमानुष कारवाईचा थरार मांडला. ते म्हणाले, “काल आंदोलनादरम्यान एका निष्पाप तरुणीच्या गळ्यावर पोलिसांनी अत्यंत क्रूरतेने लाठीचा जोरदार प्रहार केला. ती जागीच कोसळल्यानंतर तिथे एकच धावपळ उडाली आणि तिच्या अंगावरून इतर लोक गेले, ज्यामुळे तिची प्रकृती अत्यंत चिंताजनक बनली असून सध्या ती रुग्णालयात मृत्यूशी झुंज देत आहे. या संपूर्ण कारवाईत १५० हून अधिक तरुण-तरुणी रक्तबंबाळ झाले असून ही निव्वळ तानाशाही (हुकूमशाही) आहे. विशेष म्हणजे, मारहाण करताना आपली ओळख लपवण्यासाठी पोलिसांनी आपल्या गणवेशावरील नावाची पट्टी (Name Plate) मुद्दामहून हटवली होती, जेणेकरून त्यांच्यावर कोणतीही कारवाई होणार नाही. इतकेच नव्हे तर, शांततापूर्ण आंदोलनाला हिंसक गालबोट लावण्यासाठी आंदोलनाच्या ठिकाणी अचानक दगड भरलेले ट्रक कुठून आले? हा सरळ-सरळ सरकारचा कट होता.”
सोनम वांगचुक यांच्या शरीरातील ‘मसल मास’ घटले; तरीही उपोषणावर ठाम
अभिजीत दीपके यांनी ज्येष्ठ आंदोलक सोनम वांगचुक यांच्या प्रकृतीबाबत अत्यंत भीतीदायक माहिती दिली. काल त्यांच्या उपोषणाचा २३ वा दिवस होता आणि ते हे उपोषण सोडणार होते. मात्र, जंतरमंतरवर विद्यार्थ्यांवर झालेल्या पोलिसांच्या अमानुष लाठीमाराची बातमी समजताच वांगचुक यांनी आपला विचार बदलला आणि उपोषण सुरूच ठेवण्याचा निर्णय घेतला.
सलग २३ दिवसांच्या अन्नत्यागामुळे सोनम वांगचुक यांच्या शरीरातील ‘मसल मास’ (स्नायूंची शक्ती) पूर्णपणे नष्ट झाले आहे. त्यांच्या शरीराच्या अंतर्गत अवयवांवर (Organs) याचे अत्यंत गंभीर आणि प्राणघातक दुष्परिणाम झाले आहेत. अशा अत्यंत नाजूक प्रकृतीतही त्यांनी विद्यार्थ्यांवरील अन्यायाविरोधात आपली लढाई सुरू ठेवली असून त्यांचे आमरण उपोषण अद्यापही कायम आहे.
चर्चेचा बनाव: जे.पी. नड्डा यांच्या निवासस्थानी ५ तास डांबले, मोबाईल केले जप्त
केंद्रातील भाजप सरकारने आंदोलकांशी चर्चा सुरू केल्याचा जो दावा केला होता, त्याचा बुरखाही दीपके यांनी टराटरा फाडला. ते म्हणाले, “सरकारने केवळ जगाला दाखवण्यासाठी आमच्या प्रतिनिधींना चर्चेला बोलावले. मात्र, प्रत्यक्षात तिथे पोहोचताच आमचे मोबाईल फोन जप्त करण्यात आले. केंद्रीय मंत्री जे.पी. नड्डा यांच्या निवासस्थानी आमच्या नेत्यांना तब्बल पाच तास बसवून ठेवण्यात आले. हा एक प्रकारे आमच्या नेत्यांना ताब्यात घेण्याचा आणि डांबून ठेवण्याचाच प्रकार होता. सरकारला विद्यार्थ्यांचे प्रश्न सोडवण्यात कोणताही रस नसून, केवळ आम्ही चर्चेची प्रक्रिया सुरू केली आहे, असा खोटा देखावा निर्माण करायचा आहे.”
“आता संसदेवर मोर्चा काढणार नाही, सरकारनं इथेच यावं!”; देशद्रोहाच्या आरोपांना चोख उत्तर
भविष्यातील रणनीती स्पष्ट करताना अभिजीत दीपके यांनी जाहीर केले की, “आम्ही आता येथून पुढे संसदेच्या दिशेने कोणताही मोर्चा काढणार नाही. कारण, आमच्या निष्पाप मुला-मुलींच्या जीवाला पुन्हा धोका निर्माण व्हावा आणि ते जखमी व्हावेत, असे आम्हाला वाटत नाही. आम्ही आता याच जंतरमंतर मैदानावर ठिय्या मांडून हे आंदोलन अविरत सुरू ठेवणार आहोत. आता आम्ही स्वतःहून सरकारकडे कोणत्याही चर्चेसाठी जाणार नाही. जर सरकारला खरोखरच विद्यार्थ्यांची काळजी असेल, तर त्यांनी स्वतः या आंदोलनाच्या ठिकाणी जंतरमंतरवर चर्चेसाठी यावे.”
या वेळी आपल्यावर होणाऱ्या राजकीय आरोपांचा समाचार घेताना दीपके संतप्त झाले. ते म्हणाले, “माझे पाकिस्तानशी संबंध असल्याचा खोटा आणि खोडसाळ प्रचार सत्ताधाऱ्यांकडून केला जात आहे. जर असे असेल, तर सरकारने तात्काळ त्याची उच्चस्तरीय चौकशी करावी आणि माझ्याविरुद्ध पुरावे जनतेसमोर मांडावेत. केवळ स्वतःचे अपयश लपवण्यासाठी आणि मूळ मुद्द्याला बगल देण्यासाठी अशा प्रकारची चिखलफेक केली जात आहे.









