AAP Rajya Sabha MPs Resign : ‘आम आदमी पार्टी’साठी (AAP) शुक्रवारचा दिवस अत्यंत धक्कादायक ठरला आहे. पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि राज्यसभा खासदार राघव चड्ढा यांच्यासह ७ खासदारांनी पक्षाला रामराम ठोकला आहे. विशेष म्हणजे, हे सर्व खासदार आता भारतीय जनता पक्षात (BJP) विलीन होणार आहेत.
चड्ढा यांनी स्वतः सोशल मीडियाद्वारे ही माहिती दिली असून, पक्षाच्या एकूण खासदारांपैकी दोन तृतीयांश सदस्य सोबत असल्याने त्यांचे सदस्यत्वही रद्द होणार नाही.
AAP Rajya Sabha MPs Resign : बंडाचे नेतृत्व राघव चड्ढा यांच्याकडे
काही दिवसांपूर्वीच राघव चड्ढा यांना राज्यसभेतील उपनेतेपदावरून हटवून त्यांच्या जागी अशोक मित्तल यांची नियुक्ती करण्यात आली होती. त्यानंतर शुक्रवारी चड्ढा यांनी थेट बंडाचे निशाण फडकवले.
भाजपमध्ये प्रवेश करणाऱ्या खासदारांमध्ये राघव चड्ढा यांच्यासह अशोक मित्तल, संदीप पाठक, संजीव अरोरा (राजिंदर गुप्ता), माजी क्रिकेटपटू हरभजन सिंग, विक्रमजीत सिंग साहनी आणि स्वाती मालीवाल यांचा समावेश आहे. या ७ खासदारांनी राज्यसभेच्या सभापतींकडे विलीनीकरणाची कागदपत्रे सुपूर्द केली आहेत.
AAP Rajya Sabha MPs Resign : खासदारकी का रद्द होणार नाही?
भारतीय राज्यघटनेच्या १० व्या अनुसूचीमधील (पक्षांतरबंदी कायदा) चौथ्या परिच्छेदानुसार, जर एखाद्या पक्षाचे किमान दोन तृतीयांश लोकप्रतिनिधी एकत्र येऊन दुसऱ्या पक्षात विलीन झाले, तर त्यांची खासदारकी रद्द होत नाही.
‘आप’चे राज्यसभेत एकूण १० खासदार आहेत, त्यापैकी ७ खासदार बाहेर पडल्याने हा आकडा दोन तृतीयांश पेक्षा जास्त आहे. त्यामुळे या सातही जणांचे सदस्यत्व सुरक्षित राहणार आहे. आता ‘आप’कडे संजय सिंग, बलबीर सिंग सीचेवाल आणि एन.डी. गुप्ता हे ३ खासदार शिल्लक उरले आहेत.
AAP Rajya Sabha MPs Resign : पक्षाने हकालपट्टी केली असती तर?
अनेकदा असा प्रश्न विचारला जातो की पक्षाने आधीच हकालपट्टी केली असती तर? कायद्यानुसार, पक्षाने एखाद्या खासदाराची हकालपट्टी केली तरी तो खासदार म्हणून कायम राहतो. अशा स्थितीत त्याला ‘असंलग्न’ (Unattached) सदस्य मानले जाते. मात्र, अशा खासदाराने दुसऱ्या पक्षात प्रवेश केल्यास त्याचे पद जाऊ शकते. पण चड्ढा यांच्या प्रकरणात, त्यांनी थेट गट विलीन केल्याने हा प्रश्न उद्भवत नाही.
पंजाबमध्ये केजरीवालांचे टेन्शन वाढले
हा धक्का प्रामुख्याने पंजाबमध्ये ‘आप’ला बसला आहे. कारण पक्ष सोडणाऱ्या ७ पैकी ६ खासदार पंजाबचे आहेत. २०२२ मध्ये पंजाब विधानसभेत प्रचंड बहुमत मिळाल्यानंतर हे खासदार निवडून आले होते. आता पंजाबमध्ये फक्त बलबीर सिंग सीचेवाल हे एकमेव खासदार ‘आप’कडे उरले आहेत. पंजाबमध्ये १० महिन्यांनंतर विधानसभा निवडणुका होणार आहेत, त्यापूर्वीच झालेली ही पडझड पक्षासाठी चिंतेची बाब आहे.
केजरीवाल आणि भगवंत मान यांचा संताप
या घडामोडीनंतर अरविंद केजरीवाल यांनी संताप व्यक्त केला आहे. “भाजपने पुन्हा एकदा पंजाबच्या जनतेसोबत धोका केला आहे,” असे त्यांनी म्हटले आहे. तर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी या सातही खासदारांना ‘गद्दार’ संबोधले आहे. “हे सात खासदार पंजाबचे प्रतिनिधित्व करत नाहीत, त्यांनी विश्वासघात केला असून त्यांना भाजपमध्येही काहीही फायदा मिळणार नाही,” अशी टीका मान यांनी केली आहे.
आता पुढे काय होणार?
राघव चड्ढा आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी राज्यसभेच्या सभापतींकडे विलीनीकरणाची पत्रे आणि सर्व तांत्रिक कागदपत्रे सुपूर्द केली आहेत. सभापती या कागदपत्रांची कायदेशीर पडताळणी करतील. एकदा का या गटाला अधिकृतपणे स्वतंत्र गट म्हणून मान्यता मिळाली की, ते भाजपमध्ये पूर्णपणे विलीन होतील.
हे देखील वाचा –









