Saurabh Bhardwaj on Raghav Chadha : आम आदमी पक्षातील (आप) अंतर्गत संघर्ष आता विकोपाला गेल्याचे पाहायला मिळत आहे. पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि दिल्लीचे मंत्री सौरभ भारद्वाज यांनी खासदार राघव चड्ढा यांच्यावर अत्यंत गंभीर आणि वैयक्तिक स्वरूपाचे आरोप करत त्यांच्यावर सडकून टीका केली आहे. ज्या पक्षाने राजकीय ओळख दिली आणि राज्यसभेत पाठवले, त्याच पक्षाला उद्ध्वस्त करण्यासाठी चड्ढा यांनी भारतीय जनता पक्षासोबत मिळून षडयंत्र रचल्याचा दावा भारद्वाज यांनी केला असून, त्यांच्या या विधानामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.
व्यावसायिक नीतिमत्तेचा दाखला आणि विश्वासघाताचा आरोप
सौरभ भारद्वाज यांनी राघव चड्ढा यांच्या पक्षत्यागाच्या पद्धतीवर तीव्र संताप व्यक्त केला आहे. त्यांनी एका कंपनीचे उदाहरण देत म्हटले की, “एखादा कर्मचारी जेव्हा नोकरी बदलतो, तेव्हा तो मालकाला किमान तीन महिन्यांची पूर्वसूचना (नोटीस) देतो, जेणेकरून कामाचे आणि माहितीचे रीतसर हस्तांतरण होऊ शकेल. मात्र, राघव चड्ढा यांनी ज्या पक्षाने त्यांना इतकी वर्षे साथ दिली, त्याला सोडताना केवळ सोडलेच नाही, तर त्याला पूर्णपणे बर्बाद करण्याचे कारस्थान रचले. वैयक्तिक प्रगतीसाठी अशा प्रकारे गद्दारी करणे हे केवळ अनैतिक नसून अघोरी आहे.”

‘ईडी’ची भीती आणि भाजपचे छुपे सहकार्य
भारद्वाज यांनी चड्ढा यांच्या भाजपप्रवेशामागील कारणांचा उलगडा करताना ‘अंमलबजावणी संचालनालया’चा (ED) संदर्भ दिला. त्यांच्या मते, जेव्हा तपास यंत्रणांचा फास चड्ढा यांच्याभोवती आवळला जाऊ लागला, तेव्हाच त्यांनी स्वतःच्या बचावासाठी भाजपसोबत हातमिळवणी करण्याचे ठरवले होते. हे सर्व एका मोठ्या नियोजित कटाचा भाग होते आणि भाजप पहिल्या दिवसापासून या षडयंत्रात त्यांना साथ देत होती, असा खळबळजनक आरोप भारद्वाज यांनी केला आहे.
प्रतिमा निर्मितीचे ‘राजकीय मार्केटिंग’
राघव चड्ढा यांची ‘मध्यमवर्गीयांचे प्रश्न मांडणारा युवा नेता’ ही प्रतिमा स्वतःहून निर्माण झाली नसून, ती भाजपने जाणीवपूर्वक घडवून आणली आहे, असे भारद्वाज यांनी नमूद केले. विमानतळावरील स्वस्त समोसे, ट्रायचे (TRAI) रिचार्ज नियम, पितृत्व रजा आणि झोमॅटो-स्विगी कामगारांचे प्रश्न यांसारखे विषय केंद्र सरकारच्या अजेंड्यावर आधीपासूनच होते. “हे मुद्दे केवळ चड्ढा यांना मांडायला दिले गेले, जेणेकरून त्यावर त्वरित निर्णय घेऊन त्यांची लोकप्रियता वाढवता येईल. संसदेत केंद्र सरकारचे मंत्री हे आमचेच काम आहे असे सांगून त्यांना उघडे पाडू शकले असते, पण त्यांनी मुद्दाम तसे केले नाही,” असे भारद्वाज म्हणाले.
राज्यसभेची टीम फोडल्याचा दावा आणि वैयक्तिक प्रहार
सौरभ भारद्वाज यांनी चड्ढा यांच्यावर पक्षाची राज्यसभेतील संपूर्ण टीम फोडल्याचा आरोप केला आहे. पक्षावर नाराजी असूनही अशा प्रकारे पूर्ण फळी सोबत घेऊन जाणे हे पक्षाच्या पाठीत खंजीर खुपसण्यासारखे आहे, असे ते म्हणाले. या टीकेचा रोख पुढे वैयक्तिक पातळीवर नेत भारद्वाज यांनी टोला लगावला की, “आज राघव चड्ढा यांचे लग्न होऊ शकले, त्यामागेही या पक्षाचेच योगदान आहे. कारण ‘आप’ने त्यांना राज्यसभेचा खासदार बनवले, म्हणून त्यांना ही ओळख मिळाली; अन्यथा त्यांना कोणी विचारलेही नसते.”











