Meghalaya Murder Case: मेघालयातील पूर्व खासी हिल्स परिसरात हनिमून दरम्यान झालेल्या राजा रघुवंशी याच्या बहुचर्चित हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी सोनम रघुवंशी हिला अखेर न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. सलग तीन वेळा जामीन अर्ज फेटाळल्यानंतर, शिलाँग न्यायालयाने सोनमची सुटका करण्याचे आदेश दिले. गेल्या १० महिन्यांपासून सोनम तुरुंगात होती.
Meghalaya Murder Case: नेमकी घटना काय होती?
ही घटना मे 2025 मधील आहे. उत्तर प्रदेशातील राजा आणि सोनम हे नवविवाहित जोडपे पर्यटनासाठी मेघालयातील सोहरा येथे आले होते. दरम्यान, हे जोडपे बेपत्ता झाल्याची तक्रार नोंदवण्यात आली होती. मोठ्या प्रमाणावर शोधमोहीम राबवल्यानंतर, 2 जून रोजी राजाचा मृतदेह एका खोल दरीत आढळून आला होता. या घटनेने संपूर्ण देशात खळबळ उडाली होती.
Meghalaya Murder Case: हत्येचा कट आणि अटक
तपासादरम्यान धक्कादायक माहिती समोर आली की, सोनमने तिचा प्रियकर राज कुशवाहा आणि इतर तीन साथीदारांच्या मदतीने पतीच्या हत्येचा कट रचला होता. सोनमला उत्तर प्रदेशातून ताब्यात घेण्यात आले होते. पोलिसांनी या प्रकरणात 790 पानांचे आरोपपत्र दाखल केले असून, त्यामध्ये पाचही आरोपींच्या नावांचा समावेश आहे. राज कुशवाहा आणि इतर तीन आरोपी अजूनही कोठडीत आहेत.
Meghalaya Murder Case: न्यायालयाने जामीन का दिला?
पूर्व खासी हिल्स जिल्हा आणि सत्र न्यायालयाच्या कायदेशीर सल्लागार कक्षाने सोनमच्या जामिनासाठी अर्ज केला होता. तपास पूर्ण झाला असून न्यायालयात आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे, हा मुख्य आधार जामिनासाठी देण्यात आला. सोनमने तपासात पूर्ण सहकार्य केले असून भविष्यातही ती सहकार्य करेल, असे न्यायालयाला सांगण्यात आले. 10 महिन्यांचा कारावास भोगल्यानंतर, वडिलांनी आणि चुलत भावाने जामीन रोखा भरल्यानंतर तिची शिलाँग तुरुंगातून सुटका करण्यात आली.










