Axar Patel : इंडियन प्रीमियर लीगच्या चालू हंगामात दिल्ली कॅपिटल्सला पत्कराव्या लागलेल्या पराभवानंतर, कर्णधार अक्षर पटेल याच्या रणनीतीवर क्रीडा विश्वातून टीकेची झोड उठली आहे. विशेषतः संघातील सर्वात अनुभवी आणि जागतिक दर्जाची फिरकी जोडी असलेल्या अक्षर पटेल आणि कुलदीप यादव यांचा प्रभावी वापर न केल्यामुळे क्रिकेट तज्ज्ञांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. या पराभवामुळे दिल्लीच्या ‘थिंकटँक’च्या निर्णयांवर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
कृष्णमाचारी श्रीकांत यांचा संताप: “विश्लेषकांचा उपयोग काय?”
भारतीय क्रिकेट संघाचे माजी सलामीवीर आणि निवड समितीचे माजी अध्यक्ष कृष्णमाचारी श्रीकांत यांनी अक्षर पटेलच्या नेतृत्वावर अत्यंत कडक शब्दांत ताशेरे ओढले. आपल्या यूट्यूब चॅनेलवर बोलताना ते म्हणाले, “अक्षर पटेल केवळ दिल्लीचा कर्णधारच नाही, तर आगामी टी-२० विश्वचषक संघाचा उपकर्णधार देखील आहे. तरीही त्याने सामन्यात स्वतःला केवळ दोनच षटके दिली. अभिषेक शर्मा सारखा फलंदाज स्थिरावलेला असताना १५ वे षटक अर्धवेळ गोलंदाज नितीश राणाला देणे, हे अनाकलनीय आहे. अशा आत्मघातकी चाली खेळण्यासाठी तुम्हाला बुद्धी नक्की कुठून सुचते? मग संघातील विश्लेषक आणि प्रशिक्षकांच्या फौजेचा उपयोग तरी काय?”
ॲरॉन फिंचची टीका: “कर्णधाराने मागे हटणे चुकीचे”
ऑस्ट्रेलियाचा माजी विश्वविजेता कर्णधार ॲरॉन फिंचने देखील अक्षरच्या या निर्णयाला त्याचा कमकुवतपणा म्हटले आहे. फिंचच्या मते, जेव्हा सनरायझर्स हैदराबादचे फलंदाज आक्रमक खेळत होते, तेव्हा संघाच्या मुख्य गोलंदाजाने जबाबदारी स्वीकारणे अपेक्षित होते. “डावखुरा फलंदाज समोर येताच तुम्ही गोलंदाजी सोडून मागे हटता, यातून तुमचा बचावात्मक दृष्टिकोन दिसून येतो. सामन्यापूर्वीच्या आकडेवारीनुसार अक्षरने अभिषेक शर्माला अवघ्या ८ चेंडूंमध्ये दोनदा बाद केले होते. असा इतिहास पाठीशी असूनही त्याने स्वतःवर विश्वास दाखवला नाही, हे धक्कादायक आहे,” असे फिंचने नमूद केले.
फॅफ डु प्लेसिसची महत्त्वाची टिप्पणी
दक्षिण आफ्रिकेचा माजी कर्णधार फॅफ डु प्लेसिसने या वादात भर घालताना सांगितले की, कर्णधाराने नेहमी समोरून नेतृत्व करणे गरजेचे असते. “जरी अक्षरने स्वतः गोलंदाजी करून धावा दिल्या असत्या, तरी त्याच्यावर इतकी टीका झाली नसती. कारण त्याने किमान प्रयत्न तरी केला असता. कुलदीपची लय बिघडली होती हे समजू शकते, पण अक्षरकडे टी-२० क्रिकेटचा प्रचंड अनुभव आणि वैविध्य आहे. त्याने अर्धवेळ गोलंदाजावर अवलंबून न राहता स्वतः चेंडू हातात घ्यायला हवा होता,” असे मत डु प्लेसिसने व्यक्त केले.










