Suryakumar Yadav: टी-20 विश्वचषकात भारताला ऐतिहासिक विजेतेपद मिळवून देणाऱ्या सूर्यकुमार यादवला भारतीय संघातून थेट बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला आहे. अजित आगरकर यांच्या नेतृत्वाखालील निवड समितीने आगामी मालिकेसाठी सूर्यकुमारला संघातून वगळत, त्याच्या जागी स्टार फलंदाज श्रेयस अय्यरकडे टी-20 संघाचे कर्णधारपद सोपवले आहे.
विश्वचषक जिंकल्यानंतरच्या पुढच्याच मालिकेत कर्णधाराला संघातून डच्चू देण्याचा हा अत्यंत कठोर निर्णय मानला जात आहे. मात्र, या मोठ्या धक्क्यानंतरही सूर्यकुमार यादवने दाखवलेल्या खिलाडूवृत्तीने सर्व चाहत्यांची मने जिंकली आहेत.
Suryakumar Yadav: कर्णधारपद गेल्यानंतर सूर्याची पहिली प्रतिक्रिया
संघामधून अचानक वगळल्यानंतर मुंबई टी-20 लीगच्या एका सामन्यादरम्यान नाणेफेकीच्या वेळी सूर्यकुमारने यावर आपली रोखठोक आणि सकारात्मक प्रतिक्रिया दिली.
सूर्यकुमार म्हणाला की, “भारतीय टी-20 संघाचा नवा कर्णधार बनल्याबद्दल मला श्रेयस अय्यरसाठी मनापासून खूप आनंद होत आहे.” आपल्या मनात कोणताही आकस नसल्याचे स्पष्ट करत सूर्या पुढे म्हणाला, “आम्ही मुंबईत एकत्र क्रिकेट खेळलो आहोत. भारताचे सलग तिन्ही टी-20 कर्णधार हे मुंबईचेच खेळाडू ठरले आहेत, याचा मला अत्यंत अभिमान वाटतो.”
Suryakumar Yadav: सूर्यकुमारला का वगळले आणि श्रेयसला संधी का?
निवड समितीने भविष्यातील मोठे उद्दिष्ट डोळ्यांसमोर ठेवून हा निर्णय घेतल्याचे समजते:
- भविष्यातील नियोजन: वर्ष 2028 मध्ये होणारे ऑलिम्पिक आणि त्याच वर्षी होणारा पुढील टी-20 विश्वचषक डोळ्यांसमोर ठेवून संघात तरुण खेळाडूंना संधी दिली जात आहे. सूर्यकुमारचा गेल्या दीड वर्षातील खराब फॉर्म आणि विश्वचषकातील सरासरी कामगिरी यामुळे निवड समितीने हा मोठा निर्णय घेतला.
- श्रेयस अय्यरचे पुनरागमन: डिसेंबर 2023 पासून एकही टी-20 आंतरराष्ट्रीय सामना न खेळलेल्या श्रेयस अय्यरने थेट कर्णधारपदासह संघात पुनरागमन केले आहे. देशांतर्गत क्रिकेटला प्राधान्य न दिल्याचा आरोप झाल्यानंतर त्याला संघातून काढण्यात आले होते.
- आयपीएलमधील दमदार कामगिरी: श्रेयसने आधी कोलकाता नाईट रायडर्सला आणि त्यानंतर पंजाब किंग्सला आयपीएलच्या अंतिम फेरीपर्यंत पोहोचवून आपला फॉर्म सिद्ध केला. गेल्या दोन मोसमात 165 च्या स्ट्राईक रेटने धावा कुटल्यामुळे त्याला ही मोठी बक्षीस मिळाली आहे.
Suryakumar Yadav: असा आहे भारताचा नवीन टी-20 संघ
आगामी काळासाठी टीम इंडिया पूर्णपणे नव्या लुकमध्ये मैदानात उतरणार आहे. निवडलेल्या नवीन १६ सदस्यीय संघात अनेक युवा चेहऱ्यांना स्थान देण्यात आले आहे:
श्रेयस अय्यर (कर्णधार), तिलक वर्मा (उपकर्णधार), रवी बिश्नोई, अभिषेक शर्मा, नितीश कुमार रेड्डी, मोहम्मद सिराज, संजू सॅमसन, अक्षर पटेल, हर्षित राणा, इशान किशन, वॉशिंग्टन सुंदर, अर्शदीप सिंग, शिवम दुबे, वरुण चक्रवर्ती, प्रिन्स यादव आणि वैभव सूर्यवंशी.
हे देखील वाचा – LPG Price Hike: सर्वसामान्यांना महागाईचा मोठा झटका! घरगुती गॅस सिलिंडरच्या किमतीत पुन्हा वाढ; पाहा नवीन दर










