दुग्धजन्य पदार्थांची आयात नको
शरद पवारांचे केंद्रीय मंत्र्यांना पत्र

बारामती – केंद्र सरकारने दुग्धजन्य पदार्थांची आयात करण्याचा जो निर्णय घेतला आहे त्याचा शेतकर्‍यांना फटका बसू शकतो, असे म्हणत शरद पवारांनी या निर्णयाला विरोध केला आहे. तसेच या निर्णयाचा फेरविचार करण्याची मागणी केली आहे. याबाबत त्यांनी एक पत्रही केंद्र सरकारला लिहिले आहे. शरद पवार यांनी म्हटले आहे की केंद्र सरकार दुग्धजन्य पदार्थ म्हणजेच लोणी, तूप वगैरे पदार्थ आयात करण्याचा निर्णय घेत आहे. केंद्र सरकारने असा निर्णय घेतला तर त्याचा आम्ही निषेध करू कारण या आयातीचा परिणाम थेट दूध उत्पादक शेतकर्‍यांवर होईल. कोविड 19 च्या संकटातून आपण आत्ता कुठे बाहेर पडतो आहोत अशा निर्णयामुळे मात्र डेअरी क्षेत्राचे मोठे नुकसान होईल. मी जी चिंता व्यक्त करतो आहे ती गांभीर्याने घ्या. हा निर्णय जर केंद्र सरकारने मागे घेतला तर मला आनंदच होईल, असेही शरद पवार यांनी म्हटले आहे.

Scroll to Top