Shivsena Leader Death : मुंबईतील विक्रोळी परिसरात एका स्थानिक शिवसैनिकाचा रुग्णालयात उपचारादरम्यान संशयास्पद मृत्यू झाल्याची अत्यंत धक्कादायक घटना समोर आली आहे. चेतन ठाकूर असे या मृत शिवसैनिकाचे नाव असून, त्यांच्या आकस्मिक निधनामुळे संपूर्ण परिसरात तीव्र संताप आणि प्रचंड खळबळ उडाली आहे. रुग्णालयाच्या कथित हलगर्जीपणामुळेच हा मृत्यू ओढवल्याचा थेट आरोप करत संतप्त नातेवाईक आणि शिवसैनिकांनी रुग्णालयात मोठी गर्दी केली असून, दोषींवर कारवाई होईपर्यंत मृतदेह ताब्यात घेण्यास स्पष्ट नकार दिला आहे.
साध्या तापाचे रूपांतर मृत्यूमध्ये; नातेवाईकांचा संताप
अधिकच्या माहितीनुसार, चेतन ठाकूर यांना काल रात्री अचानक तीव्र तापाचा त्रास जाणवू लागला होता. त्यामुळे त्यांना तातडीने उपचारासाठी विक्रोळी येथील ‘आदि आरोग्य’ रुग्णालयात दाखल करण्यात आले. प्राथमिक तपासणी आणि उपचार सुरू असताना त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे डॉक्टरांकडून सांगण्यात आले होते. मात्र, आज सकाळी अचानक त्यांच्या मृत्यूची बातमी कुटुंबीयांना देण्यात आली. साध्या तापाच्या उपचारासाठी दाखल केलेल्या व्यक्तीचा अवघ्या काही तासांत मृत्यू कसा होऊ शकतो? असा संतप्त सवाल उपस्थित करत रुग्णालयाने उपचारात कमालीची हलगर्जी केली असल्याचा आरोप ठाकूर यांच्या कुटुंबीयांनी केला आहे.
रुग्णालयाबाहेर शिवसैनिकांची गर्दी; आमदारांची मध्यस्थी
चेतन ठाकूर यांच्या निधनाचे वृत्त वाऱ्यासारखे पसरताच स्थानिक शिवसैनिकांनी आणि नागरिकांनी रुग्णालयाच्या आवारात एकत्र येण्यास सुरुवात केली. रुग्णालयातील ढिसाळ कारभारामुळे एका निष्ठावंत कार्यकर्त्याला प्राण गमवावे लागल्याची भावना शिवसैनिकांमध्ये असून, संबंधित रुग्णालयाविरुद्ध आणि दोषी वैद्यकीय कर्मचाऱ्यांवर तात्काळ गुन्हा दाखल करावा, या मागणीवर ते ठाम आहेत. या घटनेची गांभीर्य लक्षात घेऊन स्थानिक आमदार सुनील राऊत यांनी तातडीने रुग्णालयात धाव घेतली असून, ते परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत.
सुरक्षेच्या कारणास्तव पोलीस बंदोबस्त तैनात
रुग्णालयाबाहेरील वाढता तणाव आणि नागरिकांमधील रोष पाहता, कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून स्थानिक पोलीस प्रशासनाने घटनास्थळी मोठा बंदोबस्त तैनात केला आहे. पोलिसांनी मृत सैनिकाच्या कुटुंबियांना आणि आक्रमक झालेल्या शिवसैनिकांना शांत राहण्याचे आवाहन केले आहे. मात्र, जोपर्यंत या प्रकरणाची सखोल चौकशी होऊन दोषींवर कडक कायदेशीर कारवाई केली जात नाही, तोपर्यंत मृतदेह स्वीकारणार नाही, अशी ठाम भूमिका ठाकूर कुटुंबीयांनी घेतली आहे.










