Eknath Shinde : महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षात आणि राजकीय पटलावर आगामी काही महिने अत्यंत कळीचे ठरणार आहेत. शिवसेना पक्षाचे मुख्य नेते आणि एकनाथ शिंदे येत्या काळात काही धाडसी आणि धोरणात्मक निर्णय घेण्याच्या तयारीत असल्याची खात्रीलायक माहिती सूत्रांकडून मिळत आहे. विशेषतः दिवाळीपूर्वी राज्य मंत्रिमंडळात मोठ्या प्रमाणावर खांदेपालट होण्याची शक्यता वर्तवण्यात येत असून, यामुळे सत्ताधारी गोटात हालचालींना वेग आला आहे.
मंत्रिमंडळ विस्तार आणि संघटनात्मक शुद्धीकरण-
मिळालेल्या माहितीनुसार, एकनाथ शिंदे आगामी मंत्रिमंडळ फेरबदलात नव्या आणि तरुण चेहऱ्यांना संधी देण्याच्या विचारात आहेत. ज्या मंत्र्यांना आपल्या मतदारसंघात किंवा जिल्ह्यात पक्ष संघटना मजबूत करण्यात अपयश आले आहे, त्यांना मंत्रिमंडळातून डच्चू मिळण्याची शक्यता आहे. अशा मंत्र्यांची गच्छंती करून त्यांच्या जागी प्रभावी कामगिरी करणाऱ्या राज्यमंत्र्यांची कॅबिनेट मंत्री म्हणून बढती केली जाऊ शकते. पक्षाची ध्येयधोरणे तळागाळापर्यंत पोहोचवण्यात जे मंत्री कमी पडले आहेत, त्यांच्यावर ही ‘सर्जिकल स्ट्राईक’ सदृश कारवाई होण्याची चिन्हे आहेत.
‘ऑपरेशन टायगर’ आणि विरोधकांना सुरुंग
राजकीय वर्तुळात सध्या ‘ऑपरेशन टायगर’ या शब्दाची जोरदार चर्चा आहे. या संदर्भात बोलताना शिवसेनेचे प्रवक्ते आणि ज्येष्ठ नेते संजय शिरसाट यांनी सूचक विधान केले आहे. “ऑपरेशन टायगर नेमके कधी आणि कसे राबवायचे, याची पूर्ण कल्पना एकनाथ शिंदे यांना आहे. योग्य वेळ येताच ते हे ऑपरेशन यशस्वी करून दाखवतील,” असे शिरसाट म्हणाले. उद्धव ठाकरे गटातील अनेक आमदार आणि खासदार अद्यापही शिंदे यांच्या संपर्कात असल्याचा दावा करत, ठाकरे गटाकडे आता पूर्वीसारखी ताकद उरली नसल्याची टीकाही त्यांनी केली. यामुळे आगामी काळात मोठ्या राजकीय फोडाफोडीचे संकेत मिळत आहेत.
आमदार महेश शिंदे यांची नाराजी आणि शिस्तभंग-
सातारा जिल्हा परिषद निवडणुकीत पक्षाच्या धोरणांविरुद्ध भूमिका घेतल्याचा ठपका ठेवत आमदार महेश शिंदे यांच्यावर पक्षांतर्गत कारवाई होण्याची शक्यता आहे. यावर भाष्य करताना संजय शिरसाट यांनी मान्य केले की, महेश शिंदे काही अंशी नाराज आहेत.
पक्षचिन्हाचा विश्वास आणि महिला सुरक्षेचा प्रश्न-
शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण या चिन्हाबाबत सर्वोच्च न्यायालयात सुरू असलेल्या प्रकरणावर शिरसाट यांनी ठाम विश्वास व्यक्त केला. न्यायालयीन लढाईत सत्याचाच विजय होईल आणि पक्षचिन्ह आपल्याकडेच राहील, असा दावा त्यांनी केला. दरम्यान, राज्यातील महिलांवरील वाढत्या अत्याचाराच्या घटनांवर त्यांनी तीव्र संताप व्यक्त केला.










