Jarange : मराठा आरक्षण आंदोलक नेते जरांगे-पाटील यांनी त्यांच्या नेहमीच्या स्टाईलने आपल्या मागण्यांसाठी पुन्हा आंदोलनाचे हत्यार उपसले आणि गेल्या प्रत्येक आंदोलनात जे दृश्य दिसले ते यावेळीही बघायला मिळाले. जरांगे-पाटील आंदोलनाचा इशारा देत नाहीत तोपर्यंत सरकार कोणतीच पाऊले उचलत नाहीत आणि तोपर्यंत जरांगे-पाटील यांच्याशी पाच मिनिटांची चर्चा करीत नाहीत. मात्र 30 मे रोजी जरांगे-पाटील यांनी रणरणत्या उन्हात आंदोलन सुरू केले आणि दरवेळीप्रमाणे सरकारचे मंत्री आणि नेते यांनी अंतरवाली सराटीला धाव घेतली. जरांगे-पाटील आपल्या पद्धतीने दिवसभर मंत्र्यांना सुनावत राहिले, आपल्या मागण्यांचा पाढा वाचत राहिले. भाजपा आमदार प्रसाद लाड आणि नंतर मंत्री विखे-पाटील यांनी संयम पाळत त्यांच्याशी चर्चा केली, परत गेले, पुन्हा आले आणि अखेर मध्यरात्री दीड वाजता जरांगे-पाटील यांनी सरकारने दिलेला मसुदा मान्य करत अखेर उपोषण स्थगित केले. मंगळवार 2 जूनपर्यंत मसुद्यानुसार कारवाई झाली नाही तर पुन्हा आमरण आंदोलन सुरू करीन, अशी धमकीही त्यांनी यावेळी दिली.
जरांगे-पाटील यांच्या उपोषण आंदोलनाची हिच पद्धत राहिली आहे. त्यांनी उपोषण सुरू करावे आणि मंत्र्यांनी धावाधाव करून तात्पुरती मलमपट्टी करावी, अशी कातडी बचाव भूमिका सरकार सातत्याने घेत आहे. मराठ्यांच्या आरक्षणाच्या मागण्या पूर्ण करण्याबाबत गांभीर्याने चर्चा करून सर्वंकष निर्णय घ्यावे असे मात्र सरकारला वाटत नाही. केवळ जरांगे-पाटील उपोषणाला बसले की मगच धावाधाव करायची आणि उपोषण मिटविण्यासाठी अशक्य असलेल्याही गोष्टी मान्य करायच्या, अशी सरकारची अत्यंत भंपक भूमिका सरकारची दिसत आहे. यामुळेच जरांगे-पाटील वारंवार आंदोलनाची धमकी देत आहेत आणि आपले ध्येय पावलापावलाने पुढे सरकविण्याचा प्रयत्न करतात.
30 मे रोजी जरांगे-पाटील यांनी भरउन्हात बाजा टाकून आंदोलन सुरू केले आणि लगेचच सरकारतर्फे भाजपाचे मंत्री यांनी आंदोलनस्थळी धाव घेतली. त्यांनी केलेल्याचर्चेत कोणताही मार्ग मिळाला नाही. तेव्हा प्रसाद लाड यांनी तेथून पंढरपूरकडे जाण्याचा मार्ग निवडला. यानंतर सरकारने मंत्री विखे-पाटील यांना चर्चेसाठी पाठविले. कालच मंत्री विखे-पाटील उपोषणस्थळी पोहोचले. ते पोहोचल्यानंतर विठ्ठलाचा आशीर्वाद घेऊन प्रसाद लाडही तेथे दाखल झाले. जरांगे-पाटील यांनी नेहमीप्रमाणे आपल्या कायदेशीर सल्लागारांना पाचारण केले आणि आपल्या मागण्या पुन्हा एकदा सरकार पुढे मांडल्या. उपोषण सुरू करण्याआधी जरांगे-पाटील यांनी याच मागण्या सातत्याने सरकारपुढे ठेवल्या होत्या. मात्र उपोषण सुरू होईपर्यंत सरकारने त्याकडे लक्षही दिले नाही. उपोषण सुरू होताच याच सरकारने धावाधाव सुरू केली. यामागे नेमके कोणते राजकारण सुरू आहे हे कालांतरानेच कळेल.
उपोषण सोडण्यापूर्वी जरांगे म्हणाले की, सरकारने दिलेल्या मसुद्यानुसार मंगळवार 2 जूनपर्यंत आदेश काढण्याची तयारी दाखविल्याने उपोषण मागे घेत आहे. मात्र, दिलेल्या मुदतीत शासननिर्णय न झाल्यास पुन्हा उपोषणाला बसणार आहे. चर्चेदरम्यान महत्त्वाच्या मागण्यांवर सकारात्मक तोडगा निघाला. 58 लाख नोंदींचे दस्तावेज जरांगेंना दिले जाणार आहे. नोंदी सापडलेल्यांना कुणबी प्रमाणपत्रे देण्यात येणार आहेत. प्रमाणपत्रे न दिल्यास संबंधित अधिकाऱ्यावर कारवाई करण्याच्या सूचना दिल्या जाणार आहेत. आता जर ही कारवाई थांबली तर विखे-पाटील आणि प्रसाद लाड जबाबदार असतील. मी त्यांना फोन करणार. जातपडताळणीसाठी विभागीय आयुक्त 15 दिवसांत बैठक घेणार आहेत. सातारा गॅझेटसाठी सरकारला आणखी एक महिना वेळ देत आहोत. कारण घाईघाईने हे गॅझेट लागू केल्यास ते कायदेशीर अडचणीत सापडण्याची शक्यता आहे. त्यामुळे सरकारला महिनाभराचा वेळ देणार आहोत. न्या. शिंदे समितीला एक वर्षाची मुदतवाढ देण्याचे सरकारने कबूल केले आहे. प्रमाणपत्र वैधतेसाठी सर्व जिल्हाधिकारी कार्यालयात हेल्पलाईन सुरू करण्यात येणार आहे. विखे-पाटलांचीही स्वतंत्र हेल्पलाईन सुरू करण्यात येईल. मंत्रालयात मराठा आरक्षण कक्ष स्थापन होणार आहे. ज्यांचे कुणबी प्रमाणपत्र निघाल आहे त्यांच्या व्हॅलिडीटी रोखल्या नाही पाहिजेत, हे त्यांनी मान्य केले आहे. बलिदान देणाऱ्या आंदोलकांच्या कुटुंबाला 15 दिवसांत अर्थसहाय्य करणार आहे.
उपोषण संपल्यानंतर मनोज जरांगे यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. आमदार प्रसाद लाड यांनी रुग्णालयात भेट घेऊन त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. यावेळी आमदार प्रसाद लाड म्हणाले की, मराठा समाजाच्या हितासाठी आम्ही प्रामाणिकपणे प्रयत्न केले. मनोजदादांशी आमचे मतभेद आता संपले असून, सरकारने त्यांच्या मागण्यांबाबत सकारात्मक भूमिका घेतली आहे. तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, नेतृत्वाखाली कोणत्याही समाजावर अन्याय होणार नाही. विखे- पाटील यांनी मुख्यमंत्र्यांशी चर्चा करूनच 13-14 मुद्यांचा प्रस्ताव दिला आणि तो जरांगे यांनी मान्य केला. समाजासाठी जेवढे काम करता येईल ते आम्ही करू.










