Jayant Patil on Sanjay Raut: मुंबईत पार पडलेल्या राजकीय घडामोडींनंतर शिवसेना (ठाकरे गट) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षातील अंतर्गत मतभेद चव्हाट्यावर आले आहेत. विधिमंडळात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादावर एक महत्त्वाची बैठक झाली होती, ज्याला शरद पवार आणि खासदार नारायण राणे यांच्यासह अनेक नेते उपस्थित होते.
ही बैठक संपल्यानंतर शरद पवारांनी थेट उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दालनात आपल्या आमदारांची बैठक घेतली. यावर संजय राऊत यांनी तीव्र नाराजी व्यक्त करत, “शरद पवार गद्दारांना प्रतिष्ठा देत असून यामुळे पक्षाची विश्वासार्हता कमी होते,” असा थेट आरोप केला होता. आता या संपूर्ण वादावर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी अधिकृत स्पष्टीकरण देत संजय राऊतांच्या आक्षेपातील हवा काढून घेतली आहे.
केवळ प्रकृतीचे कारण; जास्त चालणे शक्य नसल्याने घेतला निर्णय
जयंत पाटील यांनी शरद पवारांच्या सुरक्षेचे आणि आरोग्याचे कारण देत संजय राऊतांना प्रत्युत्तर दिले आहे:
- आमदारांचीच होती विनंती: सीमाप्रश्नाची बैठक संपल्यानंतर राष्ट्रवादीच्या सर्व आमदारांनी शरद पवारांना भेटण्याची इच्छा व्यक्त केली होती.
- जवळचे दालन निवडले: विधानभवनाच्या दुसऱ्या मजल्यावरून खाली तळमजल्यावर आल्यानंतर सर्वात जवळ एकनाथ शिंदे यांचे दालन होते. शरद पवारांची प्रकृती पाहता त्यांना जास्त अंतरावर चालत घेऊन जाणे योग्य नव्हते.
- सोयीसाठी घेतलेला निर्णय: पवारांना चालण्याचा त्रास होऊ नये म्हणून सर्वांनी मिळून त्यांना या जवळच्या दालनात बसण्याची विनंती केली आणि तिथेच चर्चा पार पडली, असे जयंत पाटील म्हणाले.
“विधिमंडळ कोणाच्या मालकीचे नाही”; जयंत पाटलांचा राऊतांना टोला
संजय राऊतांच्या टीकेला उत्तर देताना जयंत पाटील यांनी विधिमंडळाच्या नियमांची आठवण करून दिली. ते म्हणाले की, विधानसभेतील किंवा विधिमंडळातील कोणतीही दालने ही कोणाच्या वैयक्तिक मालकीची नसतात, हे सभागृह सर्वांचे आहे. एखाद्या दालनावर मंत्र्याची पाटी लावलेली असली, तरी सोयीसाठी त्याचा वापर केल्याने कोणी त्या विचारसरणीचा होत नाही. त्यामुळे अशा पद्धतीचा आक्षेप घेणे पूर्णपणे अयोग्य आहे.
शरद पवार हे देशातील असे नेते आहेत ज्यांना सर्वच पक्षांचे नेते नेहमी भेटत असतात. त्यामुळे यात कोणतीही प्रतिष्ठा देणे किंवा विश्वासार्हता कमी होण्याचा प्रश्नच उद्भवत नाही, असे म्हणत पाटलांनी पवारांची बाजू लावून धरली आहे. केवळ पवारांचे चालण्याचे अंतर कमी व्हावे या एकाच उद्देशाने ती जागा वापरण्यात आली होती, असे त्यांनी स्पष्ट केले.











