Raj Thackeray : मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवरील (Mumbai-Pune Expressway) अत्यंत महत्त्वाकांक्षी अशा ‘मिसिंग लिंक’ (Missing Link) प्रकल्पाच्या बोगद्यात (टनेल) अवघ्या ६० दिवसांत झालेल्या पाण्याच्या गळतीवरून महाराष्ट्राचे राजकीय वातावरण कमालीचे तापले आहे. या दुर्घटनेवरून विरोधकांवर ‘राजकारण’ करत असल्याचा आरोप करणाऱ्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) अध्यक्ष राज ठाकरे यांनी गुरुवारी अत्यंत शेलक्या आणि आक्रमक शब्दांत समाचार घेतला. “तुम्ही इतकी वर्षे विरोधी पक्षात असताना केलेली आंदोलने राजकारण नव्हते का? आता स्वतःच्या अंगाशी आल्यावर विरोधक राजकारण करतात, असे म्हणणे म्हणजे दांभिकपणा आहे,” अशा शब्दांत राज ठाकरेंनी मुख्यमंत्र्यांवर तोफ डागली. मुंबईत आयोजित मनसे रेल्वे कामगार सेनेच्या वर्धापन दिन सोहळ्यात ते बोलत होते.
“केंद्राविरोधात बोललं की देशद्रोही आणि प्रकल्पावर बोललं की महाराष्ट्रद्रोही?”
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत बोलताना, ‘मिसिंग लिंकवरून राजकारण करून महाराष्ट्राचा अपमान करू नका’ असे म्हटले होते. यावर तीव्र आक्षेप घेत राज ठाकरे म्हणाले की, मुख्यमंत्र्यांचे विधानसभेतील भाषण म्हणजे निव्वळ पळवाट आहे. राज ठाकरे पुढे म्हणाले, “मुख्यमंत्री म्हणतात की एकवेळ मला बोला, पण महाराष्ट्राचा अपमान सहन करणार नाही. अरे, लोकांनी ‘मिसिंग लिंक’च्या दुरवस्थेबद्दल प्रश्न उपस्थित केले, तर यात महाराष्ट्राचा अपमान कुठे आला? आजकालची पद्धतच झाली आहे; केंद्र सरकारविरोधात काही बोललं की थेट ‘देशविरोधी’ ठरवलं जातं, आणि राज्यातील शासकीय प्रकल्पांमधील भ्रष्टाचारावर बोललं तर ‘महाराष्ट्राचा अपमान’ होतो! मग लोकशाहीत सामान्य जनतेने आणि आम्ही तुम्हाला प्रश्नच विचारायचे नाहीत का?”
राज ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांना जुन्या काळाची आठवण करून देत टोला लगावला की, आज जनता आणि विरोधक सरकारला ज्या शिव्या घालत आहेत, त्याची सुरुवात स्वतः भाजप आणि फडणवीसांनीच केली होती. पूर्वी विरोधकांना वाटेल ते बोलणे आणि शिव्या घालणे तुमच्याकडूनच सुरू होते; आता त्याच गोष्टी तुमच्या अंगलट येऊ लागल्याने तुम्हाला त्याचा त्रास होत आहे.
“महाराष्ट्र राज्याची विधानसभा, मग मुख्यमंत्री हिंदीतून कोणासाठी बोलत होते?”
मुख्यमंत्र्यांनी विधानसभेत दिलेल्या ‘राजकारण करणाऱ्यांना बघून घेऊ’ या इशाऱ्यावरही राज ठाकरेंनी जोरदार आक्षेप घेतला. “तुम्ही राज्याचे मुख्यमंत्री आहात, ‘बघून घेऊ’ अशी भाषा तुम्हाला शोभते का?” असा सवाल त्यांनी केला. यासोबतच मुख्यमंत्र्यांच्या अचानक बदललेल्या भाषेवर त्यांनी बोट ठेवले. राज ठाकरे म्हणाले की, विधानसभेत हे सगळे बोलताना मुख्यमंत्री अचानक मराठी सोडून हिंदीत बोलायला लागले. समोर बसलेले सर्व आमदार मराठी आहेत, विधानसभा महाराष्ट्राची आहे, मग आमचे मुख्यमंत्री हिंदीत कोणासाठी बोलत होते? ते कदाचित स्वतःच्या पक्षातील दिल्लीत बसलेल्या ‘वरच्या लोकांना’ काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करत होते. भाजपमध्ये अंतर्गत पातळीवर मोठे घमासान आणि यादवी सुरू आहे, हे आता लपून राहिलेले नाही. हे जे काही व्हिडिओ बाहेर येत आहेत, ते कुठून येत आहेत हे मुख्यमंत्र्यांनाही चांगलेच ठाऊक आहे, त्यामुळे आगामी काळात भाजपमध्ये काय होते, ते फक्त पाहत राहा, असा गर्भित इशाराही त्यांनी दिला.
“विकासाच्या नावाखाली महाराष्ट्राचा विचका; ५६ टक्के कमिशनची चर्चा”
प्रकल्पाच्या नावाखाली सुरू असलेल्या बांधकामांवर आणि कंत्राट पद्धतीवर राज ठाकरेंनी जळजळीत टीका केली. मुंबई, ठाणे आणि संपूर्ण महाराष्ट्रात सध्या विकासाच्या नावाखाली केवळ ‘विचका’ सुरू आहे. जिथे पहावे तिथे इमारतींची बांधकामे सुरू आहेत. केवळ रस्ते आणि उड्डाणपूल बांधणे म्हणजे विकास नव्हे; मुख्यमंत्र्यांनी ही अनावश्यक बांधकामे तात्काळ बंद केली पाहिजेत. हे नेते परदेशात जाऊन नक्की काय शिकून येतात, हेच समजत नाही. १ मे रोजी मोठ्या थाटामाटात ‘मिसिंग लिंक’चे उद्घाटन झाले आणि अवघ्या जुलै महिन्यात त्यातून पाणी वाहू लागले. फक्त ६० ते ६५ दिवसांत हा नवीन बोगदा गळायला लागला आहे. उद्दघाटनाच्या वेळी मुख्यमंत्री सांगत होते की या प्रकल्पासाठी साहित्य वेगवेगळ्या देशांतून आणले आहे; पण शेवटी हे काम ज्या भारतीय कंत्राटदारांना दिले, त्यांनी आपले मूळ रंग दाखवलेच.










