Maharashtra Monsoon Updates: महाराष्ट्रातील नागरिक सध्या चातकासारखी पावसाची वाट पाहत आहेत. यंदा ६ जून रोजी तळकोकणात दाखल झालेल्या मान्सूनने सुरवातीला वेगाने घोडदौड केली होती. मात्र, गेल्या ५ दिवसांपासून मान्सूनची पुढील वाटचाल पूर्णपणे ठप्प झाली आहे. सध्या मान्सूनची उत्तर सीमा कोकणातील हर्णे आणि मध्य महाराष्ट्रातील सोलापूर येथेच स्थिरावली आहे.
हवामान अभ्यासकांच्या मते, उत्तरेकडून येणाऱ्या उष्ण आणि कोरड्या वाऱ्यांनी मान्सूनच्या प्रवाहावर ताबा मिळवला आहे. या हवामान बदलामुळे मान्सूनची गती मंदावली असून इतर भागांत केवळ वादळी पावसाची नोंद होत आहे. मात्र, पुढील ४ ते ५ दिवसांत ही स्थिती बदलणार असून १८ जूननंतर राज्यात मान्सून पुन्हा एकदा सक्रिय होण्याची चिन्हे आहेत.
१८ जून ते २ जुलै दरम्यान पावसाचा जोर वाढणार
हवामान विभागाने (IMD) जाहीर केलेल्या नवीन अंदाजानुसार, १८ जून ते २ जुलै या कालावधीत मान्सून राज्याच्या विविध भागांत जोरदार हजेरी लावेल. तसे झाल्यास नागरिकांना सध्या जाणवणाऱ्या तीव्र उकाड्यापासून मोठा दिलासा मिळेल.
दरम्यान, शनिवारी मान्सूनने देशातील इतर राज्यांमध्ये जसे की हैदराबाद, ओडिशाची किनारपट्टी, पश्चिम बंगाल, झारखंड आणि बिहारच्या काही भागांमध्ये प्रगती केली आहे. महाराष्ट्रात मात्र त्याला पुढे सरकण्यासाठी आणखी २ ते ३ दिवस वाट पाहावी लागणार आहे.
कोणत्या भागावर मान्सूनचा कसा असेल प्रभाव?
हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार, आगामी काळात महाराष्ट्रातील प्रमुख विभागांमध्ये पावसाचे चित्र खालीलप्रमाणे असेल:
संपूर्ण कोकण आणि उर्वरित महाराष्ट्र: २५ जूननंतर मान्सूनचा जोर आणखी वाढेल. या काळात मान्सून संपूर्ण कोकण किनारपट्टी व्यापेल आणि उर्वरित महाराष्ट्रातील बहुतांश भागांमध्ये पूर्णपणे सक्रिय होईल.
दक्षिण कोकण किनारपट्टी: १८ जूननंतरच्या पहिल्या टप्प्यात या भागात मान्सूनचा सर्वाधिक जोर पाहायला मिळेल.
विदर्भ आणि मराठवाडा: सुरुवातीच्या काही दिवसांत विदर्भाच्या भागात पावसाचा प्रभाव खूपच कमी असेल. मात्र, हळूहळू तिथेही पावसाला सुरवात होईल.










