Mumbai AC Local : वाढत्या उन्हाचा तडाखा लक्षात घेऊन पश्चिम आणि मध्य रेल्वे प्रशासनाने आज १ मे २०२६ म्हणजेच महाराष्ट्र दिनापासून उपनगरीय रेल्वे सेवेत वातानुकूलित (एसी) लोकलच्या फेऱ्या वाढवण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. प्रवाशांना सुखकर आणि थंडगार प्रवासाचा अनुभव मिळावा, या हेतूने प्रशासनाने हे पाऊल उचलले असले, तरी प्रत्यक्षात मात्र यामुळे लाखो सर्वसामान्य प्रवाशांची मोठी गैरसोय झाली आहे. नेहमीच्या साध्या (नॉन-एसी) लोकल रद्द करून किंवा त्यांच्या वेळेत बदल करून या नवीन एसी फेऱ्या चालवल्या जात असल्याने सर्वसामान्य प्रवाशांचे अतोनात हाल होत आहेत.
साध्या लोकलची संख्या घटली; विलंबाने प्रवासी त्रस्त-
रेल्वे प्रशासनाने साध्या लोकलच्या जागी एसी लोकल चालवण्यास सुरुवात केल्याने सामान्य लोकल गाड्यांची संख्या कमालीची घटली आहे. परिणामी, दोन लोकल गाड्यांमधील वेळेचे अंतर वाढले असून प्रवाशांना रेल्वे स्थानकांवर २५ ते ३० मिनिटे ताटकळत उभे राहावे लागत आहे. सकाळी आणि संध्याकाळी कामावर जाण्याच्या गर्दीच्या वेळेत (Peak Hours) ही परिस्थिती अधिक बिकट होत असून, साध्या लोकलमध्ये चढताना प्रवाशांना प्रचंड गर्दीचा सामना करावा लागत आहे. आधीच लोकल उशिराने धावत असताना, त्यात प्रवाशांच्या गर्दीमुळे चेंगराचेंगरीची परिस्थिती निर्माण झाल्याने चाकरमान्यांमध्ये रेल्वे प्रशासनाच्या या धोरणाविरोधात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
मासिक पासधारक चिंतेत; दरातील तफावत ठरतेय अडथळा-
या अचानक झालेल्या बदलामुळे साध्या लोकलचा मासिक आणि त्रैमासिक पास काढणाऱ्या नियमित प्रवाशांसमोर मोठा पेच निर्माण झाला आहे. एसी लोकल आणि साध्या लोकलच्या तिकीट दरांमध्ये तसेच पासच्या किमतीमध्ये मोठी तफावत आहे. सर्वसामान्य मध्यमवर्गीय आणि अल्प उत्पन्न असणाऱ्या प्रवाशांना एसी लोकलचा महागडा प्रवास अजिबात परवडणारा नाही. त्यामुळे पास असूनही साध्या लोकल वेळेवर उपलब्ध होत नसल्याने त्यांना कामावर पोहोचण्यास उशीर होत आहे, तर दुसरीकडे आर्थिक परिस्थितीमुळे ते एसी लोकलचा पर्याय निवडू शकत नाहीत. या दुहेरी अडचणीमुळे सामान्य प्रवाशांची मोठी कोंडी झाली आहे.
पश्चिम रेल्वेचे नवीन वेळापत्रक: एसी फेऱ्यांमध्ये वाढ-
पश्चिम रेल्वेने १ मे २०२६ पासून आपल्या प्रवासी सेवेत मोठे बदल केले आहेत. या अंतर्गत काही १२ डब्यांच्या साध्या लोकलचे रूपांतर १५ डब्यांच्या वातानुकूलित (एसी) लोकलमध्ये करण्यात आले असून १२ नवीन एसी सेवा सुरू करण्यात आल्या आहेत.
फेऱ्यांमधील वाढ: या नव्या बदलांमुळे पश्चिम रेल्वेवरील एसी फेऱ्यांची संख्या आता सोमवार ते शुक्रवार दरम्यान १३३ वरून १४५ झाली आहे. तर शनिवार आणि रविवारी ही संख्या १०६ वरून ११८ वर पोहोचली आहे.
१५ डब्यांच्या लोकल: १५ डब्यांच्या एकूण लोकल गाड्यांची संख्या देखील २२७ वरून २४४ झाली आहे.
विरार-डहाणू मार्ग: विरार ते डहाणू या मार्गावर प्रवाशांच्या सोयीसाठी पहिल्यांदाच १५ डब्यांच्या ८ नवीन गाड्या सुरू करण्यात आल्या आहेत.
हार्बर मार्गावरही फेऱ्यांमध्ये वाढ; प्रवाशांची मात्र नाराजी-
मध्य रेल्वे अंतर्गत येणाऱ्या हार्बर मार्गावरही आजपासून एसी लोकलच्या फेऱ्यांमध्ये लक्षणीय वाढ करण्यात आली आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT), वडाळा, वाशी आणि पनवेल या प्रमुख स्थानकांदरम्यान रेल्वे प्रशासनाने नवीन वेळापत्रक लागू केले आहे. या सुधारित वेळापत्रकानुसार हार्बर मार्गावर १४ नवीन एसी फेऱ्यांची भर पडली असून, आता या मार्गावरील एकूण एसी फेऱ्यांची संख्या १०८ वर पोहोचली आहे.











