Petrol-Diesel : मध्य पूर्वेतील युद्धाचे चटके आता भारताला अधिक बसू लागले आहेत. अमेरिका-इराण युद्धामुळे होर्मुज सामुद्रधुनी रोखण्यात आल्याने जगभरातील इंधन पुरवठा साखळी खंडित झाली आहे. परिणामी पेट्रोल-डिझेलची दरवाढ अटळ आहे. केंद्रीय पेट्रोलियम मंत्री हरदिप सिंह पुरी यांनी तसे स्पष्ट संकेत दिले. दरवाढ केली नाही तर तेल कंपन्यांना एका तिमाहीत 1 लाख कोटी रुपयांचा तोटा होईल, असे पुरी म्हणाले. पेट्रोल-डिझेल हे लिटरमागे 30 ते 40 रुपयांनी महाग होईल अशी चर्चा आहे.
भारतीय उद्योजकांची संघटना सीआयआयच्या वार्षिक शिखर परिषदेत बोलताना पुरी यांनी युद्धामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीची माहिती दिली. युद्धामुळे जागतिक स्तरावर कच्च्या तेलाच्या पुरवठ्यामध्ये अडथळे निर्माण होत आहेत. भारताकडे पुढील दोन महिने पुरेल एवढा तेलसाठा आहे. मात्र युद्ध थांबले नाही तर कच्च्या तेलाच्या किमती चढ्याच राहिल्या आणि किरकोळ विक्रीच्या दरात वाढ केली नाही तर सार्वजनिक क्षेत्रातील तेल कंपन्यांना एका तिमाहीमध्ये सुमारे 1 लाख कोटी रुपयांचा तोटा सहन करावा लागेल, असे पुरी म्हणाले.
पुरी यांनी पेट्रोल-डिझेलची दरवाढ होणार असे स्पष्ट जरी म्हटले नसले तरी त्यांच्या बोलण्याचा अर्थ दरवाढ अटळ आहे हाच होता. गेल्या चार वर्षांत कच्च्या तेलाच्या किमती 50 टक्क्यांनी वाढूनदेखील पेट्रोल आणि डिझेलच्या दरात सरकारने वाढ केलेली नाही. त्यामुळे तेल कंपन्यांना सध्या पेट्रोलवर प्रति लीटर 14 रुपये, डिझेलवर 42 रुपये तर स्वयंपाकाच्या गॅसवर प्रति सिलिंडर 674 रुपये तोटा सहन करावा लागत आहे, असे सांगत पुरी यांनी दरवाढ करणे कसे आवश्यक आहे ते पटवून देण्याचा प्रयत्न केला. दरम्यान इंधन महाग होण्यापूर्वीच इंधन टंचाईचे संकट ओढवले आहे. पेट्रोल पंपांवर इंधन संपले असल्याच्या पाट्या झळकत आहेत. एकूणच स्थिती गंभीर झाली आहे.









