Vidhan Parishad Election 2026 : स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून होणाऱ्या सांगली-सातारा विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दोन्ही जिल्ह्यांतील राजकीय घडामोडींना प्रचंड वेग आला आहे. उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या अंतिम दिवशी महायुतीमधील बंडखोरी शमवण्यासाठी वरिष्ठ पातळीवर शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. याच दरम्यान, महायुतीचे अधिकृत उमेदवार धैर्यशील कदम यांनी शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आणि साताऱ्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. या अत्यंत महत्त्वपूर्ण भेटीमध्ये निवडणुकीच्या रणनीतीबाबत आणि जिल्ह्यातील राजकीय समीकरणांबाबत दोन्ही नेत्यांमध्ये सविस्तर चर्चा झाली. या भेटीनंतर एक विशेष राजकीय संकेत देत पालकमंत्री शंभूराज देसाई आणि उमेदवार धैर्यशील कदम हे दोन्ही नेते एकाच वाहनातून सांगलीच्या दिशेने रवाना झाले आहेत.
मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या सूचनेनुसार ‘युतीधर्म’ पाळणार: शंभूराज देसाई
धैर्यशील कदम यांच्यासोबत सांगलीकडे रवाना होताना पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी माध्यमांशी संवाद साधला आणि महायुतीमधील बंडखोरीवर पक्षाची भूमिका स्पष्ट केली. देसाई म्हणाले, “सांगली जिल्ह्यात शिवसेनेचे जिल्हाप्रमुख तानाजीराव पाटील यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केल्यामुळे पेच निर्माण झाला आहे. या संदर्भात राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी स्पष्ट सूचना दिल्या असून, महायुतीमध्ये ‘युतीधर्म’ पाळणे अत्यंत आवश्यक असल्याचे सांगितले आहे. आज दुपारी ३ वाजेपर्यंत अर्ज माघारी घेण्याची अंतिम मुदत आहे. त्यामुळे ही बंडखोरी रोखण्यासाठी आणि महायुतीच्या अधिकृत उमेदवाराला पाठिंबा मिळवून देण्यासाठी आम्ही स्वतः सांगलीला जात आहोत.”
तानाजीराव पाटील यांच्या मनधरणीसाठी स्थानिक नेत्यांशी चर्चा करणार
पालकमंत्री देसाई यांनी पुढे सांगितले की, सांगलीत पोहोचल्यानंतर ते शिवसेनेचे बंडखोर उमेदवार तानाजीराव पाटील, आमदार सुहास बाबर आणि इतर स्थानिक प्रमुख नेत्यांशी थेट चर्चा करणार आहेत. तानाजीराव पाटील यांनी आपला बंडखोरीचा निर्णय मागे घ्यावा आणि महायुतीचे अधिकृत उमेदवार धैर्यशील कदम यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहावे, यासाठी त्यांचे मन वळवण्याचे प्रयत्न केले जातील. शिवसेनेकडून महायुतीच्या नियमांचे आणि युतीधर्माचे काटेकोरपणे पालन केले जाईल, अशी ग्वाहीही त्यांनी यावेळी दिली.
सातारा जिल्हा परिषद निवडणुकीतील नाराजीवर नंतर चर्चा
साताऱ्यातील जिल्हा परिषद निवडणुकीनंतर महायुतीमधील घटकांमध्ये निर्माण झालेल्या अंतर्गत नाराजीबाबत पत्रकारांनी विचारले असता, पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी अत्यंत संयत भूमिका घेतली. “सध्या आमचे संपूर्ण लक्ष सांगली-सातारा विधान परिषद निवडणुकीवर केंद्रित आहे. आधी सांगलीचा हा पहिला टप्पा आणि उमेदवारी अर्ज माघारी घेण्याची प्रक्रिया शांततेत पूर्ण होऊ द्या. हा टप्पा पार पडल्यानंतर महायुतीचे सर्व प्रमुख नेते एकत्र बसतील आणि साताऱ्याच्या जागेबाबत तसेच अंतर्गत नाराजीबाबत सविस्तर चर्चा करून त्यावर सकारात्मक तोडगा काढतील,” असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
एकाच वाहनातील प्रवासाने राजकीय वर्तुळाचे लक्ष वेधले
उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या आजच्या शेवटच्या दिवशी भाजपचे अधिकृत उमेदवार धैर्यशील कदम आणि शिवसेना नेते शंभूराज देसाई यांचा एकाच गाडीतून सुरू असलेला हा प्रवास सध्या दोन्ही जिल्ह्यांच्या राजकीय वर्तुळात प्रचंड चर्चेचा विषय ठरला आहे.









