Sanjay Raut : येत्या १८ जुलै रोजी नागपूरमध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे मुख्य नेते उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली ‘रामरक्षा आंदोलन’ आणि जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले आहे. या आंदोलनाच्या पूर्वतयारीसाठी खासदार संजय राऊत सध्या नागपूर दौऱ्यावर आहेत. या दरम्यान, महाराष्ट्राच्या राजकारणात एक नवीन वादळ निर्माण झाले आहे. शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा भाजप प्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडीसोबत (NDA) घरोबा करणार असल्याच्या जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहेत. तसेच आगामी पावसाळी अधिवेशनात केंद्र सरकार महिला आरक्षण आणि मतदारसंघ पुनर्रचना (Delimitation) विधेयक पुन्हा आणणार असून त्याला राष्ट्रवादी आणि उद्धव सेनेचा पाठिंबा असणार आहे, अशा बातम्या प्रसिद्ध झाल्या आहेत. या सर्व घडामोडींवर खासदार संजय राऊत यांनी नागपूरमधून अत्यंत आक्रमक आणि मोठी प्रतिक्रिया दिली आहे.
“त्या सर्व अफवा, ‘इंडिया’ आघाडी एकत्र निर्णय घेणार” – संजय राऊत
शरद पवारांच्या पक्षाबाबत सुरू असलेल्या चर्चा पूर्णपणे फेटाळून लावत संजय राऊत म्हणाले,”देशासमोर सध्या ‘नीट’ (NEET) आणि ‘टीईटी’ (TET) परीक्षांचा महाघोटाळा हा सर्वात गंभीर प्रश्न आहे. लडाखचे अभ्यासक सोनम वांगचुक यांच्या उपोषणाचा आज १७ वा दिवस असून त्यांची प्रकृती कमालीची ढासळली आहे. संपूर्ण देशाचे लक्ष या महत्त्वाच्या विषयांवर असायला हवे. परंतु, भारतीय जनता पक्ष आणि विशेषतः शिंदे गटाकडे दुसरे कोणतेही काम उरलेले नाही. त्यामुळे ते मूळ प्रश्नांवरून जनतेचे लक्ष विचलित करण्यासाठी अशा कपोलकल्पित अफवा पसरवत आहेत.”
राऊत यांनी स्पष्ट केले की, नागपूरला येण्यापूर्वी त्यांची राष्ट्रवादीच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांच्याशी या विषयावर सविस्तर चर्चा झाली आहे. आज दुपारी १२ वाजता सुप्रिया सुळे स्वतः पत्रकार परिषद घेऊन या सर्व अफवांचा पर्दाफाश करतील. पावसाळी अधिवेशनात असे कोणतेही विधेयक पटलावर येणार आहे की नाही, याची कोणतीही अधिकृत माहिती अद्याप कोणाकडेही नाही. जर भविष्यात असा कोणताही राष्ट्रीय महत्त्वाचा विषय समोर आला, तर ‘इंडिया’ (INDIA) आघाडीतील काँग्रेस, शिवसेना (उबाठा), राष्ट्रवादी (शरद पवार गट), डीएमके (DMK) या सर्व घटक पक्षांची आधी दिल्लीत एकत्र बैठक होईल आणि त्यानंतरच सामूहिक निर्णय घेतला जाईल, असे राऊत यांनी स्पष्ट केले.
जयंत पाटलांच्या फडणवीस भेटीमागचे ‘ते’ खरे कारण-
राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते जयंत पाटील यांनी नुकतीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती. या भेटीदरम्यान तिथे सुनील तटकरे आणि प्रफुल पटेल हे देखील उपस्थित असल्याचा दावा केला जात आहे. यावर बोलताना संजय राऊत यांनी या भेटीमागचे प्रशासकीय कारण स्पष्ट केले. ते म्हणाले, “जयंत पाटील हे महाविकास आघाडीचे अत्यंत महत्त्वाचे नेते आहेत. त्यांच्या मतदारसंघात (इस्लामपूर) जनतेतून निवडून आलेल्या एका नगराध्यक्षाला जिल्हाधिकार्यांनी अत्यंत बेकायदेशीर आणि नियमबाह्य पद्धतीने पदमुक्त (डिस्कॉलिफाय) केले आहे. लोकशाहीसाठी ही अतिशय गंभीर बाब आहे. जयंत पाटील याच गंभीर विषयावर आणि स्थानिक तक्रारी घेऊन मुख्यमंत्र्यांना भेटण्यासाठी गेले होते. त्यामुळे या भेटीचा आणि राजकीय पक्षांतराचा कोणताही संबंध जोडणे पूर्णपणे चुकीचे आणि तथ्यहीन आहे.”
“चोरीचा माल घेऊन गृहमंत्र्यांकडे गेले” – शिंदेंवर बोचरी टीका
केंद्रीय मंत्रिमंडळ विस्ताराच्या (Union Cabinet Reshuffle) पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदे आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यात झालेल्या बैठकीचा समाचार घेताना संजय राऊत यांनी अत्यंत शेलक्या शब्दांत टीका केली. ते म्हणाले, “सामान्यतः पोलीस यंत्रणा चोरीचा माल पकडल्यानंतर तत्काळ अटक करते. मात्र, काल एकनाथ शिंदे हे मुंबईतून ६ फुटीर खासदारांचे चोरीचे गाठोडे घेऊन थेट दिल्लीत गृहमंत्री अमित शाह यांच्या दरबारात गेले. तिथे त्यांच्यावर कोणतीही कारवाई तर झाली नाहीच, उलट ‘माझ्या या चोरीच्या गाठोड्याला सोन्याचा मुलामा द्या’ म्हणजेच आम्हाला केंद्रात मंत्रिपद द्या, अशी लाचारी ते करत आहेत,” असा जबरी टोला राऊतांनी हाणला.
“रामाला त्यांनी रस्त्यावर आणले; आम्ही रस्त्यावरच सभा घेऊ”
१८ जुलै रोजी नागपूरमधील ज्या मैदानावर उद्धव ठाकरे यांचे ‘रामरक्षा आंदोलन’ होणार आहे, त्याच मैदानावर देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त आधीच बुकिंग करण्यात आले असल्याचे समोर आले आहे. यावरून राऊत यांनी नागपूर प्रशासनाला आणि भाजपला थेट इशारा दिला आहे.”आम्ही ठरवलेल्या जागी आंदोलनाचा मंडप टाकला आहे. पण सध्याच्या राज्यकर्त्यांना देवापेक्षा स्वतःचा वाढदिवस मोठा वाटू लागला आहे. यांनी तर प्रभू श्रीरामालाच रस्त्यावर आणले असून सीता माईचे मंगळसूत्र चोरण्याचे पाप केले आहे.










