Sushma Andhare : महाराष्ट्राला हादरवून सोडणाऱ्या खरात प्रकरणावरून आता राजकीय वातावरण प्रचंड तापले आहे. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी या प्रकरणी राज्य सरकारवर प्रश्नांची सरबत्ती करत सत्ताधाऱ्यांना धारेवर धरले आहे. “परतवाडा येथील आरोपीच्या घरावर ज्या तत्परतेने बुलडोझर चालवला, तशीच कठोर कारवाई अशोक खरात आणि या प्रकरणाशी संबंधित नेत्यांच्या मालमत्तांवर कधी होणार?” असा रोकडा सवाल अंधारे यांनी उपस्थित केला आहे.
बुलडोझर कारवाई आणि चयापचय न्यायावर प्रश्नचिन्ह-
सुषमा अंधारे यांनी सरकारच्या ‘बुलडोझर’ नीतीवर टीका करताना विचारले की, खरात प्रकरणाला एक महिना उलटूनही अद्याप कोणतीही ठोस कारवाई का झाली नाही? त्यांनी थेट राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्या मालमत्तेवरही बुलडोझर चालवण्याची मागणी केली. “जर सर्वसामान्य गुन्हेगारांच्या घरांवर बुलडोझर चालवला जातो, तर अशोक खरातच्या फार्महाऊसवर ही यंत्रणा का पोहोचली नाही? असा सवाल त्यांनी केला आहे.
महिला मंत्र्यांच्या मौनावर प्रहार-
राज्यातील महिला सुरक्षा आणि शोषणाच्या मुद्द्यावर बोलताना सुषमा अंधारे यांनी महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांना लक्ष्य केले. “राज्यात महिलांचे शोषण होत असताना आदिती तटकरे अजूनही शांत का आहेत? केवळ मंत्रिपद उपभोगण्यासाठी असते का? तुम्ही ज्या अजितदादांच्या जीवावर मंत्री झालात, त्यांच्यासाठी तरी काहीतरी बोला,” असा टोला त्यांनी लगावला. राज्याच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री म्हणून सुनेत्रा पवार यांची या प्रकरणात काय भूमिका आहे, असा प्रश्नही त्यांनी विचारला. ‘नारी शक्ती’ विधेयक आणण्यापूर्वी महिलांना प्रत्यक्ष संरक्षण द्या, असा सल्लाही त्यांनी दिला.
चाकणकर आणि बनावट सह्यांचे गूढ-
रुपाली चाकणकर यांना वाचवण्यासाठी प्रतिभा चाकणकर यांचा वापर केला जात असल्याचा आरोप अंधारे यांनी केला. “प्रतिभा चाकणकर म्हणतात की त्यांच्या सह्या बनावट आहेत, मात्र जर त्या निरापराध होत्या, तर त्यांना पोलीस चौकशीला सामोरे जाण्याची गरज का भासली? समता पतसंस्थेतील खाती बनावट म्हणायची असतील, तर मग तिथले संचालकही बनावट आहेत का?” असे अनेक प्रश्न त्यांनी उपस्थित केले. या प्रकरणातील आर्थिक व्यवहारांची पाळेमुळे खणून काढण्याची गरज त्यांनी व्यक्त केली.
अशोक खरातचे समोर आलेला सीडीआर खरा आहे की खोटा आहे हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी सांगावं. जर ते खरे असतील तर दीपक केसरकर आणि एकनाथ शिंदे यांना चौकशीला कधी बोलावणार आहात? रुपाली चाकणकर या गजाआड कधी होणार? या प्रश्नांचं उत्तर मुख्यमंत्र्यांनी द्यावी, असं देखील सुषमा अंधारे म्हणाल्या.











