*सरकारकडून वाय+ सुरक्षा
मुंबई: अभिनेता शाहरुख खान याला पठाण आणि जवान या चित्रपटांच्या यशानंतर काही अज्ञातांकडून त्याला जीवे मारण्याच्या धमक्या आल्याची माहिती मुंबई पोलिसांना मिळाली. महाराष्ट्र सरकारकडून शाहरुख खानच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली असून, शाहरुखला वाय प्लस सुरक्षा देण्यात आली आहे.
महाराष्ट्र राज्याच्या गृहमंत्रालयाकडून वरिष्ठ पोलिस अधिकारी आणि दहशतवादविरोधी पथका(एटीएस)ला ५ ऑक्टोबरला एक पत्र देण्यात आले होते. शाहरुख खानला जीवे मारण्याची धमकी मिळत आहे, असे पत्रात म्हटले होते. यावर युनिट कमांडर्सकडून तत्काळ शाहरुख खानला वाय प्लस सिक्युरिटी देण्यात यावी, अशी सूचना देण्यात आली. महाराष्ट्र सरकार आणि मुंबई पोलिसांच्या निर्णयानंतर शाहरुख खानला आता ६ वैयक्तिक सुरक्षा अधिकारी आणि ५ सशस्त्र पोलिस २४ तास शाहरुख खानसोबत असतील. हे सुरक्षा कर्मचारी एमपी-५ मशीनगन, एके-४७ असॉल्ट रायफल आणि ग्लॉक पिस्तूलने सज्ज असतील. खान यांच्या बंगल्यावर चार सशस्त्र पोलिसही सतत उपस्थित राहणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.