लखनौ- अयोध्येत होणाऱ्या राम मंदिर सोहळ्याची सध्या जय्यत तयारी सुरु आहे. २२ जानेवारी रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अयोध्येतील मंदिरात रामल्लांची प्रतिष्ठापणा होणार आहे. अशातच उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी घोषणा केली आहे की, १९९० साली राम मंदिर आंदोलनात शहिद झालेल्या कोठारी बंधूंसह प्रत्येक रामभक्तांचे स्मारक अयोध्येत बांधले जाणार आहे.
मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी सांगितले की, समाजवादी सरकारच्या काळात १९९० साली राम मंदिरासाठी आंदोलन पुकारण्यात आले होते. यावेळी मुलासमसिंह यादव हे मुख्यमंत्री होते. या आंदोलनावेळी पोलिसांनी गोळीबार केला. या घटनेत राम कोठारी आणि शरद कोठारी या कोठारी बंधुंची हत्या झाली. तसेच लाखो रामभक्तांनी त्यांचा जीव गमावला. परंतु अयोध्येत उभारले जात असलेले भव्य राम मंदिर पाहून त्या सर्वांच्या आत्म्याला शांती लाभेल. त्यांच्या प्राणांची आहुती व्यर्थ गेली नाही, हे पाहून नक्कीच त्यांना समाधान वाटेल. आता आपल्या अयोध्येत प्रभू रामांचे मंदिर उभारण्याचा संकल्प अखेर सत्यात उतरत आहे. त्यामुळे राम मंदिर आंदोलनात शहीद झालेल्या रामभक्तांच्या स्मरणार्थ अयोध्येत स्मारक बांधले जाणार आहे. येथे कोठारी बंधूंपासून ते राम मंदिरासाठी बलिदान देणाऱ्या प्रत्येक रामभक्ताला आदर दिला जाईल. अयोध्येतील श्री राम आंतरराष्ट्रीय विमानतळासह अनेक विकास कामे होत आहेत. शहरात प्रवेश करण्यासाठी बांधण्यात आलेल्या सहा एंट्री पॉइंटमध्ये गेट कॉम्प्लेक्सही बांधले जात आहेत. जिथे भाविकांना अनेक प्रकारच्या सुविधा मिळतील.