देवगड- देवगड हापूस आंबा कलमांना मोहर येण्याच्या काळात म्हणजेच नोव्हेंबर अखेरीस व डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यामध्ये ७० टक्के आंबा कलमांना पालवी आली आहे. गेल्या चार ते पाच वर्षांमध्ये मोहोर येण्याच्या वेळेलाच आंबा कलमांना बहारदार अशी पालवी येत आहे. त्यामुळे यंदाही हापूस आंब्याचा मोसम एक महिना उशिरा येणार असून उत्पादनात घट होण्याची शक्यता आहे.
चैत्र महिन्यात येणारी पालवी नोव्हेंबर महिन्यातच का येते, याचे संशोधन होणे गरजेचे आहे. देवगडमध्ये गेल्या चार ते पाच वर्षांचा इतिहास पाहता नोव्हेंबर व डिसेंबर महिन्यामध्ये आंबा कलमांना पहिल्या टप्प्यातील मोहर येण्याच्या वेळेलाच ७० ते ८० टक्के पालवी येते. यावर्षी ७० टक्के आंबा कलमांना बहारदार पालवी फुटली आहे. आंबा कलमांना चैत्र महिन्यामध्ये पालवी येण्याचे संतुलन बिघडल्यामुळेच मोहर येण्याच्या वेळेला पालवी येत आहे. चैत्र महिन्यामध्ये आंबा कलमांना पालवी आली की, ती पालवी परिपक्व होऊन नोव्हेंबर ते डिसेंबर महिन्यामध्ये आंबा कलमांना मोहर येतो, असे येथील शेतकरी तथा आंबा बागायतदारांचे म्हणणे आहे. याकडे कृषी विभागाने लक्ष देऊन संशोधन करणे गरजेचे आहे बदलत्या वातावरणामध्ये आंबा पिकवणे ही बागायतरांसमोर फार मोठी समस्या निर्माण झाली आहे, तरी देखील नोव्हेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात येथील शेतकरी पावसाळ्यामध्ये आलेल्या मोहर संरक्षण करून आंबा पीक घेत आहेत.