मुंबई
ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर देशात साखर टंचाईचे संकट निर्माण होण्याची शक्यता आहे. केंद्र सरकारने साखर कारखान्यांमध्ये उसाच्या रसापासून इथेनॉल निर्मितीवर निर्बंध घातले. केंद्र सरकारच्या या निर्णयामुळे साखर उद्योगाला सुमारे तीन हजार कोटी रुपयांचा फटका बसल्याचे सांगितले जात आहे. इथेनॉल निर्मितीवरील निर्बंधांमुळे पेट्रोलमध्ये १० टक्के इथेनॉल मिश्रण करण्याचे धोरणही संकटात आले आहे. त्यामुळे इथेनॉल निर्मितीवरील निर्बंधांबाबत फेरविचार करावा, अशी मागणी राज्य सहकारी साखर कारखाना संघाने केली आहे.
राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष हर्षवर्धन पाटील यांनी सहकारमंत्री अमित शाह यांना पत्र पाठवून इथेनॉल निर्मितीवर घालण्यात आलेली बंदी उठविण्याची मागणी केली आहे. हर्षवर्धन पाटील यांनी सांगितले की, ‘इथेनॉलवरील बंदीमुळे साखर उद्योग अडचणीत आला आहे. त्यामुळे केंद्र सरकारने त्वरित आपल्या निर्णयाचा फेरविचार करावा. साखर कारखान्यांची अडचण केंद्राच्या लक्षात आली असून त्यातून मार्ग काढण्याचा सकारात्नक प्रयत्न सुरू आहे. त्याबाबत लवकरच गोड बातमी मिळेल अशी आशा आहे.’