छत्रपती संभाजीनगर :
जगप्रसिद्ध अजिंठा लेण्यांच्या पाणी आणि वीज पुरवठ्याचे एका वर्षांचे आठ लाखांचे बील थकले असल्यामुळे पाणीपुरवठ्याची वीज कापल्याने लेण्यांचा पाणीपुरवठा बंद आहे. वीजबिल न भरल्यास महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभाग पाणीपुरवठा बंद करून ही योजना महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या ताब्यात देण्यात येईल, असे पत्र महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागाने दिले आहे.
पर्यटकांना पिण्यासाठी शुद्ध पाणी मिळावे व मुबलक पाणी पुरवठा व्हावा यासाठी महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळे १९९८ साली तोंडापूर (ता.जामनेर)येथील फर्दापूर येथे फिल्टर प्लांट उभारून थेट अजिंठा लेण्यांपर्यंत पाणी पोहचवले आहे. महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागासोबत ना नफा ना तोटा या तत्त्वावर करार करून ही योजना सुरू केली. तेव्हापासून ही योजना महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभाग चालवत आहेत. फेब्रुवारी २०१९ रोजी महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागाने बिल थकल्याने पाणीपुरवठा व वीजबिल न भरल्याने वीजपुरवठा खंडीत केला होता, तेव्हादेखील सुमारे दोन वर्षे हा पाणीपुरवठा बंदच होता.
महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाने पाण्याचे आठ लाख रुपये थकित बिल व देखभाल दुरुस्तीचे ७८ लाख६६ हजार रुपये मार्चमध्ये भरले नाही, तर पाणी पुरवठायोजना बंद करून महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या ताब्यात देऊ, असे महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे अभियंता बाबासाहेब सदावर्ते यांनी म्हटले.