भारत दरवर्षी 20 हजार हून अधिक कामगार इटलीला पाठवणार

नवी दिल्ली :

भारत आणि इटलीने अलीकडेच स्थलांतर आणि गतिशीलता करारावर स्वाक्षरी केली आहे. हा करार दोन्ही देशांतील लोकांमधील संबंध दृढ करण्यासाठी, विद्यार्थी आणि कुशल कामगारांना पाठिंबा देण्यासाठी आणि अन्य समस्यांवर सहकार्य करण्याचे एक साधन असणार आहे. या कराराला केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजुरी दिली. या करारामुळे भारतातून दरवर्षी २० हजार कामगार इटलीत जाऊ शकणार आहेत.

या कराराअंतर्गत इटलीमध्ये शिक्षण किंवा व्यावसायिक प्रशिक्षण पूर्ण करणाऱ्या भारतीय विद्यार्थ्यांना तात्पुरत्या निवासाची परवानगी दिली जाईल, ज्यामुळे त्यांना इटलीमध्ये विविध क्षेत्रातील अनुभव मिळविण्याची संधी मिळेल. अशाप्रकारे या कराराद्वारे भारतीयांना त्यांच्या अभ्यासानंतर इटलीमध्ये संधी, इंटर्नशिप आणि व्यावसायिक प्रशिक्षणाचा लाभ घेण्याचा मार्ग मोकळा होणार आहे.

या करारानुसार हंगाम आणि बिगर हंगामासाठी भारतीय कामगारांचा कोटा निश्चित करण्यात आला आहे. बिगर हंगामी कामगारांसाठी, इटलीने सन 2023 साठी 5 हजार, वर्ष 2024 साठी 6 हजार आणि वर्ष 2025 साठी 7 हजारांचा कोटा निश्चित केला आहे. बिगर हंगामी कामगारांसाठी एकूण राखीव कोटा 12 हजार निश्चित करण्यात आला आहे, तर हंगामी कामगारांचा एकूण कोटा आठ हजार निश्चित करण्यात आला आहे. अशाप्रकारे मंत्रिमंडळाने दरवर्षी 20,000 हून अधिक भारतीय कामगार पाठवण्याच्या इटलीसोबतच्या कराराला मंजुरी दिली.

या करारामुळे ज्या भारतीय विद्यार्थ्यांना त्यांचा अभ्यास किंवा व्यावसायिक प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर अल्पकालीन व्यावसायिक प्रशिक्षण घ्यायचे आहे त्यांना 12 महिन्यांपर्यंत इटलीमध्ये राहण्याची परवानगी मिळते. भारताने आतापर्यंत डेन्मार्क, फ्रान्स, जर्मनी, पोर्तुगाल आणि इतर अनेक देशांशी असे करार केले आहेत.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top