हैदराबाद- तेलंगणा विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर माजी मुख्यमंत्री केसीआर यांच्या भारत राष्ट्र समितीमधील (बीआरएस) कार्यकर्त्यांनी भारत राष्ट्र समितीचे नाव बदलून पुन्हा तेलंगणा राष्ट्र समिती (टीआरएस) करण्याची मागणी केली आहे. पक्षाच्या नावातून तेलंगणा हटवल्याने लोकांशी असलेला संपर्क कमी झाला असल्याचे बीआरएस कार्यकर्त्यांनी म्हटले आहे.
काही नेत्यांनी नाव बदलण्यास नाराजी व्यक्त केली होती. मात्र ते खुलेपणाने याबाबत मत व्यक्त करत नाहीत. कारण बीआरएस पक्ष कठोर निर्णय घेण्यासाठी ओळखला जातो. मात्र, हातातून सत्ता जाण्यासाठी टीआरएसचे नाव बदलणे, हे एक प्रमुख कारण असल्याची बीआरएस कार्यकर्त्यांमध्ये चर्चा आहे. आता खुद्द केसीआर यांनीही तेलंगणा राष्ट्र समिती हेच नाव पूर्ववत करण्यावर विचार सुरू केला आहे. तसेच याबाबत कार्यकर्त्यांनी बीआरएसचे कार्यकारी अध्यक्ष केसीआर यांचे पुत्र के. टी. रामाराव यांच्याकडेही आपल्या सूचनाही पाठविल्या आहेत. दरम्यान, तेलंगणा राष्ट्र समितीने तेलंगणा राज्याच्या निर्मितीसाठी पुढाकार घेतला होता. 2 जून 2014 रोजी तेलंगणाच्या निर्मितीनंतर सलग 10 वर्षें हाच पक्ष सत्तेत होता. दोन वेळा केसीआर यांनीच मुख्यमंत्रिपद भूषविले.मात्र, 2023 मध्ये काँग्रेसने सत्ता खेचून आणली.