मुंबई – माजी मुख्यमंत्री तथा उबाठा प्रमुख उद्धव ठाकरे यांचे मुंबईतील निवासस्थान असलेल्या मातोश्रीबाहेर मोठा घातपात घडवून आणणार आहे, अशी माहिती देणारा फोन महाराष्ट्र नियंत्रण कक्षाला आला. एका अज्ञात व्यक्तीने महाराष्ट्र नियंत्रण कक्षाला हा फोन केला.
नियंत्रण कक्षाला फोन करणार्या व्यक्तीने मुंबईहून गुजरातला जाणार्या ट्रेनमध्ये प्रवास करताना मातोश्रीवर घातपात घडवून आणणार असल्याची चर्चा करताना चार-पाच जणांचे बोलणे ऐकल्याचा दावा केला. त्याने ही माहिती तत्काळ महाराष्ट्र नियंत्रण कक्षाला फोन करून कळवली. मुंबई भायखळ्यातील मोहम्मद अली रोडवर एक खोली भाड्याने घेण्याबाबतही ते बोलत होते, असा दावाही फोन करणार्या व्यक्तीने केला आहे. या माहितीनंतर मुंबई पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.
याप्रकरणी खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया देताना म्हटले की, उद्धव ठाकरे व त्यांच्या कुटुंबाच्या सुरक्षेची जबाबदारी केंद्र सरकारची आहे. फोन करणारे कोण होते, हे मला माहिती आहे. राम मंदिर उडवून देण्याची धमकी देणारे विश्व हिंदू परिषदेचे कार्यकर्ते होते. त्यांनी मुस्लीम नावे घेतली होती आणि राम मंदिर उडवून देण्याची धमकी दिली होती. या देशात लोकसभा निवडणुकीपूर्वी अशाप्रकारे धार्मिक तेढ निर्माण करून निवडणुका जिंकायच्या किंवा निवडणुकांना सामोरे जायच हे भाजपाचे षड्यंत्र आहे. ठाकरे व त्यांचे कुटुंबीय तसेच संपूर्ण शिवसेना नेत्यांच्या सुरक्षेची जबाबदारी केंद्र व महाराष्ट्राच्या गृहखात्याची आहे. त्यांची सुरक्षा सध्या काढून घेतली आहे.