मुंबई – मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या जलवाहिन्या फुटण्यावर पर्याय म्हणून भूमिगत जलबोगद्याचा मार्ग पालिका प्रशासनाने निवडला आहे. कशेळी (ठाणे-बाळकुम) आणि मुलुंडदरम्यान २२ किमी लांबीचा जलबोगदा तयार केला जाणार आहे. त्यासाठी पालिका तब्बल ३५० कोटी रुपये खर्च करणार आहे. या कामासाठी पालिका प्रशासनाने निविदाही मागविल्या आहेत.
मुंबईला दररोज सात धरणांमधून एकूण ३९५० दशलक्ष लिटर पाणीपुरवठा केला जातो. यापैकी भातसा धरणातून २ हजार दशलक्ष लिटर पाणी मुंबईकडे आणले जाते. यातील १३६५ दशलक्ष लिटर पाणी पांजरापूर जलशुद्धीकरण प्रकल्पात शुद्ध करून मग मुंबईकरांना वापरासाठी दिले जाते. मात्र मुंबई-नाशिक महामार्गाचे रुंदीकरण काम आणि जुन्या जीर्ण झालेल्या ब्रिटिशकालीन जलवाहिन्या फुटण्याचे प्रमाण वाढत चालले आहे.त्यामुळे या जीर्ण जलवाहिन्यांना पर्याय म्हणून जल बोगदा बांधण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.