मुंबई- मुंबई शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या सातही धरणातील पाणीसाठ्यात मोठी घट झाली आहे.मागील वर्षांच्या तुलनेत यंदा २० दिवसांचा पाणीसाठा कमी झाला आहे.त्यामुळे येत्या मे महिन्यात मुंबईकरांना पाणी टंचाईचा सामना करावा लागणार असल्याने पालिका प्रशासन चिंतेत दिसत आहे.
गेल्या वर्षी ऐन पावसाळ्याच्या दिवसांत १ जुलैपासून मुंबईत १० टक्के पाणीकपात लागू केली होती.महिनाभर ही पाणीकपात सुरू होती. ८ ऑगस्टपासून ही पाणीकपात रद्द करण्यात आली होती.यंदाही आताच धरणांच्या पाणीसाठ्यात कपात झाली आहे.पुढील मार्च,एप्रिल आणि मे महिन्यांत पाणीसाठा आणखी कमी होणार आहे. त्यामुळे मे महिन्यापासून पाणी टंचाईची झळ मुंबईकरांना बसण्याची शक्यता आहे. त्यानंतर जून महिन्यात पावसाने धरणांमध्ये वेळेत हजेरी लावली नाही तर पाणीटंचाई तीव्र होऊ शकते. त्यामुळे आत्तापासूनच पालिकेच्या जल विभागाकडून पाण्याचे नियोजन करण्यासाठी हालचाली सुरू झाल्या आहेत.सध्या १२ फेब्रुवारी पर्यंत मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सातही धरणांमध्ये ७ लाख २२ हजार ६ दशलक्ष लीटर पाणीसाठा उपलब्ध होता.