नाशिक – जिल्ह्यातील येवला शहरात आज मकरसंक्रांतीपासून पतंग उत्सव सुरू झाला.पुढील तीन दिवस हा उत्सव चालणार आहे.यामध्ये यंदा चालू घडामोडींचे प्रतिबिंब उमटलेले दिसत आहे.काही कारागिरांनी पतंगांवर राम मंदिरासह पंतप्रधान मोदी,उद्धव ठाकरे आणि मराठा आंदोलक मनोज जरांगे-पाटील यांच्या प्रतिमा छापल्या आहेत.
यंदा उत्सवासाठी पतंग, फिरकी आणि मांजा खरेदी झाली आहे.या पतंगोत्सवाची धूम मंगळवारपर्यंत पाहायला मिळणार आहे.मुस्लिमबांधवही या उत्सवात सहभागी होत आहेत. अनेक ठिकाणी ‘डीजे’ची साद अन् तरुणाईचा जल्लोष दिसून येत आहे.पतंग व फिरकी शहरातच बनवली जाते. पतंग उडविण्यासाठी मांजाही घरीच बनवलेला असतो.शहरात पतंग बनविणारे जवळपास १५, विक्री करणारे ५० च्या वर, फिरकी बनविणारे १५ कारागीर आहेत. प्रत्येक शौकीन २००-३०० पतंग एकावेळी खरेदी करतात. मोठे कुटुंबीय पाचशेपर्यंत पतंग खरेदी करतात. यातून होणाऱ्या उलाढालीमुळे हा उत्सव जगण्याचा भाग बनला आहे