नागपूर- राज्यात तापमानाचा पारा दिवसेंदिवस वाढत चालल्याने विजेची मागणीही वाढली आहे.मात्र, महानिर्मितीकडे केवळ १५ दिवस पुरेल एवढाच कोळसा उपलब्ध असल्याने राज्यावर वीजटंचाईचे सावट घोंगावत आहे.
राज्यात पावसाळ्यात महानिर्मितीला दररोज सुमारे ८० हजार मेट्रिक टन कोळसा लागतो.परंतु एप्रिल-मे महिन्यात विजेचा वापर वाढत असल्याने महानिर्मितीलाही आपले वीज उत्पादन वाढवावे लागते.सध्याही विजेची मागणी वाढल्याने पूर्ण क्षमतेने संच चालवावे लागत आहेत.महानिर्मितीची वीजनिर्मिती क्षमता १३ हजार १५२ मेगावॉट इतकी आहे. त्यापैकी ९ हजार ५४० मेगावॉट वीज ही औष्णिक वीज असते. मात्र सध्या दररोज ७ ते ८ मेगावॉट इतकीच औष्णिक वीज निर्मिती होत आहे. त्यातच आता केवळ १५ दिवस पुरेल इतकाच कोळसा महानिर्मितीकडे शिल्लक आहे.
दरम्यान,मागील दोन दिवसांपासून राज्यातील रोजची विजेची मागणी २८ ते २९ हजार मेगावॅटपर्यंत पोहचली आहे.त्यातील २४ ते २५ हजार मेगावॉटची मागणी महावितरणची आहे. एकट्या मुंबईत रोज साडेतीन ते चार हजार मेगावॉटची मागणी आहे.