पालघर- गेले कित्येक महिने गाजत असलेला वाढवण बंदराचा मुद्दा या लोकसभा निवडणुकीत कळीचा मुद्दा ठरणार आहे. गुजरात हद्दीतील घई गावापासून मुंबईत कफ परेड पर्यंत मच्छिमारांच्या या प्रश्नावर 12एप्रिल रोजी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे बोईसर येथे सभा घेऊन आपली भूमिका मांडणार आहेत . त्या नंतरच आम्ही आमची भूमिका जाहीर करू असे वाढवणं बंदर संघर्ष समितीचे अध्यक्ष नारायण पाटील यांनी सांगितले. सर्व मच्छिमार संघटना, वाढवण बंदर संघर्ष कृती समिती आणि पालघर भागातील आदिवासी संघटना यांची एकत्रित बैठक आज पालघरला झाली. या बैठकीला शिवसेना ठाकरे गटाचे प्रतिनिधी उपस्थित होते. सुमारे 2लाखाहून जास्त मच्छिमार आणि या व्यवसायावर अवलंबून असणारे छोटे व्यावसायिक या बंदरामुळे उध्वस्त होणार आहेत त्यामुळे या लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार घालण्याचा निर्णय या बैठकीत होणार होता. मात्र 12एप्रिल ला होणाऱ्या सभेत उद्धव ठाकरे आपल्या पक्षाची भूमिका जाहीर करतील असे ठाकरे गटाकडून कळवण्यात आले. त्या मुळे आम्ही सर्व संघटना 12एप्रिल नंतर निर्णय घेऊ. आमचा निर्णय राज्यातल्या सर्व मच्छिमारांसाठी असेल असे कार्याध्यक्ष महाराष्ट्र मच्छिमार कृति समिती चे कार्याध्यक्ष रामकृष्ण तांडेल यांनी सांगितले.