नवी दिल्ली
विश्वचषक २०२३ संपल्यानंतर आजपासून भारत ऑस्ट्रेलियाविरुद्ध ५ सामन्यांची टी-२० मालिका खेळत आहे. विश्वचषकाच्या प्रदीर्घ प्रवासानंतर या मालिकेतून वरिष्ठ खळाडूंना विश्रांती देण्यासाठी कर्णधारपदाची जबाबदारी क्रिकेटपटू सूर्यकुमार यादव याला देण्यात आली आहे, मात्र याला अनेकांकडून विरोध होत असून सूर्यकुमारच्या काल झालेल्या पत्रकार परिषदेला फक्त दोनच पत्रकार हजर होते. ही पत्रकार परिषद फक्त ३.३२ मिनिटे चालली!
विश्वचषकासारख्या मोठ्या स्पर्धेच्या अंतिम फेरीत पत्रकार परिषदेला २०० पत्रकार होते, तिथे आता टी-२० च्या पहिल्या पत्रकार परिषदेला फक्त दोनच पत्रकार पाहून सूर्यकुमार आश्चर्यचकित झाला. यावेळी सूर्यकुमार म्हणाला की, टी-२० विश्वचषक डोळ्यासमोर ठेवून आम्ही हे सामने खेळणार आहोत. हे सामने खूप महत्वपूर्ण आहेत. आयपीएल सामने खेळले आहेत ते चांगल्या फॉर्ममध्ये आहेत. मी टीमला एवढेच सांगितले आहे की, खेळाचा आनंद घ्या. विश्वचषकाच्या अंतिम फेरीतील पराभव साहजिकच निराशाजनक आहे. मात्र तरीही, ती खरोखरच एक मोठी मोहीम होती. आम्ही मैदानावर ज्या प्रकारे खेळलो त्याचा प्रत्येक खेळाडू, इतर सहकारी, संपूर्ण भारत आणि आमच्या सर्व कुटुंबांना अभिमान वाटतो.