अहमदनगर :
उजनी जलाशयात तब्बल २८ वर्षानंतर प्रथमच एक कोटी मत्स्यबीज सोडण्यात येणार आहे. हे मत्स्यबीज जिल्हा नियोजन समितीच्या नाविन्यपूर्ण योजना निधीमधून सोडण्यात येणार असल्याची घोषणा उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार यांनी केली.
उजनी धरणाचे जलक्षेत्र लक्षात घेता धरणात दरवर्षी एक कोटी मत्स्यबीज सोडणे गरजेचे आहे. मात्र २००७ सालापर्यंत ठेकेदार व त्यानंतर २००८ मध्ये उजनीच्या मासेमारीचे हस्तांतर जलसंपदा विभागाकडे करण्यात आले. तेव्हापासून संबंधित विभागाकडून मत्स्यबीज सोडले जात नव्हते. मत्स्यबीज सोडण्याचा अभाव, उजनीचे प्रदूषण व बेकायदेशीर परप्रांतीय मच्छिमारांकडून मच्छरदाणी जाळीच्या माध्यमातून होणारी व्यावसायिक मासेमारी याचा गंभीर परिणाम धरणातील मत्स्य उत्पादनावर झाला. धरणातील शेकडो माशांच्या जाती तसेच प्रमुख कार्प जातींचे मासे नामशेष झाले. हजारो मच्छिमारांच्या रोजगारावर गदा आली. त्यामुळे धरणात मत्स्यबीज सोडण्याची मागणी भोई समाजाकडून होत होती. आमदार भरणे यांच्याकडेही याचा पाठपुरावा सुरू होता. काल पुणे येथे नीरा डावा व खडकवासला कालवा सल्लागार समितीच्या बैठकीमध्ये दत्तात्रय भरणे यांनी अजित पवार यांच्याकडे उजनी जलशयामध्ये मत्स्यबीज सोडण्यासाठी निधी उपलब्ध करून देण्याची मागणी केली होती.