बिहारमध्ये नितीश कुमारांच्या नेतृत्वाखालीच निवडणूक, पण मुख्यमंत्री कोण? अमित शाहांनी सस्पेन्स वाढवला

Amit Shah on Bihar Chief Minister Candidate

Amit Shah on Bihar Chief Minister Candidate | बिहार विधानसभा निवडणुका (Bihar Elections) काही महिन्यांवर आल्या असताना केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांनी मुख्यमंत्रीपदाबाबतचा सस्पेन्स वाढवला आहे. आगामी निवडणुका विद्यमान मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखाली लढणार असले तरीही निवडणुकीनंतर बिहारचा मुख्यमंत्री कोण होणार, याबाबत चर्चा रंगली आहे.

“बिहारचा मुख्यमंत्री कोण होईल, हे वेळच सांगेल,” असे शाह यांनी म्हटले आहे. मात्र, त्यांनी स्पष्ट केले की, आगामी निवडणूक नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखालीच लढवली जाईल. शहा यांच्या या वक्तव्यानंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.

एका मुलाखतीत बोलताना शाह यांना बिहार निवडणुकीतील प्रमुख मुद्दे आणि मुख्यमंत्रिपदाच्या उमेदवाराबाबत विचारले असता, त्यांनी सांगितले, “निवडणुकीचे मुद्दे जनताच ठरवते. पण, बिहारसाठी विकास हाच सर्वात मोठा मुद्दा आहे.” मुख्यमंत्रिपदाबाबत ते म्हणाले, “कोण मुख्यमंत्री होईल, हे वेळच सांगेल. पण, आम्ही नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक लढवणार आहोत.” या वक्तव्यानंतर बिहारच्या राजकारणात नव्या चर्चांना सुरुवात झाली आहे.

जेडीयू सातत्याने ‘25 ते 30, पुन्हा नितीश’ असा प्रचार करत आहे, तर बिहार भाजपचे नेते दिलीप जयस्वाल आणि सम्राट चौधरी यांनीही ‘2025 पुन्हा नितीश’ असा दावा केला आहे. मात्र, शहा यांच्या ‘वेळच सांगेल’ या वक्तव्यानंतर मुख्यमंत्रिपदाबाबत अनिश्चितता निर्माण झाली आहे.

जेडीयूचे स्पष्टीकरण

नितीश सरकारमधील जलसंपदा मंत्री आणि जेडीयूचे ज्येष्ठ नेते विजय कुमार चौधरी यांनी सांगितले की, “अमित शाह यांनी स्पष्ट केले आहे की, बिहारमध्ये एनडीएचे नेतृत्व नितीश कुमारच करतील. निवडणूकही त्यांच्याच नेतृत्वाखाली लढवली जाईल.”

तेजस्वी यादवांची टीका

दुसरीकडे, राष्ट्रीय जनता दलाचे (RJD) नेते तेजस्वी यादव यांनी नितीश कुमार यांच्यावर जोरदार टीका केली. “नितीश कुमार यांच्या स्थितीमुळे आगामी निवडणुकीत जेडीयूचे तिकीट वाटप अमित शाहाच करतील,” असा दावा तेजस्वी यांनी केला. त्यांनी नितीश यांच्या पेन्शन वाढ योजनेला ‘कॉपीकॅट’ संबोधत, महागठबंधनने सात महिन्यांपूर्वीच अशी घोषणा केल्याचा दावा केला आहे.