पुणे- मुंबई(Mumbai)तील गिरण्यांच्या जागी ४०-५० मजली गगनचुंबी इमारती उभ्या आहेत. परंतु मराठी (Marathi) माणूस कुठेच दिसत नाही असे वक्तव्य शरद पवार (Sharad Pawar) यांनी केले. आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुंबई आणि मराठी या मुद्द्यावरून राजकीय वातावरण तापले असताना त्यांनी हे वक्तव्य केल्याने त्याची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू आहे.
पुण्यात आयोजित किशोर पवार (Kishore Pawar) यांच्या जन्मशताब्दी कार्यक्रमात शरद पवार उपस्थित होते. यावेळी ते म्हणाले की, आज देशात साखर व्यवसाय महत्त्वाचा आहे. मात्र कामगारांच्या पिळवणुकीकडेही लक्ष दिले पाहिजे. एकेकाळी मुंबईत तब्बल २०० गिरण्या होत्या. पण आज फक्त एकच गिरणी उरली आहे. त्या गिरण्यांच्या जागी आता 40-50 मजली इमारती उभ्या राहिल्या आहेत. मात्र त्या ठिकाणी मराठी माणूस कुठेच दिसत नाही. हे पाहून खंत वाटते. कामगार चळवळीमुळे गिरण्या सुरू राहिल्या होत्या, पण आज त्याच चळवळी हरवल्या आहेत.
ते पुढे म्हणाले की, ज्या वसंतदादांचे (Vasantadada patil) सरकार मी पाडले, त्याच वसंतदादांनी नंतर भूतकाळ विसरून गांधी-नेहरूंच्या विचारांसाठी मला मुख्यमंत्रिपदासाठी पाठिंबा दिला. ही त्या काळच्या नेतृत्वाची मोठी वृत्ती होती. त्यावेळी वसंतदादा, रामराव अदिक, शिवाजीराव निलंगेकर अशा अनेक नेत्यांची मुख्यमंत्रिपदासाठी नावे चर्चेत होती. मात्र वसंतदादांनी स्पष्ट सांगितले की आता कुणाच्याही नावाची चर्चा नको, नेतृत्व शरदकडे द्यावे.